Mumbai Real Estate Growth: मुंबईच्या रिअल इस्टेट बाजारपेठेने सुमारे १५ वर्षांनंतर मे महिन्यातील आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. या काळात मालमत्ता नोंदणीने १४ वर्षांतील उच्चांक गाठला असून, देशातील या सर्वात महागड्या गृहनिर्माण बाजारपेठेत मागणी कायम असल्याचे यावरून दिसते. ‘नाईट फ्रँक इंडिया’ने विश्लेषण केलेल्या, महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक विभागाच्या आकडेवारीनुसार, मे २०२६ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्राच्या हद्दीत १२,३१५ मालमत्तांची नोंदणी करण्यात आली. मे २०२५ मध्ये नोंदवल्या गेलेल्या ११,५६५ नोंदण्यांच्या तुलनेत, हा आकडा ७ टक्क्यांची वाढला आहे.
या नव्या मालमत्तांच्या नोंदणींमधून राज्य सरकारला मुद्रांक शुल्काच्या स्वरूपात १,०५१ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे. पण, व्यवहारांच्या संख्येत वाढ होऊनही, मुद्रांक शुल्काचा महसूल गतवर्षीच्या तुलनेत १ टक्क्याने घटला आहे. नाईट फ्रँकने या घसरणीचे कारण मालमत्ता व्यवहारांच्या रचनेतील बदल असल्याचे म्हटले आहे. मासिक आधारावर पाहता, एप्रिल महिन्याच्या तुलनेत व्यवहारांमध्ये घट झाली. यात नोंदणीमध्ये १४ टक्क्यांची, तर मुद्रांक शुल्क वसुलीमध्ये ९ टक्क्यांची घट दिसून आली.
“मुंबईची रिअल इस्टेट बाजारपेठ सातत्याने अनुकुलता दर्शवत आहे. मे २०२६ मध्ये या महिन्याची गेल्या एका दशकाहून अधिक काळातील सर्वात दमदार कामगिरी नोंदवली गेली आहे. नोंदणींच्या संख्येत दिसून येणारी ही सातत्यपूर्ण वाढ, अंतिम ग्राहकांची मागणी किती मोठी आहे आणि शहराच्या गृहनिर्माण बाजारपेठेवर त्यांचा किती विश्वास आहे, याचे प्रतिबिंब आहे”, असे ‘नाईट फ्रँक इंडिया’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी म्हटले.
बैजल यांनी पुढे नमूद केले की, जरी मुद्रांक शुल्काच्या वसुलीत किंचित मंदी दिसून आली असली तरीही स्थिर मागणी, सुधारणारी परवड क्षमता आणि स्वतःचे घर घेण्याला मिळणारे सातत्यपूर्ण प्राधान्य यांमुळे बाजाराचे एकूण मूलभूत घटक मात्र भक्कम राहिले आहेत.
