scorecardresearch

Premium

Money Mantra: लाईफ इन्शुरन्स घेणं इतकं का महत्त्वाचं?

Money Mantra: कोरोनामुळे अचानकपणे उद्भवलेल्या पराकोटीच्या अस्थैर्यामुळे तर आयुर्विम्याचं महत्व आणखीनच अधोरेखित झालं आहे.

life insurance
आयुर्विमाचं महत्त्व (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

दोन वर्षांपूर्वीच साऱ्या जगाला कोरोनाने जबरदस्त हादरा दिला. मानवी जीवन किती अस्थिर असू शकतं आणि ही अनिश्चितता किती दाहक असू शकते याचं ते ज्वलंत उदाहरण होतं.

कोरोनाने धडा शिकवला

benefit of emotional intelligence
Mental Health Special: भावनात्मक बुद्धिमत्तेचा (EI) फायदा काय?
HDL
‘एचडीएल’ किंवा ‘चांगले कोलेस्ट्रॉल’ कसे वाढवायचे? डॉक्टरांकडून जाणून घ्या सोपे उपाय
smoking and drinking alcohol raise high blood presure problem in youngsters
दारू, सिगारेट ओढणाऱ्या तरुणांना हाय ब्लड प्रेशरचा सर्वाधिक धोका? डॉक्टरांनी सुचवले बचावासाठी ‘हे’ उपाय
fire broke 15 floors building Hindu Colony dadar old man died mumbai
दादरमधील १५ मजली इमारतीला आग; घुसमटल्यामुळे वृद्धाचा मृत्यू

सरत्या वर्षाला निरोप देऊन २०२०चं बेभानपणे स्वागत करत असताना आपल्याला कल्पनाही नव्हती की पुढच्या काही दिवसातच एवढ्या भीषण आपत्तीचा आपल्याला सामना करावा लागणार आहे. खरं तर त्यावेळी चीनमध्ये कोरोनाचं विनाशपर्व सुरू झालं होतं. ही भीषण साथ इतरत्र पसरू शकते असा धोक्याचा इशारा तज्ञांनी दिलाही होता. पण आपण गाफील राहिलो. किंबहुना आपला फाजील आत्मविश्वास आपल्याला नडला. “व्हायरस चीनमध्ये पसरू शकेल. हिमालय ओलांडून आपल्याकडे कुठला येतोय? आणि आला तरी आपलं काय वाकडं होणाराय? असे शेकडो विषाणू आम्ही पचविलेत” हीच आपली मनोधारणा. पण जसजशी बाधितांची संख्या वाढू लागली, मृतांचा आकडा वाढू लागला, सगळं जीवनच ठप्प होऊ लागलं, तेव्हा मात्र आपण अक्षरशः सैरभैर झालो. अर्थात आपली ही बेफिकीर मनोवृत्ती काही नवीन नाही.

मला आठवतं.. खूप वर्षापूर्वी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलचं एक निवेदन वर्तमानपत्रात यायचं..त्यात वरच्या बाजूला ठळक अक्षरात कॅच लाईन असायची..

कॅन्सर दुसऱ्यालाच होतो असे समजू नका

आणि त्याखाली कॅन्सरची प्राथमिक लक्षणे वगैरे बद्दल माहिती असायची.
दुर्दैवाने ही गोष्ट तेव्हाही खरी होती, आजही बऱ्याच अंशी खरी आहे की कॅन्सर सारखा आजार दुसऱ्या एखाद्या दुर्दैवी व्यक्तीला होऊ शकेल, मला नाही.. अशीच आपली समजूत असते. त्या दुर्दैवी माणसांमध्ये मी सु्द्धा असू शकतो हे आपण मान्य करत नाही किंवा मान्य करायला धजावत नाही. त्यामुळेच अशा दुःस्थितीचा सामना करण्याची कोणतीही पूर्वतयारी आपण करत नाही.

आणखी वाचा: आयुर्विमा पॉलिसी फ्री लूक पिरियड म्हणजे काय महत्त्वाचा आहे

‘पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघातात ३४ वर्षाचा तरुण इंजीनियर जागीच ठार. पत्नी जखमी. ४ वर्षाची मुलगी आश्चर्यकारकपणे सुखरूप’ अशी एखादी बातमी वृत्तपत्रात वाचली तर आपण हळहळतो. त्या मायलेकी बद्दल आपल्याला सहानुभूतीही वाटते. पण असा दुर्दैवी प्रसंग आपल्यावर ओढवला तर त्याला तोंड देण्यासाठी आपण काही तरतूद करून ठेवलीय का याचा विचारही करणं आपण टाळतो, किंबहूना असा विचार करण्याचं ‘धाडसच’ आपण करत नाही.

खरं तर कमावत्या व्यक्तीचा मृत्यू घडविणाऱ्या अशा दुर्घटना एखाद्या कुटुंबाची अक्षरशः वाताहात करू शकतात. अशा दुःखद प्रसंगी नातेवाईक, मित्रमंडळी सांत्वनासाठी येतात, धीराचे चार शब्द बोलतात. त्यातून त्या कुटुंबाला थोडासा दिलासा मिळतोही. पण नंतर अत्यावश्यक असणाऱ्या आर्थिक दिलाशाचं काय? त्या सहानुभूतीपर शब्दांचा तिथं काहीच उपयोग होत नाही. दैनंदिन खर्च भागविणे, मुलांचा शालेय खर्च, औषधपाणी, टेलिफोन/वीज आदि बिले यासाठी पूर्वीप्रमाणेच आताही पैसा लागतो, मात्र त्याचा पुरवठा करणारा स्रोत आता आटलेला असतो. अशा वेळी बँक, पोस्ट वा अन्यत्र असलेल्या ठेवी उपयुक्त ठरू शकतात, पण अल्पकाळच. बरेचदा विविध कारणासाठी घेतलेल्या कर्जांची परतफेड करण्यातच हा निधी संपून जातो, किंबहुना त्यासाठीही अपुरा पडतो.

आणखी वाचा: Money Mantra : आयुर्विमा- ‘परम विश्वासाचे तत्व’ म्हणजे काय …

अशा कठिण समयाचा समर्थपणे सामना करण्यासाठी एकच अस्त्र आपल्याला उपयुक्त ठरू शकतं… ते म्हणजे… आयुर्विमा पॉलिसी.

कोरोनामुळे अचानकपणे उद्भवलेल्या पराकोटीच्या अस्थैर्यामुळे तर आयुर्विम्याचं महत्व अजूनच अधोरेखित झालं आहे. विम्याचा विषय झटकून टाकणारे लोक आता आपणहून आयुर्विमा पॉलिसी विषयी विचारणा करू लागले आहेत, ही गोष्ट नक्कीच स्वागतार्ह आहे.

विमा न घेणं हा अक्षम्य गुन्हा
मला माणसाच्या स्वभावाची कधीकधी गंमत वाटते. आठ/दहा लाखाची गाडी घेतली तर आपण त्या गाडीची काळजी घेण्यासाठी सर्वसमावेशक (comprehensive) विमा घेतो, त्यासाठी दहा हजाराचा प्रिमियम भरतो. २/४ लाखांचे दागिने सुरक्षित रहावेत म्हणून बँकेत लॉकर घेतो, त्यासाठी तीन/चार हजाराचे भाडंही भरतो. पण या सर्वापेक्षा कितीतरी पटीनं अधिक मौल्यवान असणाऱ्या मानवी आयुष्याचा विमा घेण्यासाठी मात्र आपण कुरकुरतो. किती विसंगत आहे हे. एखादा तरुण विवाहबद्ध होतो त्यावेळी तो आपल्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत असतो. पत्नीच्या, मुलांच्या पालनपोषणाची, त्यांना एक उत्तम राहणीमान प्रदान करण्याची, शिक्षणाची इत्यादि सर्व जबाबदारी त्याने पार पाडणे अपेक्षित असते. हयात असताना तो हे कर्तव्य पार पाडेलही. पण दुर्दैवाने त्याचं आकस्मिक निधन झालं तर काय? तर ही जबाबदारी सुद्धा त्याचीच आहे. म्हणूनच योग्य रकमेची विमा पॉलिसी घेणं हेही त्याचं कर्तव्यच आहे आणि असं विमा कवच न घेणं हा खरंतर अक्षम्य गुन्हा आहे.

सुदैवाने आजकाल विमा कंपन्या, सरकार, प्रसार माध्यमे या सर्वांच्या प्रयत्नांमुळे या बाबतीत बऱ्यापैकी जागृती झालीय. तरीही अजून फार मोठा पल्ला गाठायचाय. अर्थात विमा संरक्षण घेणं जसं गरजेचं तसंच ते योग्य रकमेचं असणंही तितकंच महत्वाचं आहे.

पुरेसं विमा संरक्षण घेणं महत्वाचं

एखादी व्यक्ती जेव्हा “माझ्याकडे ५ लाखाची पॉलिसी आहे, बस झाला इन्शुरन्स” असं म्हणते तेव्हा त्या व्यक्तीला विमा म्हणजे काय, तो नेमका कशासाठी घ्यायचा हेच समजलेले नसते. विमा ही गुंतवणूक नव्हे, तर ते संरक्षक कवच आहे जे व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाल्यास निर्माण झालेली आर्थिक पोकळी भरून काढून कुटुंबाला आर्थिक आधार देण्याचं काम करते, हे एकदा लक्षात घेतलं की आपल्याला हेही सहज पटेल की सर्वसाधारणपणे आपल्या आर्थिक मूल्याइतका आयुर्विमा घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता माणसाचं आर्थिक मूल्य म्हणजे ह्यूमन लाईफ व्हॅल्यू ठरविण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, ज्यामध्ये वय, वार्षिक उत्पन्न, निवृत्तीचे वय, जीवनशैली, आरोग्यमान, शिक्षणखर्च, मालमत्ता, कर्ज-देणी इत्यादि अनेक गोष्टींचा विचार करण्यात येतो. अशा क्लिष्ट तांत्रिक बाबीत न शिरता सोपं सूत्र वापरायचं झालं तर असं सांगता येईल की सामान्यपणे वार्षिक उत्पन्नाच्या १० ते१२ पट रकमेचा विमा असणं आवश्यक आहे.

आपण एक छोटंसं उदाहरण पाहू या. वार्षिक ८ लाख उत्पन्न असणाऱ्या एका व्यक्तीने उत्पन्नाच्या १२ पट म्हणजे १ कोटी विमा रकमेची पॉलिसी घेतली आहे. आता दुर्दैवाने या विमेदाराचं आकस्मिक निधन झालं तर त्याच्या कुटुंबाला एक कोटीची रक्कम मिळेल जी योग्य ठिकाणी गुंतवली आणि ८% प्रमाणे रिटर्नस मिळाले तर दरसाल ८ लाख रुपयांचा आधार त्या कुटुंबाला मिळत राहील.

आता अशा मोठ्या रकमेची विमा पॉलिसी घ्यायची तर फार मोठ्या रकमेचा प्रिमियमही भरावा लागेल अशी आपली समजूत असेल तर ती नक्कीच चुकीची आहे. टर्म इन्शुरन्स सारखी पॉलिसी अगदी अत्यल्प प्रिमियम मध्ये सुद्धा असं भक्कम विमा संरक्षण देऊ शकते. त्याविषयी पुढच्या एखाद्या भेटीत चर्चा करू.

सध्या आपण सकारात्मक विचार करून कोरोनाचे संकट न विसरता अधिक सजग होऊ या. आपले आरोग्य सांभाळू या, वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात स्वच्छतेचे नियम पाळू या आणि त्याचबरोबर आपले विमा संरक्षण अधिक बळकट करू या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why it is important to take life insurance mmdc psp

First published on: 01-09-2023 at 19:08 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×