India Pakistan Trade Ban Impact: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबरचे सर्व आर्थिक संबंध तोडत ६-७ मे २०२५ च्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते. तेव्हापासून पाकिस्तानविरोधात लागू करण्यात आलेली प्रत्येक आर्थिक उपाययोजना आजही कायम आहे. अटारी-वाघा सीमा बंद आहे, भारतीय विमान कंपन्यांसाठी पाकिस्तानी हवाई हद्द बंद करण्यात आली आहे, ‘सिंधू पाणी करार’ स्थगित अवस्थेत आहे आणि द्विपक्षीय व्यापार २०१८ मधील २.४१ अब्ज डॉलर्सवरून २०२४ पर्यंत १.२ अब्ज डॉलर्सपर्यंत घसरला होता तो आता जवळपास शून्यावर येऊन ठेपला आहे.

२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात २६ नागरिक ठार झाल्यानंतर, भारताने दोन्ही देशांमधील एकमेव भू-मार्गीय व्यापारी मार्ग असलेली ‘अटारी-वाघा सीमा’ बंद केली, तसेच ‘परकीय व्यापार महासंचालनालया’मार्फत आयातीवर संपूर्ण बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.

“पाकिस्तानमध्ये उत्पादित झालेल्या किंवा तेथून निर्यात केल्या जाणाऱ्या सर्व वस्तूंची, त्या मुक्तपणे आयात करण्यायोग्य असोत किंवा अन्य प्रकारे परवानगी प्राप्त असोत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात अथवा त्यांची वाहतूक पुढील आदेश मिळेपर्यंत, तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येत आहे”, असे त्यावेळी वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले होते.

भारत-पाकिस्तान व्यापार

याला प्रत्युत्तर म्हणून, ४ मे २०२५ रोजी पाकिस्तानने भारतासोबतचा सर्व व्यापार (ज्यामध्ये तिसऱ्या देशांमार्फत होणाऱ्या व्यापाराचाही समावेश आहे) स्थगित केला होता.

अल जझीराच्या वृत्तानुसार, भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय व्यापार आधीच मोठ्या प्रमाणात घसरला होता. २०१८ मधील २.४१ अब्ज डॉलर्सवरून तो २०२४ पर्यंत १.२ अब्ज डॉलर्सवर आला होता. भारताला होणारी पाकिस्तानची निर्यात २०१९ मधील ५४७.५ दशलक्ष डॉलर्सवरून २०२४ मध्ये केवळ ४,८०,००० डॉलर्सवर कोसळली होती.

‘बिझनेस टुडे’च्या वृत्तानुसार, एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या बंदीपूर्व काळातील शेवटच्या पूर्ण कालावधीत, भारताने पाकिस्तानला ४४७.६५ दशलक्ष डॉलर्सची निर्यात केली, तर भारताला होणारी पाकिस्तानची निर्यात केवळ ०.४२ दशलक्ष डॉलर्स इतकीच होती.

औपचारिक बंदी असूनही, काही प्रमाणात व्यापार अजूनही सुरू आहेत. ‘अरब न्यूज’ने स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या आकडेवारीचा हवाला देत दिलेल्या माहितीनुसार, जुलै ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत पाकिस्तानने भारतातून ३६.६ दशलक्ष डॉलर्सची आयात केली. यात प्रामुख्याने मानवतावादी निकषांखालील सवलतींचा वापर करून आयात केलेल्या औषधनिर्मितीसाठीच्या कच्च्या मालाचा समावेश होता.

‘बिझनेस टुडे’च्या अंदाजानुसार, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि सिंगापूरसारख्या तिसऱ्या देशांमार्फत होणाऱ्या अनौपचारिक व्यापाराचे मूल्य १० अब्ज डॉलर्स इतके आहे. तरीही, दोन्ही बाजूंकडून हा व्यापार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरील परिणाम

पाकिस्तानच्या ज्या क्षेत्रावर याचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे, ते क्षेत्र म्हणजे औषधनिर्मिती. ‘अल जझीरा’च्या माहितीनुसार, औषधनिर्मितीशी संबंधित उत्पादने ही भारतातून पाकिस्तानमध्ये होणारी मुख्य आयात आहे.

‘रॉयटर्स’च्या वृत्तांनुसार बाजार संशोधनानुसार, मार्च २०२५ पर्यंत भारतातून पाकिस्तानला होणाऱ्या औषधांच्या निर्यातीचे मूल्य अंदाजे २०८ दशलक्ष डॉलर्स इतके होते. ही बंदी लागू झाल्यामुळे, पाकिस्तानच्या औषधनिर्मिती उद्योगाला ‘अ‍ॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडियंट्स’ (औषधांमधील मुख्य घटक) आणि तयार औषधांच्या पुरवठ्यासाठी पर्यायी पुरवठादारांचा शोध घेण्यास भाग पडले आहे.

अटारी-वाघा सीमा खुली आहे का?

‘चॅथम हाऊस’च्या माहितीनुसार, मे २०२६ पर्यंत अटारी-वाघा एकात्मिक तपासणी नाका (Integrated Check Post) बंदच आहे. व्यापारविषयक वकील शांतनू सिंग यांनी ‘अल जझीरा’ला सांगितले की, या नाक्याच्या बंदीमुळे अफगाणिस्तानच्या आयातीमध्येही व्यत्यय आला आहे. जी यापूर्वी याच खुष्कीच्या मार्गाद्वारे केली जात असे आणि या ICP (तपासणी नाक्या) भोवती विकसित झालेल्या स्थानिक अर्थव्यवस्थेवर याचा अत्यंत गंभीर परिणाम झाला आहे.