Indian Share Market sees massive surge as Nifty 50 Index beats global volatility: जागतिक एआय तेजीमध्ये लाखो कोटी रुपयांचे नुकसान सोसल्यानंतर, बाजारातील अस्थिरतेचा सामना करू पाहणाऱ्या गुंतवणूकदारांचे लक्ष भारतीय शेअर बाजार पुन्हा वेधून घेत आहे. आशियापासून अमेरिकेपर्यंतचे प्रमुख निर्देशांक आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या प्रभावामुळे ढवळून निघत असताना, एनएसई निफ्टी ५० निर्देशांक जागतिक गुंतवणूकदारांसाठी एक प्रकारचा सुरक्षित आश्रयस्थान बनत आहे. वर्षाच्या पहिल्या सहामाहीत, तो केवळ ४० दिवसांमध्येच १% किंवा त्याहून अधिक वाढला आहे. जो एमएससीआय इमर्जिंग मार्केट्स निर्देशांकापेक्षा कमी आणि अमेरिकेच्या एस अँड पी ५०० निर्देशांकापेक्षा किंचित जास्त होता.

वर्षभराच्या बहुतांश काळात, ‘एआय’ क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधींचा अभाव भारतासाठी एक अडथळा ठरला. कारण गुंतवणूकदारांनी दक्षिण कोरिया आणि तैवानसारख्या बाजारांकडे आपला मोर्चा वळवला होता, जिथे त्यांना उत्कृष्ट परतावा मिळाला. मात्र, आता त्या गुंतवणुकीच्या ट्रेंडच्या शाश्वततेबाबत चिंता वाढू लागल्याने, गुंतवणूकदारांचा कल पुन्हा भारताकडे वाढताना दिसत आहे.

जून महिन्यात निफ्टी ५० ने एमएससीआय इमर्जिंग मार्केट्स इंडेक्सच्या तुलनेत नोव्हेंबरनंतरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली, तसेच विदेशी गुंतवणुकीचा ओघ बाहेर जाण्याचे प्रमाणही गेल्या चार महिन्यांतील नीचांकी पातळीवर राहिले आहे.

या वर्षी भारतीय शेअर बाजाराची कामगिरी जागतिक स्तरावर सर्वात खराब राहिली आहे. मात्र आता परिस्थिती बदलू लागली आहे. रुपयाने नीचांकी पातळी गाठल्यानंतर आता तो स्थिरावत आहे, तसेच मध्यपूर्वेतील तणाव निवळल्यामुळे तेलाच्या किमतींमधील वाढही ओसरली आहे. जूनच्या अखेरीस आलेल्या सरकारी अहवालानुसार, या घडामोडींमुळे महागाईबाबतची चिंता कमी झाली असून भारताच्या आर्थिक विकासाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

विश्लेषक काय म्हणाले?

गेल्या महिन्यात ग्राहकांना लिहिलेल्या एका पत्रामध्ये, मॉर्गन स्टॅनलेच्या विश्लेषकांनी सागितले की, भारत एक “खूप मोठा मॅक्रो अॅसेट क्लास” बनला आहे. अलिकडच्या वर्षांतील कमी अस्थिर चलनवाढीची आकडेवारी इक्विटी व्हॅल्युएशनला आधार देते आणि बाजाराला डिफेन्सिव्ह ग्रोथच्या बाजारात रूपांतरित करते, जो पूर्वीपेक्षा जागतिक धक्क्यांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो, असे त्यांनी म्हटले. गेल्या दशकात, निफ्टी ५० जवळपास तिप्पट वाढला असून सहा वेगवेगळ्या वर्षांमध्ये १०% पेक्षा जास्त वार्षिक नफा दिला आहे.