AI changing hiring priorities in tech industry: प्रतिष्ठीत विद्यापीठातून कंप्युटर सायन्समध्ये पदवी मिळवली म्हणजे उच्च पगाराची नोकरी मिळेलच याची खात्री आता देता येऊ शकत नाही. मेटाच्या माजी व्यवस्थापक शियाओयिन क्यू यांच्या मते, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदवीधर झालेल्यांनाही आज नोकरी मिळवणे कठीण जात आहे.
क्यू यांनी एक्सवर याबाबत आपले विचार मांडले आणि म्हटले की, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) नोकरभरतीचे स्वरूप झपाट्याने बदलले आहे. पूर्वी, मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांकडून प्रतिष्ठीत विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात भरती केले जात असे. पदवीधर होण्यापूर्वीच अनेकांना अनेक नोकरीच्या ऑफर मिळायच्या, पण आजची परिस्थिती खूप वेगळी आहे.
या बदलामागील मुख्य कारण एआय आहे. कंपन्या आता ऑटोमेशन आणि कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करत आहेत. मोठ्या संख्येने नवीन पदवीधर किंवा कनिष्ठ अभियंत्यांना कामावर ठेवण्याऐवजी, कंपन्या अनुभवी कर्मचाऱ्यांमध्ये अधिक गुंतवणूक करत आहेत जे थेट एआय सिस्टमवर काम करू शकतात किंवा जटिल प्रकल्प व्यवस्थापित करू शकतात.
याचा अर्थ असा की फ्रेशर्ससाठी पदे कमी झाली आहेत. उमेदवारांना व्यावहारिक अनुभव नसेल तर चांगली शैक्षणिक पार्श्वभूमी देखील पुरेशी नाही. कंपन्या भरती करताना याची अधिक काळजी घेत आहेत.
केवळ पदवी पुरेशी नाही
क्यू यांनी निदर्शनास आणून दिले की विद्यापीठाच्या ब्रँड नावाला पूर्वीसारखे महत्त्व राहिले नाही. भरती करणाऱ्या कंपन्यांना आता वास्तविक जगातील कौशल्यांचा पुरावा हवा असतो. ते अशा उमेदवारांचा शोध घेत आहेत ज्यांनी उत्पादने तयार केली आहेत, ओपन-सोर्स प्रकल्पांमध्ये योगदान दिले आहे, संशोधन प्रकाशित केले आहे किंवा अर्थपूर्ण इंटर्नशिप पूर्ण केली आहे.
सोप्या भाषेत सांगायचे तर, कंपन्या फक्त तुम्ही कुठे शिकलात तेच नव्हे तर तुम्ही काय करू शकता हे पाहू इच्छितात.
ज्या विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासक्रमांवर लक्ष केंद्रित केले त्यांना स्पर्धा करणे कठीण जाऊ शकते. ज्यांनी कॉलेजमध्ये अॅप्स बनवले, एआय टूल्सवर काम केले किंवा प्रकल्प तयार केले त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळण्याची शक्यकता आहे.
सध्या कोणती कौशल्ये महत्त्वाची आहेत?
उद्योगातील ट्रेंडनुसार, सर्वोत्तम एआय ज्ञान, समस्या सोडवण्याची क्षमता आणि प्रत्यक्ष कोडिंगचा अनुभव आवश्यक होत आहे. संवाद कौशल्ये आणि वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची क्षमता देखील नोकरीसाठी महत्त्वाची आहे.
नोकरीचा बाजार बदलत आहे. एआयमुळे केवळ काही कामांमध्येच नव्हे तर कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांच्या अपेक्षादेखील बदलत आहे. आजच्या पदवीधरांसाठी, त्याचे यश त्यांच्या महाविद्यालयाच्या नावावर नाही तर वास्तविक, व्यावहारिक कौशल्ये दाखवण्याच्या त्यांच्या क्षमतेवर जास्त अवलंबून आहे.

