रोहिणी शहा

वस्तुनिष्ठ पेपरमध्ये मराठी व इंग्रजी विषयांसाठी प्रत्येकी ५० गुणांसाठीचे बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतात. दोन्ही भाषांसाठी व्याकरणावर प्रत्येकी ४५ आणि उताऱ्यावरील आकलनाचे प्रत्येकी ५ प्रश्न विचारण्यात येतात. १०० गुणांसाठी १०० प्रश्न ६० मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत. पेपरचा स्तर पदवी परीक्षेचा राहणार असल्याचे अभ्यासक्रमामध्ये नमूद करण्यात आले आहे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केल्यास योग्य प्रकारे तयारी केली तर हा पेपर आत्मविश्वासाने सोडविता येईल अशा काठिण्य पातळीचा असल्याचे दिसते.

या पेपरच्या अभ्यासक्रमाचे व्याकरण, म्हणी-वाक्प्रचार आणि आकलन असे तीन भाग आहेत. व्याकरणावरील प्रश्नांची तयारी करताना दोन्ही भाषांच्या व्याकरणाचे नियम समजून घेणे सगळ्यात महत्त्वाचे आहे.

व्याकरण

* मराठीतील विभक्ती प्रत्ययांचे टेबल किंवा इंग्रजीमधील काळ व प्रयोगांच्या वाक्यरचनेचा टेबल पाठच असायला हवेत.

* इंग्रजीतील वाक्य रूपांतरणाचे प्रश्न वाक्यरचनेचे नियम पक्के माहीत असतील तर नक्कीच सोडवता येतात. मात्र नियम आणि त्यांच्या चौकटी फक्त माहीत असून उपयोगाच्या नाही. त्यांचा वेगवेगळ्या उदाहरणांशी संबंध ओळखता येणे महत्त्वाचे आहे. व या नियमांचा वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये शब्दरचना / वाक्यरचना करताना कशा प्रकारे वापर करण्यात येतो हे समजून घेणे आवश्यक आहे.

* मराठीतील संधी, समास, अलंकार, शब्दरचना, काळ, वाक्य पृथक्करण अशा बाबींचा स्वतंत्र अभ्यासक्रमामध्ये उल्लेख केलेला नसला तरी त्यांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे व्याकरण या व्याख्येत जे येते त्याबाबत आपल्याला माहिती असणे आणि ही माहिती नेमकी व अचूक असणे हे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक आहे.

* नियम व्यवस्थित समजून घेणे आणि त्यांचा वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये वापर करण्याचा सराव करणे हा या भागाच्या तयारीसाठीचा सर्वोत्तम मार्ग आहे.

* समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठीचा शब्द हा भाग आकलनाचा असला तरी व्याकरणाच्या स्वतंत्र भागातही यावर प्रश्न विचारले आहेत.

म्हणी व वाक्प्रचार

* म्हणी व वाक्प्रचार यावरील प्रश्न सोडविण्यासाठी अवांतर वाचन आणि सामान्यज्ञान यांची खूप मदत होते. अवांतर वाचनामुळे नजरेखालून जाणाऱ्या म्हणी, वाक्प्रचार यांचा इतर प्रसंगांशी संबंध जोडता येणे सामान्यज्ञानामुळे शक्य होते. तयारीच्या काळात अवांतर वाचनासाठी वेळ काढणे शक्य नसेल तर म्हणी, वाक्प्रचार यांचे संकलन असलेले छोटेसे पुस्तक किंवा िपट्र आऊट सोबत बाळगायला हवे. त्यातील म्हणी, वाक्प्रचार वाचून त्यांचा अर्थ समजून घ्यायला हवा. अर्थाची उकल झाली की त्यांचा उदाहरणांमध्ये वापर करणे किंवा केलेला वापर योग्य आहे की नाही हे कळणे सोपे होते.

आकलन

आकलनाच्या बाबतीतले प्रश्न चार प्रकारे विचारले जातात. भाषांतर, सारांश लेखन, आशय लेखन आणि उताऱ्यावरील प्रश्न. यातील उताऱ्यावरील प्रश्नांचा समावेश वस्तुनिष्ठ पेपरमध्ये करण्यात आला आहे. दोन्ही भाषांच्या प्रत्येकी ५ गुणांसाठीचे प्रश्न उताऱ्यावर आधारित असतात. हे प्रश्न सोडविताना पुढील बाबी लक्षात घ्याव्यात –

* १० गुणांसाठी प्रश्न विचारण्यात येणार असले तरी उपलब्ध वेळ, उताऱ्याची लांबी व काठीण्य पातळी यांचा विचार करता वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरते. उतारा नीट समजून घेतल्याशिवाय त्यांची योग्य उत्तरे सापडणार नाहीत अशी काठीण्य पातळी असते हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे पहिल्या वाचनातच बहुतांश उतारा समजेल अशा प्रकारे शांतपणे वाचणे आवश्यक आहे.

* यासाठी आधी प्रश्न पाहून मग उतारा वाचावा. वाचनावेळी प्रश्नाशी संबंधित वाक्ये अधोरेखित करता येतील. जेणेकरून प्रश्न सोडविताना संबंधित वाक्य पटकन सापडेल.

* उताऱ्याला शीर्षक देणे, लेखकाचा हेतू, उद्देश अशा प्रकारचे प्रश्न याबाबत विचारले जातात. यासाठी एकमेकांशी साधम्र्य दाखवणारे पर्यायच दिले जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे गोंधळ उडू शकतो. नकारात्मक गुणपद्धतीचा विचार करता हे प्रश्न खूप काळजीपूर्वक सोडवायला लागतील.

* समानार्थी/विरुद्धार्थी शब्दांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रश्नातील शब्दाचा अर्थ नेमकेपणाने माहीत असायला हवा. मराठीतील शब्दांच्या ऱ्हस्व-दीर्घ वेलांटी/उकारांमधीलबदलामुळे तसेच काना/मात्रा/वेलांटीची जागा बदलल्याने शब्दांचे अर्थ बदलतात हे लक्षात ठेवायला हवे. उदा. पाणी (हात)- पाणी (जल). इंग्रजीमधील एकसारख्या उच्चाराचे/स्पेिलगचे पण वेगळे अर्थ असणारे शब्द चकवणारे ठरतात. उदा. Expect आणि except या शब्दामध्ये गोंधळ उडू शकतो. त्यामुळे प्रश्नातील शब्द काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

या पेपरमध्ये व्याकरणाचे नियम सरळसोटपणे वापरून भागत नाही. वाक्याचा नेमका अर्थ समजून घेतल्यावर आणि भाषेतील वेगवेगळ्या अर्थछटा माहीत करून घेतल्या तर प्रश्न व्यवस्थित सोडविता येतील.