व्यवस्थापन आणि कंपनी व त्यामध्ये काम करणारे कर्मचारी यांच्या व्यवहारात सामूहिक स्तरावरील कंपनीचे मूल्यविषयक धोरण आणि वैयक्तिक स्तरावरील कर्मचाऱ्यांचे मूल्यविषयक धोरण यांच्यात परस्परसंबंध असू शकतो का, हा मुद्दा बरेचदा एक प्रश्न या स्वरूपात चर्चिला जातो.या संदर्भात ‘दि चार्टर्ड इन्स्टिटय़ूट ऑफ पर्सोनेल अँड डेव्हलपमेंट’ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या कर्मचारीविषयक अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, या संदर्भात ब्रिटनमध्ये २,०६८ कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण केले असता त्यापैकी बहुसंख्य म्हणजे ५२ टक्के कर्मचाऱ्यांनी आपल्या कामकाजावर आणि कामाच्या दर्जावर कंपनीची मूल्ये व धोरणांचा थेट परिणाम होत असल्याचे नमूद केले. व्यावसायिक मूल्यांपेक्षा व्यवसायातील होणाऱ्या फायद्याला व्यवस्थापन अधिक महत्त्व देते, असेही या कर्मचाऱ्यांनी नमूद केले. या सर्वेक्षणात कंपनीची ध्येयधोरणे व कार्यपद्धतीचे उल्लंघन करण्याबाबतीत असे आढळून आले की, सुमारे ३३ टक्के कर्मचारी कंपनीच्या ध्येयधोरणे आणि कार्यपद्धतीची पायमल्ली करीत असतात. त्यांच्या अशा प्रकारच्या वागणुकीचा कंपनी आणि कर्मचारी या उभयतांच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत असतो. या कर्मचाऱ्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.सहकार्य आणि उत्पादकता यांची सांगड -कर्मचाऱ्यांमधील परस्पर सहकार्याचा त्यांच्या उत्पादकतेशी थेट संबंध असतो, असे ‘अॅडॉब’ या सर्वेक्षण संस्थेतर्फे अलीकडेच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. या सर्वेक्षणात देशांतर्गत व्यावसायिक, संगणक व तंत्रज्ञानविषयक क्षेत्रातील ७५० कंपन्यांमधील ९५० शिक्षित-प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा समावेश होता.सर्वेक्षणातील कर्मचाऱ्यांपैकी ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या मते, त्यांच्या एकूण उत्पादक कामाच्या वेळेपैकी एक तृतीयांश वेळ कामासंदर्भातील कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात जातो. ६२ टक्के कर्मचाऱ्यांचा अधिकांश वेळ अशा कागदपत्रांची छाननी-पडताळणी करण्यामध्ये जातो, तर ४७ टक्के कर्मचाऱ्यांना अशा कागदपत्रांची सुरक्षितता सर्वतोपरी महत्त्वाची वाटत असल्याने त्यांचा सर्वाधिक वेळ अशी कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यामध्ये जातो. या सर्वाचा परिणाम अपरिहार्यपणे कर्मचाऱ्यांच्या उत्पादकतेवर होतो.कामाच्या ठिकाणी तसेच कामाच्या बाबतीत कर्मचाऱ्यांचे परस्परसहकार्य मिळण्याबाबत ५९ टक्के कर्मचाऱ्यांनी असमाधान व्यक्त केले. या कर्मचाऱ्यांच्या मते, कामकाजाशी निगडित कागदपत्रांबाबत सहकाऱ्यांकडून त्यांना सहकार्य मिळत नसल्याचे नमूद करत ५१ टक्के कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाच्या एकूण तासांपैकी अधिकांश वेळ अपुरे सहकार्य आणि समन्वयाअभावी कराव्या लागणाऱ्या अनावश्यक, अनुत्पादक काम करण्यावर जात असल्याचे सांगितले. सुमारे ८० टक्के कर्मचाऱ्यांनी आपला सर्वाधिक वेळ हा वरिष्ठांची स्वाक्षऱ्या घेण्यात जात असल्याचे सांगितले.कामाच्या संदर्भात पुरेसे सहकार्य न मिळणे, समन्वयाचा अभाव आणि कामात सातत्य नसल्यास कामाच्या उत्पादकतेत घट होत असते, या मुद्दय़ावर त्यांचे एकमत झाले आहे.२०१३ : नोकर भरती - ‘लिंक्डइन रिक्रूटिंग ट्रेंडस्’च्या ‘लिंक्डइन टॅलेंटस् सोल्युशन’तर्फे देशातील २५५ कॉर्पोरेट उच्च-पदस्थांसह जागतिक स्तरावरील सुमारे तीन हजार व्यवस्थापकीय स्वरूपाचे काम करणाऱ्या मंडळींचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात भारतासह जागतिक स्तरावर व्यवस्थापक स्तरावरील नेमणुकींचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.सर्वेक्षणात सहभागी झालेल्या भारतीय व्यक्तींनी २०११ च्या तुलनेत २०१२ साली नेमणुकांमध्ये मोठी वाढ झाली असल्याचे सांगितले. अशा मंडळींची निवड करण्यामध्ये मध्यस्थ वा सल्लागार म्हणून काम करणाऱ्या व्यावसायिक सल्लागार कंपन्यांनी आपले व्यावसायिक उद्दिष्ट ६५ टक्क्यांपर्यंत साध्य केले होते.उमेदवारांची निवड करताना त्यांची गुणवत्ता हा महत्त्वाचा निकष धरला जात असल्याचे विविध कंपन्यांनी सांगितले. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सुमारे ४५ टक्के मनुष्यबळ विकास व्यवस्थापकांनी या मुद्दय़ाची पुष्टी केली.कंपन्या केवळ आपल्या व्यावसायिक प्रतिमेची जपणूक करतात, असे नव्हे, तर त्यात सतत सुधारणाही करतात, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. ९० टक्के कंपन्यांनी या संदर्भात विशेष आर्थिक तरतूदही करण्यात येत असल्याचे नमूद केले.