राज्याच्या मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर खात्यांमध्ये केलेल्या विभाजनामुळे हा विस्तार अनेक कारणांमुळे चर्चेत होता. अनेकांची खाती बदलली तर अनेकांची काढून घेतली. यामुळे दुखावलेले मंत्री मुख्यमंत्र्यावर तोफ डागत होते मात्र अनेकांना हा विस्तार सकारात्मक वाटला. खाते वाटप करताना मंत्र्यांच्या संख्येत वाढ केल्यामुळे विभागणी काही प्रमाणात समान पातळीवर आली आहे. त्यामुळे कामाची विभागणी केल्यामुळे दर्जा उंचावेल याची अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. मंत्र्याची संख्या वाढल्यामुळे कामाचा दर्जा उंचावेल? केंद्रीय मंत्रीमंडळात नुकतीच खातेवाटप झाली आणि एक विलक्षण बदल आपल्याला पाहायला मिळाला. जिथे एकाच मंत्र्याच्या हातात अनेक खाती दिली जायची तिथे मंत्र्यांची संख्या वाढवून खात्यांची विभागणी विस्तारीत केली गेली. आता या सगळ्याचा भारताच्या राजकारणावर परिणाम होणार हे निश्चितच आहे. याचे चांगले वाईट परिणामही आपल्याला पाहायला मिळतीलच. परंतु सकारात्मक दृष्टिकोनातून पाहता एकीकडे राजकारणांमुध्ये खातेवाटपाच्या मुद्दय़ावरुन चालणारी धुसफूस कदाचित मंदावेल. आपल्यातील वैमनस्य किंवा नाराजी पाहायला मिळणार नाही. एकाच माणसाच्या हातात कारभार देऊन एक ना धड भाराभार चिंध्या असा स्वरुपात राजकीय स्थिती होण्यापेक्षा खात्यांच्या विस्तारित विभागणीने कामाचे स्वरुप अजूनच बळकट आणि सोपे होईल. प्रत्येकाला आपल्या खात्यात नाविण्यपूर्ण काम करता येईल. अपेक्षा एवढीच आहे की यात भ्रष्ट्राचार होता कामा नये नाहीतर याही वेळी आपल्या पदरी तोटा येईल. शेवटी सरकारचा निर्णय योग्य आहे असे मानून जर या खाते विस्ताराचा, विस्तारित मंत्रीमंडळाचा आपल्या देशाला फायदा होणार असेल तर उत्तमच आहे. सध्याची परिस्थिती म्हणजे नवा गढी नवं राज्य अशी आहे. निलेश अडसूळ, मुंबई विद्यापीठ