Uday Kotak Economic Shock Warning US Iran War Impact on India: दीर्घकाळ चाललेल्या अमेरिका-इराण युद्धाचे परिणाम आता समोर येऊ लागल्याने जागतिक अर्थव्यवस्था एका मोठ्या ‘धक्क्याच्या’ उंबरठ्यावर उभी आहे, असा इशारा कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक आणि संचालक उदय कोटक यांनी मंगळवारी दिला. कोटक म्हणाले की, व्यवसायांनी आणि धोरणकर्त्यांनी आर्थिक स्थिरतेतील घसरणीतून तग धरून राहण्यासाठी तातडीने तयारी सुरू करणे आवश्यक आहे.

“गेल्या दोन महिन्यांत आपल्याला युद्धाचा परिणाम दिसून आला नाही. परंतु आता तो जाणवू लागला आहे आणि तो अत्यंत तीव्र स्वरूपाचा असणार आहे. जर इराणचे युद्ध थांबले नाही, तर त्या धक्क्यापासून तुम्ही फार दूर नाही. तो धक्का बसण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा, आपण कठीण काळाचा सामना करण्यासाठी सज्ज होणे गरजेचे आहे”, असे कोटक यांनी सीआयआय वार्षिक व्यवसाय शिखर परिषद २०२६ मध्ये बोलताना सांगितले.

“धक्के बसण्यापूर्वीच आपण संभाव्य संशयकल्लोळाचा (Paranoia) सामना करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे”, असे कोटक म्हणाले. भारतीय अर्थव्यवस्थेची कमी खर्चात पुनर्रचना करण्याच्या गरजेवर आणि व्यवसायांनी सरकारकडे मागण्या करण्याऐवजी स्वतःच पुढाकार घेण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी यावेळी भर दिला.

“चला तर मग नागरिक, व्यावसायिक आणि धोरणकर्ते म्हणून केवळ बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर अधिक भर देऊया”, असे ते म्हणाले.

कोटक यांनी नमूद केले की, जग आता सहकार्याच्या मानसिकतेकडून पुन्हा १९४५ पूर्वीच्या ‘आदिवासीवादी’ (Tribalism) मानसिकतेकडे वळत आहे. जिथे देश व्यापारी मार्ग आणि भौतिक मालमत्तेवरील वर्चस्वासाठी एकमेकांशी संघर्ष करत असत. त्यांनी सांगितले की, मूर्त मालमत्तेवरील (Tangible assets) नियंत्रण आता मोजक्याच लोकांच्या हाती एकवटले जात आहे.

“या ‘आदिवासीवादी’ मानसिकतेचे वर्चस्व असलेल्या जगात आपण धोरणात्मक आणि वास्तववादी असणे गरजेचे आहे. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मालमत्तेवरील नियंत्रण, ज्याला एका भक्कम ‘नफा-तोटा पत्रका’ची (P&L) जोड असावी”, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन

गेल्या दोन दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील नागरिकांना आगामी काळातील कठीण परिस्थितीबाबत सावध करत आहेत. तसेच भारताची आर्थिक लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी ‘युद्धकालीन काटकसरीचा’ अवलंब करावा, असे आवाहन केले आहे.

सिकंदराबाद आणि हैदराबाद येथे बोलताना, पंतप्रधानांनी नागरिकांना वाढत्या ऊर्जा खर्चापासून आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या पुरवठा साखळीतील व्यत्ययापासून देशाला वाचवण्यासाठी, स्वेच्छेने इंधनाचा वापर कमी करण्याचे, परदेश प्रवास आणि डेस्टिनेशन वेडिंग्स पुढे ढकलण्याचे, तसेच महामारीच्या काळातील ‘वर्क-फ्रॉम-होम’ पद्धती पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केले होते.

उदय कोटक कोण आहेत?

उदय कोटक हे भारतातील आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या ‘कोटक महिंद्रा बँके’चे संस्थापक आहेत. एक दूरदृष्टी असलेले उद्योजक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटक यांनी, भारतातील वित्तीय सेवा क्षेत्राचे स्वरूप पालटून टाकण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

१९८५ मध्ये एका छोट्या ‘बिल-डिस्काउंटिंग’ व्यवसायापासून सुरुवात करून, उदय कोटक यांनी व्यावसायिक बुद्धिमत्तेमुळे आणि धोरणात्मक विचारांमुळे कोटक महिंद्राची वाढ एका मोठ्या वित्तीय समूहामध्ये केली. महिंद्रा कोटकचे कार्यक्षेत्र आता बँकिंग, विमा, संपत्ती व्यवस्थापन आणि गुंतवणूक बँकिंग या क्षेत्रांमध्ये विस्तारलेले आहे. २००३ मध्ये, बँकिंग परवाना प्राप्त करणारी कोटक महिंद्रा बँक ही भारतातील पहिली ‘बिगर-बँकिंग वित्तीय संस्था’ (NBFC) ठरली.

उदय कोटक यांचा वित्त आणि व्यवसाय क्षेत्रातील योगदानाबद्दल जगभरात आदर केला जातो. ‘टाइम’ (Time) मासिकाने जगातील ‘१०० सर्वात प्रभावशाली व्यक्तीं’मध्ये समावेश केला होता. यासह ते अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. बँकिंग क्षेत्रापलीकडे जाऊन, ते शिक्षण आणि आरोग्यसेवा यांवर विशेष लक्ष केंद्रित करत, विविध परोपकारी उपक्रमांमध्येही सक्रियपणे सहभागी असतात.