Reliance’s Vantara expands from wildlife conservation to a premium dessert brand in Mumbai: अनंत अंबानी यांच्या ‘वंतारा’ने मुंबईत ‘वंतारा क्रीमरी’ सुरू करून एका पूर्णपणे नवीन क्षेत्रात पदार्पण केले आहे. जामनगर येथील प्राण्यांच्या पुनर्वसन उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘वंतारा’ने आता आपली व्याप्ती ‘प्रीमियम डेझर्ट’ श्रेणीपर्यंत वाढवली आहे. या कंपनीने एक असे आईस्क्रीम ब्रँड सादर केले आहे, ज्यामध्ये भारतातील पारंपारिक वारसा आणि आधुनिकतेचा संगम आहे.

या उपक्रमाचे वेगळेपण म्हणजे, त्याच्या विविध फ्लेवर्समागील संकल्पना. केवळ पारंपारिक आणि नेहमीच्याच फ्लेवर्सवर अवलंबून न राहता, ‘वंतारा क्रीमरी’ने आपल्या मेनूमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण पर्यायांचा समावेश केला आहे. जसे की मलाई कुल्फी, पेरू-मिरची (Guava Chili), फिल्टर कॉफी आणि लेमन सॉर्बेट.

या नवीन ब्रँडचा शुभारंभ ‘जिओ वर्ल्ड ड्राइव्ह’ येथे झाला, जिथे ‘वंतारा’ने एका स्टायलिश आईस्क्रीम ट्रकच्या अनुभवाच्या माध्यमातून आपली संकल्पना सादर केली. या ट्रकच्या माध्यमांतून ९ आणि १० मे रोजी अनेक ग्राहकांनी याचा अनुभव घेतला. तसेच १६ आणि १७ मे २०२६ रोजी हा ट्रक पुन्हा येणार असून, त्यामुळे अधिक ग्राहकांना या आईस्क्रीमची चव घेण्याची संधी मिळणार आहे.

अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखालील ‘वंतारा’ हा रिलायन्स जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्समध्ये स्थित एक मोठ्या प्रमाणावरील वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन उपक्रम आहे. सुमारे ३,००० एकर परिसरात पसरलेला आणि रिलायन्स फाउंडेशनद्वारे चालवला जाणारा हा प्रकल्प, जखमी, पीडित आणि बंदिस्त प्राण्यांची सुटका व पुनर्वसन करण्यावर लक्ष केंद्रित करतो.

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

दरम्यान, ‘वंतारा क्रीमरी’ आईस्क्रीमच्या शुभारंभानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. या बातमीवर प्रतिक्रिया देताना, अनेकांनी एका व्हायरल एक्स पोस्टवर कमेंट्स केल्या. त्यापैकी एकाने लिहिले, “१००% क्रूरता-मुक्त, पूर्णपणे त्या गाईंच्या दुधापासून बनवलेले, ज्यांना दुधासाठी शोषण करणाऱ्या शेतकऱ्यांपासून वाचवण्यात आले होते.”

“त्यांची सामाजिक, धर्मादाय कार्य करण्याची कल्पना केवळ स्वतःचा ब्रँड तयार करणे आणि त्याचा प्रचार करणे ही आहे. हे सर्व पैशांसाठी आहे. स्पष्टपणे एक खरा व्यावसायिक, दुसरे काही नाही”, असे दुसऱ्या एकाने म्हटले.

आणखी एकाने म्हटले, “आता वंतारा क्रीमरी आईस्क्रीम का लॉन्च केले? वंताराने आधीच हजारो प्राण्यांना वाचवले आहे आणि अनंत यांच्या रिलायन्सकडे भरपूर पैसा आहे. भारताला अधिक तंत्रज्ञान आणि संशोधन व विकासाची गरज आहे आणखी एका स्नॅक ब्रँडची नाही.”