Rameshwaram Cafe Founder Raghavendra Rao success story: बंगळुरूमध्ये सर्वात आधी सुरू झालेले द रामेश्वरम कॅफे आज देशभरात प्रसिद्ध आहे. देशातील विविध शहरांमध्ये असलेल्या या कॅफेच्या बाहेर कायम ग्राहकांच्या रांगाच्या रांगा पाहायला मिळतात. या कॅफेची देशभरात चर्चा होत असली तरी अनेकांना याचे संस्थापक आणि त्यांनी इथपर्यंत केलेला खडतर प्रवास माहिती नाही.

द रामेश्वरम कॅफेच्या संस्थापकाचे नाव राघवेंद्र राव असे आहे. त्यांनी २०२१ मध्ये आपली पत्नी दिव्या यांच्यासोबत या कॅफेची संयुक्तपणे स्थापना केली आहे. बंगळुरूच्या इंदिरा नगरमधील ७०० चौरस फुटांच्या एका आउटलेटपासून सुरू झालेला हा प्रवास आता बेंगळुरू, हैदराबाद आणि मुंबईसारख्या अनेक शहरांमध्ये विस्तारला आहे.

या कॅफेच्या पालक कंपनीने २०२४-२५ या आर्थिक वर्षात १७.८ कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवले आहे, जे मागील आर्थिक वर्षातील (२०२३-२४) ११ कोटी रुपयांच्या तुलनेत जवळपास ६२ टक्क्यांनी अधिक आहे. तसेच कंपनीचा निव्वळ नफाही मागील वर्षातील १.८ कोटी रुपयांवरून वाढून २ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

कोणत्याही बाह्य गुंतवणुकीशिवाय केवळ स्वतःच्या मालकीची किचन्स, फ्रँचायझी आधारित विस्तार आणि काटेकोरपणे नियंत्रित कार्यपद्धती यांच्या जोरावर त्यांनी ही प्रगती साधली आहे. या व्यवसायात येण्यापूर्वी राघवेंद्र राव यांना अभिनेता बनायचे होते. अभिनयात करिअर करण्याच्या प्रेरणेमुळे त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण अर्धवट सोडले आणि चित्रपटसृष्टीत संधी मिळवण्यासाठी दिल्ली, मुंबई व चेन्नई येथे अनेक वर्षे घालवली.

अभिनय क्षेत्रात यश मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर ते बंगळुरूला परतले. २०११ मध्ये त्यांनी आपली अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली आणि त्यानंतर पुढच्या वर्षी रस्त्याच्या कडेला इडली-डोशाचे छोटेसे दुकान सुरू करण्यासाठी मित्रांकडून २ लाख रुपये उसने घेतले.

सुरुवातीच्या काळात ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळूनही त्यांच्या व्यवसायाला नफा कमवण्यात अडचणी आल्या. तसेच, भागीदारीच्या माध्यमातून व्यवसायाचा विस्तार करण्याचे प्रयत्नही अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरले नाहीत. मात्र, या अनुभवांनीच पुढे द रामेश्वरम कॅफेचा पाया रचला.

पुढे राघवेंद्र राव यांची चार्टर्ड अकाउंटंट आणि IIM अहमदाबादच्या पदवीधर असलेल्या दिव्या यांच्याशी भेट झाली. त्या फ्रँचायझी घेण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडे आल्या होत्या. पण त्याऐवजी, दोघांनी मिळून एक ब्रँड उभारण्याचा निर्णय घेतला आणि नंतर ते विवाहबंधनात अडकले.

पुढे दोघांनी विभागून घेतलेल्या जबाबदाऱ्यांचा कंपनीला खूप फायदा झाला. राघवेंद्र राव यांनी किचनमधील कामकाज, ग्राहकांचा अनुभव आणि उत्पादनाचा दर्जा यांवर लक्ष केंद्रित केले, तर दिव्या यांनी आर्थिक आणि व्यावसायिक धोरणाची धुरा सांभाळली. यामुळे व्यवसायाला शिस्तबद्ध स्वरूप मिळण्यास आणि त्याचा विस्तार होण्यास मदत झाली.

२०२१ मध्ये सुरू झालेल्या द रामेश्वरम कॅफेने मुद्दामहून आपला मेनू मर्यादित ठेवला. त्याऐवजी, त्यांनी डोसा, इडली आणि वडा यांसारख्या खास दक्षिण भारतीय पदार्थांवर लक्ष केंद्रित केले आणि ताजेपणा, जलद सेवा व सातत्यपूर्ण दर्जा या गोष्टींना प्राधान्य दिले.

ब्रँड आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम कनेक्शन

संस्थापकांनी ब्रँडची ओळख निर्माण करण्यावरही मोठी गुंतवणूक केली. यासाठी त्यांनी दक्षिण भारतीय मंदिर स्थापत्यकला, पारंपरिक ‘कोलम’ नक्षीकाम आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जन्मस्थान रामेश्वरम यांपासून प्रेरणा घेतली. यामुळे त्यांना हैदराबाद आणि मुंबईत प्रवेश करण्यापूर्वीच बेंगळुरूमध्ये या व्यवसायाचा वेगाने विस्तार करणे शक्य झाले.