Raghuram Rajan Prediction About 2008 Economic Crisis In 2005: राघुराम राजन यांची जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ म्हणून ओळख आहे. आंतरराष्ट्रीय सरावरील वित्तीय संस्थांमध्ये विविध पदे भूषवलेले रघुराम राजन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर सुद्धा आहेत. नुकतेच त्यांनी “A Cold Shower for the AI Mania” या प्रोजेक्ट सिंडिकेटमधील लेखात एआय (एआय) बाबत इशारा दिला आहे. राजन यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर त्यांनी अशाच प्रकारे २००५ मध्ये २००८ च्या जागतिक आर्थिक संकटाबाबत (जागतिक आर्थिक मंदी) केलेले भाकीत पुन्हा चर्चेत आले आहे.

रघुराम राजन यांचे २००५ मधील भाकीत

२००५ साली, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (IMF) तत्कालीन आर्थिक सल्लागार रघुराम राजन यांनी वायोमिंगमधील जॅक्सन हॉल येथे प्रमुख अर्थशास्त्रज्ञ आणि बँकर्सच्या वार्षिक सभेत जागतिक वित्तीय बाजारांचा अभ्यास करून एक इशारा दिला होता. त्यांनी असा युक्तिवाद केला होता की, क्रेडिट-डिफॉल्ट स्वॅप्स आणि मॉर्गेज-बॅक्ड सिक्युरिटीजसारखी गुंतागुंतीच्या साधनांनी अधिक धोकादायक बनवले आहे.

त्यांनी असा युक्तिवाद केला होता की, आपण स्वीकारत असलेल्या जोखमींबद्दल बँकांना फारशी माहिती नव्हती. ते म्हणाले होते, “ज्याप्रमाणे पालकांना विचारले जाते की, ‘तुमची मुले सध्या कुठे आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का?’, त्याचप्रमाणे आजकाल बँकांना विचारले जाते की, ‘तुमच्या जोखमी नेमक्या कुठे आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का?’”

त्यावेळी अशा टिप्पण्यांना जवळजवळ धर्मद्रोहासारखे मानले जात होते आणि राजन यांच्या श्रोत्यांनी त्यांना फारसे गांभीर्याने घेतले नव्हते.

मात्र, तीन वर्षांनंतर २००८ मध्ये त्यांनी केलेले भाकीत अखेर खरे ठरले. १९३० च्या दशकातील ‘महामंदी’नंतरच्या सर्वात भीषण आर्थिक संकटाची मूळ कारणे काय असतील, याचे भाकीत राजन यांनी आधीच वर्तवले होते.

२००८ मध्ये काय झाले होते?

महामंदीनंतरचे सर्वात भीषण असलेले २००८ चे आर्थिक संकट, स्वस्त कर्ज आणि ढिसाळ कर्जपुरवठ्यामुळे निर्माण झालेल्या गृहनिर्माण क्षेत्रातील फुगवट्यामुळे उद्भवले. जेव्हा गृहकर्ज थकबाकी वाढली, तेव्हा प्रमुख संस्था कोलमडल्या, ज्यामुळे लेहमन ब्रदर्सचे पतन झाले जागतिक मंदीत आली. याच्या परिणामामुळे मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या गेल्या आणि करोडो लोकांच्या मालमत्ता जप्त झाल्या, ज्यामुळे सरकारी मदत आणि अमेरिकेत डॉड-फ्रँक कायद्यासारख्या सुधारणा लागू झाल्या.

कोण आहेत रघुराम राजन?

रघुराम राजन यांचा जन्म १९६३ मध्ये भोपाळ येथे झाला. परंतु त्यांच्या वडिलांच्या ‘इंटेलिजन्स ब्युरो’मधील नोकरीमुळे त्यांच्या कुटुंबाला इंडोनेशिया, श्रीलंका आणि त्यानंतर बेल्जियम येथे स्थलांतर करावे लागले आणि अखेरीस १९७४ मध्ये ते भारतात परतले.

एक अत्यंत हुशार विद्यार्थी असलेल्या राजन यांनी दिल्ली विद्यापीठात विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यानंतर अहमदाबाद येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’मध्ये त्यांनी एमबीए केले. यानंतर रघुराम राजन यांनी अनेक खासगी आणि सरकारी संस्थांमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत.