तुकाराम जाधव

यूपीएससीच्या मुख्य परीक्षेची तयारी करत असाल तर नियोजनाला पर्याय नाहीच. ती कला आधी शिकावी लागेल.

यूपीएससी परीक्षेतील तीन टप्पे, व्यापक अभ्यासक्रम, त्यासाठी वाचायची अनेक संदर्भपुस्तके आणि किमान एक वर्षभराचा सातत्यपूर्ण अभ्यास या वैशिष्टय़ांमुळे नियोजित तयारीशिवाय दुसरा मार्ग नाही. परीक्षेचे स्वरूप व व्याप्ती लक्षात घेऊन अभ्यास आणि वेळेचे नियोजन करणे अत्यावश्यक ठरते. किंबहुना पद्धतशीरपणे केलेले नियोजन आणि त्याची प्रभावी अंमलबजावणीच या परीक्षेचा मार्ग सुकर करू शकते.

अर्थात, नियोजनाचा विचार करताना काही महत्त्वपूर्ण मुद्दे लक्षात घेणे गरजेचे ठरते. त्यातील पहिली बाब म्हणजे आपण कोणत्या वर्षी परीक्षा देणार आहोत हे ठरवून त्याआधी किमान एक वर्ष अभ्यासाला सुरुवात करावी लागेल. त्यापेक्षा जास्त वेळ उपलब्ध असेल तर त्याप्रमाणे दीर्घकालीन नियोजन आखता येईल. दुसरी बाब म्हणजे परीक्षेपूर्वी एक वर्ष आधी सुरू करायचा अभ्यास हा शक्यतो पूर्णवेळ स्वरूपाचा असावा. म्हणजे या परीक्षेच्या तयारीच्या पहिल्या वर्षभरात पूर्णपणे परीक्षेच्या या अभ्यासावरच लक्ष केंद्रित करावे. अन्यथा या परीक्षेच्या तयारीस योग्य न्याय देता येणार नाही. अभ्यासाचे वर्ष निश्चित झाल्यावर हाती घ्यायची तिसरी बाब म्हणजे प्राथमिक तयारी. मुख्य परीक्षेच्या अभ्यासाचे सखोल व सविस्तर वेळापत्रक तयार करावे. त्या अंतर्गत मुख्य परीक्षेसाठी साधारणत: सात-आठ महिने तर पूर्वपरीक्षेसाठी चार महिन्यांचा कालावधी निर्धारित करावा.

चौथी बाब म्हणजे मुख्य परीक्षेसाठी राखीव आठ महिन्यांचा आणि पूर्वपरीक्षेसाठी राखीव चार महिन्यांच्या कालखंडाचे विषय, अभ्यासक्रमानुसार सखोल नियोजन करावे. यात कोणता विषय आधी घ्यायचा, त्यास किती वेळ द्यायचा, त्यानंतर कोणता विषय व त्याचा अभ्यासक्रम अभ्यासून होईल या पद्धतीने वेळेची विभागणी करावी.

पाचवी बाब म्हणजे दैनंदिन आणि आठवडाभराचे नियोजन बनवावे. यात दररोज एक अथवा दोन विषय अभ्यासायचे की आठवडा तीन-तीन दिवसांत विभागून त्या तीन दिवसांत सुरुवातीला एक आणि नंतर एक असे दोन विषय अभ्यासायचे हे ठरवावे. म्हणजे दिवस विभागून अथवा आठवडा विभागून विषयांचा अभ्यास करता येतो. त्याखेरीज वर्तमानपत्रांच्या वाचनासाठी दररोज दोन तासांचा कालावधी निर्धारित करणे महत्त्वाचे आहे. त्याखेरीज नियतकालिके आणि भारत वार्षकिीसारख्या चालू घडामोडीवरील संदर्भाच्या वाचनासाठी (एकंदर चालू घडामोडीसाठी) वर्तमानपत्रांच्या वेळेशिवाय आठवडय़ातील एक दिवस राखीव ठेवावा. अन्यथा मासिके आणि वार्षकिीसारख्या संदर्भपुस्तकांचे वाचन करणे अवघड जाईल.

नियोजन प्रक्रियेतील पुढील बाब म्हणजे केलेल्या अभ्यासाची व्यवस्थितपणे उजळणी होईल, याची खबरदारी होय. अनेक विषय, विविध पुस्तके आणि वर्तमानपत्रे-नियतकालिकांचे वाचन करायचे असल्यामुळे अभ्यासून झालेला विषय किमान दोन वेळा तरी पुन्हा वाचला गेला पाहिजे, याची काळजी घ्यावी. मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेत उजळणीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण त्याशिवाय अभ्यासात नेमकेपणा, अचूकता, प्रभावीपणा याची हमी देता येणार नाही. म्हणूनच पुरेशा उजळणीद्वारे अभ्यासाचे मजबुतीकरण करण्यावर भर दय़ावा.

परीक्षेच्या स्वरूपानुसार त्या त्या टप्प्यात सराव चाचण्या सोडवण्यासाठी वेळ राखीव ठेवणे निर्णायक ठरते. सरावचाचण्यांद्वारेच त्या त्या टप्प्यासाठी आवश्यक क्षमता व कौशल्ये विकसित करता येतात. आपल्या तयारीतील कच्चे दुवे शोधून त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करता येतात आणि अभ्यासात परीक्षाभिमुखतेची हमी देता येते. त्यामुळे जसजसा अभ्यास पूर्ण होत जाईल त्याप्रमाणे प्रारंभी विभागावर आणि नंतर संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सराव चाचण्या सोडवाव्यात. परीक्षेसाठी आवश्यक वेळेचे नियोजन आणि आपल्या उत्तरातील नेमकेपणा, अचूकता आणि प्रभावीपणा यात टप्प्याटप्प्याने सुधारणा करण्यावर भर द्यावा.

अभ्यासाचे नियोजन करताना मुख्य परीक्षेच्या तयारीनेच आपल्या अभ्यासाची सुरुवात करावी. त्यानंतरच पूर्वपरीक्षेचा अभ्यास करावा. आपल्या अभ्यासात कोणत्याही एका विषयाला अनावश्यक जास्त वेळ किंवा कमी वेळ देणे शक्यतो टाळावे. त्याविषयाचे परीक्षेतील महत्त्व, अभ्यासक्रम, त्यासाठी वाचायची संदर्भपुस्तके आणि संबंधित विषयासंदर्भातील आपली स्थिती लक्षात घेऊनच प्रत्येक विषयास पुरेशा प्रमाणात वेळ निर्धारित करावा. म्हणजेच अतिशय व्यावसायिकपणे अभ्यासाचे नियोजन करणे गरजेचे ठरते.

त्याचप्रमाणे कोणत्याही विषयाचा अभ्यास सुरू केल्यानंतर प्रारंभी तो विषय समजून घेण्यावर भर द्यावा. त्या दृष्टीने विचार करता संबंधित विषयातील संकल्पना आणि कळीचे मुद्दे याच्या आकलनावर भर द्यावा. हे करताना आपल्या वाचनात जी विपुल माहिती सापडते ती अधोरेखित करावी, त्यावर प्रक्रिया करून मुदय़ांच्या स्वरूपात मांडून ठेवावी. मात्र पहिल्या वाचनावेळीच ती लक्षात राहिली पाहिजे असा अट्टहास धरू नये. कारण प्रथम संकल्पना, विचार, कळीचे मुद्दे आणि अंतिमत: माहिती अशा क्रमाने अभ्यास करावा. माहितीप्रधान भाग एकदा वाचल्यानंतर लक्षात राहीलच असे नाही. त्याशिवाय परीक्षा जसजशी जवळ येईल त्या काळात अशा माहितीचे उजळणीद्वारा मजबुतीकरण करता येते. प्रारंभीच कोणत्याही विषयातील माहितीच्या जंजाळात न अडकता संबंधित विषयाचे आकलन करण्यावर भर दय़ावा. एका बाजूला संकल्पनात्मक स्पष्टीकरणानंतरच पुढील अभ्यास करावा आणि दुसऱ्या बाजूला माहितीप्रधान भागाच्या अभ्यासाची उजळणीद्वारा विशेष काळजी घ्यावी.

त्याशिवाय प्रत्येक विषयाशी संबंधित चालू घडामोडीची तयारी समांतरपणे सुरू ठेवावी. उपरोक्त परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे वर्तमानपत्रे, नियतकालिके, वार्षकिी इ. च्या वाचनाद्वारे अभ्यासक्रमाशी संबंधित समकालीन आयामाची आपल्या तयारीत पुरेशा प्रमाणात दखल घेतली जात आहे हे पाहावे.

शेवटची बाब म्हणजे या परीक्षेच्या तयारीसाठी नियोजन गरजेचे आहे यात शंका नाही. मात्र आपण आखलेले नियोजन हे जाचक नव्हे तर लवचीक असावे. प्रत्यक्ष तयारी करतांना विचारात न घेतलेले मुद्दे लक्षात आल्यास त्यानुसार बदल करण्यासाठी नियोजनात लवचीकता हवी. अर्थात दरदिवशी किंवा दर आठवडय़ाला बदलण्याइतके ते अतिलवचीकही नसावेत. थोडक्यात आपले नियोजन व्यावहारिक असावे याची खबरदारी घ्यावी.