बँक आणि विमा क्षेत्रातील प्रवेशपरीक्षांचे स्वरूप नेमके कसे असते, याची दिलेली सविस्तर माहिती-गामी वर्ष बँकिंग आणि विमा क्षेत्रांत भरघोस रोजगार संधी उपलब्ध करून देणारे वर्ष ठरत आहे. चालू वर्षांत स्टेट बँक, इतर राष्ट्रीयीकृत बँका, एलआयसी आदींनी नोकरभरतीसाठी अनेक जाहिराती दिल्या होत्या, त्यामधील काही नोकरभरती पूर्ण झाली असून काही बँका व विमा कंपन्यांमधील नोकरभरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यांत आहे. गेल्या महिन्यापासून युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीत ३२३ प्रशासकीय अधिकाऱ्यांची आणि ६८४ साहाय्यकांची, तर न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये ५०९ प्रशासकीय अधिकाऱ्यांची आणि १५३६ साहाय्यकांची भरतीप्रक्रिया सुरू झाली. सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या साहाय्यक बँकांमध्ये ६४२५ क्लर्क भरतीची तर ‘आयबीपीएस’द्वारे माहिती-तंत्रज्ञान अधिकारी, कृषी अधिकारी, राजभाषा अधिकारी, विधी अधिकारी, मनुष्यबळ विकास अधिकारी आणि विपणन अधिकारी भरती परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. या सर्व परीक्षा येत्या वर्षांच्या जानेवारी ते मार्च या कालावधीत वेगवेगळ्या टप्प्यांत होतील.आज मोठय़ा प्रमाणावर बँका आणि विमा कंपन्यांचा शाखाविस्तार होत असून नोकरभरतीत युवा आणि तंत्रज्ञानाची जाण असणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरती करण्याकडे त्यांचा कल दिसून येतो. नोकर भरती करताना विविध बँका आणि विमा कंपन्या राष्ट्रीय पातळीवर प्रवेश परीक्षा घेतात. या लेखी परीक्षेत जे उमेदवार उत्तीर्ण होतात, त्यांना मुलाखतीला बोलावून उमेदवारांची निवड केली जाते. ही प्रवेश परीक्षा कला, वाणिज्य, विज्ञान इत्यादी विद्याशाखांच्या पदवीधरांसाठी खुली असून विशेष अधिकारी पदे वगळता इतर सर्व पदांसाठी पदवीधर विद्यार्थी अर्ज करू शकतात. अनेक विद्यार्थ्यांनी निश्चितच या परीक्षांसाठी अर्ज केलेला असेल. या परीक्षेचे स्वरूप नेमके कसे असते, हे पाहूयात. बँकिंग व विमा क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम जवळपास सारखाच असतो. मात्र, त्यातील प्रश्नांची काठिण्यपातळी वेगवेगळी असते. या परीक्षांचा अभ्यासक्रम विचारात घेता सांख्यिकी अभियोग्यता, बुद्धिमापन चाचणी, इंग्रजी, संगणक अभियोग्यता आणि सामान्य ज्ञान हे घटक परीक्षेत महत्त्वाचे असतात.० न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीच्या साहाय्यक व प्रशासकीय अधिकारी पदाच्या भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेच्या साहाय्यक (Assistant) पदासाठीचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे- बुद्धिमापन- ५० गुण, इंग्रजी- ५० गुण, सामान्य ज्ञान- ५० गुण, सांख्यिकी अभियोग्यता- ५० गुण आणि संगणक- ५० गुण. हे २५० गुण पुढे ३५ गुणांमध्ये रूपांतरित केले जातील. त्यानंतर १५ गुणांसाठी मुलाखत घेतली जाणार आहे. अशा पद्धतीने ५० गुणांच्या (३५+१५) आधारे निवड यादी तयार केली जाईल. याव्यतिरिक्त प्रत्येक पात्र उमेदवाराची संगणक अभियोग्यता चाचणीही घेतली जाईल. मात्र, त्यासाठी गुण दिले जाणार नाहीत. ती केवळ योग्यता तपासण्यासाठी असेल. तर प्रशासकीय अधिकारी पदासाठी सर्वसाधारण अधिकारी (Generalist) व विशेष अधिकारी (Specialist) या पदासाठी होणारी भरती परीक्षा २०० गुणांसाठी असून सर्वसाधारण अधिकारी परीक्षेत बुद्धिमापन, इंग्रजी, सामान्य ज्ञान व सांख्यिकी अभियोग्यता हे घटक प्रत्येकी ५० गुणांसाठी आहेत. विशेष अधिकारी परीक्षेत बुद्धिमापन-४० गुण, इंग्रजी- ४० गुण, सामान्य ज्ञान- ४० गुण, सांख्यिकी अभियोग्यता- ४० गुण व त्या-त्या प्रकारच्या पदासाठी आवश्यक व्यावसायिक ज्ञानाची ४० गुणांची परीक्षा असते. या दोन्ही परीक्षांसाठी १२० मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार असून, परीक्षा व मुलाखतीचे भारांकन (८०:२०) असे आहे.० युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीही प्रशासकीय अधिकारी आणि साहाय्यक पदासाठी भरती परीक्षा घेत असून यामधील प्रशासकीय अधिकारी पदांसाठी भरती करताना प्रवेश परीक्षा (Screening Test), मुख्य परीक्षा, डिस्क्रीप्टीव्ह टेस्ट व त्यानंतर मुलाखत असे टप्पे असतील. प्रवेश परीक्षेसाठी १०० गुणांची बहुपर्यायी ऑनलाइन परीक्षा असून त्यामध्ये इंग्रजी (३० गुण), सांख्यिकी अभियोग्यता (३५ गुण) व बुद्धिमापन (३५ गुण) असे घटक समाविष्ट करण्यात आले आहेत. त्याकरता एकूण तासभराचा वेळ दिलेला आहे. या परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. हीदेखील ऑनलाइन परीक्षा असेल. जनरॅलिस्ट पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा बुद्धिमापन- ५० गुण, इंग्रजी- ४० गुण, सांख्यिकी अभियोग्यता- ५० गुण, वित्तीय क्षेत्राशी निगडित सामान्य ज्ञान- ४० गुण, संगणक- २० गुण अशा या २०० गुणांच्या ऑनलाइन परीक्षेकरता दोन तासांचा अवधी देण्यात येतो. विशेष प्रशासकीय अधिकारी पदासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत बुद्धिमापन- ४० गुण, इंग्रजी- ४० गुण, सांख्यिकी अभियोग्यता व संगणक (एकत्रित)- ४० गुण, सामान्य ज्ञान (वित्तीय क्षेत्राबाबत)- ४० गुण व व्यावसायिक ज्ञान- ४० गुण अशी २०० गुणांची दोन तासांचीच परीक्षा असते. त्यानंतर ३० मिनिटांची इंग्रजीच्या आकलनाची (डिस्क्रिप्टिव्ह) परीक्षा घेतली जाते. त्यामध्ये निबंधलेखन, पत्रलेखन, सारांश लेखन आणि तत्सम बाबींवर दोन प्रश्न दिले जातात. त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. प्रत्येक प्रवर्गात उपलब्ध असलेल्या जागांच्या तीन पट विद्यार्थी गुणानुक्रमे मुलाखतीसाठी बोलावले जातात. ही यादी तयार करण्यासाठी डिस्क्रिप्टिव्ह पेपरचे गुण गृहीत धरले जाणार नाहीत. मात्र निवडीसाठी त्याचा संदर्भ असणार आहे. युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या साहाय्यक (Assistant) पदाच्या भरती परीक्षेत सुरुवातीस ऑनलाइन परीक्षा, त्यानंतर मुलाखत व संगणक हाताळणी परीक्षा घेतली जाणार आहे. ऑनलाइन टेस्टसाठी बुद्धिमापन चाचणी- ५० गुणांसाठी ४० प्रश्न, इंग्रजी- ५० गुणांसाठी ४० प्रश्न, सांख्यिकी अभियोग्यता- ५० गुणांसाठी ४० प्रश्न, सामान्य ज्ञान- ५० गुणांसाठी ४० प्रश्न आणि संगणक- ५० गुणांसाठी ४० प्रश्न दिले जातील. या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवार निवडीसाठी न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीच्या मानकाप्रमाणेच (३५+१५) निकष लावला जाईल.०‘आयबीपीएस’द्वारे विशेष अधिकारी (माहिती-तंत्रज्ञान अधिकारी, कृषी अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, मनुष्यबळ विकास व विपणन अधिकारी) या पदासाठी फेब्रुवारी २०१५ मध्ये परीक्षा घेतली जाणार असून त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे- विधी अधिकारी व राजभाषा अधिकारी भरतीपरीक्षेसाठी बुद्धिमापन- ५० गुण, इंग्रजी- २५ गुण, सामान्य ज्ञान (बँकिंग)- ५० गुण व व्यावसायिक ज्ञान- ७५ गुण. एकूण २०० गुणांची परीक्षा आहे. माहिती-तंत्रज्ञान अधिकारी, कृषी अधिकारी, मनुष्यबळ विकास व विपणन अधिकारी या पदांसाठी बुद्धिमापन- ५० गुण, इंग्रजी- २५ गुण, सांख्यिकी अभियोग्यता- ५० गुण व संबंधित व्यावसायिक ज्ञान- ७५ गुण असे घटक समाविष्ट आहेत. दोन्ही परीक्षा २०० गुणांच्या असून, त्यासाठी १२० मिनिटांचा वेळ दिलेला आहे. या परीक्षा बहुपर्यायी असून ऑनलाइन घेतल्या जातील. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जातील. त्यामध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण कमी केले जातील. मात्र, उत्तर लिहिलेले नसेल तर गुण कापले जाणार नाहीत. ऑनलाइन परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना कट-ऑफ मार्क्सच्या यादीनुसार मुलाखतीला बोलावले जाईल. मुलाखत १०० गुणांसाठी असून २०० गुणांची ऑनलाइन परीक्षा आणि १०० गुणांची मुलाखत असे ३०० गुणांचे १०० गुणांत रूपांतर करून (८०:२०) उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. ऑनलाइन परीक्षेकरता किमान पात्रता गुण खुल्या संवर्गासाठी ४० टक्के तर मागासवर्गीयांसाठी ३५ टक्के असले तरी अंतिम निवड गुणांच्या आधारे केली जाईल. उपलब्ध पदसंख्या आणि उत्तीर्ण उमेदवार यांचे प्रमाण लक्षात घेत अंतिम निवड यादी तयार केली जाईल.० येत्या वर्षांतील सर्वात मोठी नोकरभरती सध्या स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे केली जात असून साहाय्यक बँकांमध्ये ६,४२५ क्लर्क भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यासाठीची परीक्षा जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात आणि फेब्रुवारीच्या पहिल्या/दुसऱ्या आठवडय़ात होत आहे. या परीक्षेचा अभ्यासक्रम इतर बँकिंग व विमा कंपन्यांच्या अभ्यासक्रमासारखाच असला तरी त्यामध्ये फरकही आहे. या भरतीसाठी २०० गुणांची दोन तास १५ मिनिटे कालावधीची ऑनलाइन, बहुपर्यायी परीक्षा घेतली जाईल. यामध्ये सामान्य ज्ञान, इंग्रजी, सांख्यिकी अभियोग्यता आणि बुद्धिमापन हे विषय प्रत्येकी ४० गुणांसाठी असून संगणक व विपणन यासाठी एकत्रित ४० गुण निश्चित करण्यात आलेले आहेत. ऑनलाइन परीक्षेमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील, त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल आणि त्यामधून उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.आगामी वर्षांतील या सर्व परीक्षांचे स्वरूप विचारात घेता असे दिसून येते की, पदवीधर विद्यार्थ्यांना ही एक खूप मोठी संधी असून थोडय़ाफार फरकाने सर्व परीक्षांचे स्वरूप आणि अभ्यासक्रम सारखाच आहे. सर्व परीक्षांसाठी केवळ इंग्रजी आणि हिंदी ही दोनच माध्यमे आहेत. इंग्रजी विषय वगळता सर्व विषयांसाठी ही दोन माध्यमे उपलब्ध आहेत. सर्व परीक्षा ऑनलाइन असून त्या बहुपर्यायी स्वरूपाच्या आहेत. विमा कंपनीतील काही पदांसाठी मात्र विश्लेषणात्मक परीक्षा घेतली जाणार आहे. यातील इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत व्याकरणावर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. बुद्धिमापन चाचणीत वर्गीकरण, चिन्हे, आकृत्या, नातेसंबंध, वेग, काळ, क्रमांक व्यवस्था, कोिडग-डिकोिडग, बैठक व्यवस्था, निर्णय, तर्कशास्त्र, कोडी इत्यादी घटकांवरील प्रश्नांचा समावेश आहे. सांख्यिकी अभियोग्यता चाचणीत क्रमांक, मालिका, आलेख, तक्तयांविषयी प्रश्न, सांख्यिकी कोष्टकांवरील प्रश्न, संभाव्यता, टक्केवारी, वारंवारिता, प्रमाण, नफा-तोटा, व्याज, चक्रवाढ व्याज, वेळ व अंतर, आलेख, तक्ते, वर्ग-वर्गमूळ इत्यादी प्रश्न विचारले जातात. पदांनुसार प्रश्नांची काठिण्य पातळी वेगवेगळी असते. संगणक ज्ञानाबाबतचे प्रश्न हे सामान्यत: एमएस ऑफिस, ऑपरेटिंग सिस्टीम, सॉफ्टवेअर व हार्डवेअर, डेटाबेस, कम्युनिकेशन, इंटरनेट, थ्रीजी, फोर जी, वाय-फाय, ई-मेल, व्हायरस, अॅन्टिव्हायरस, सायबर कायदा, नेटवर्किंग इत्यादी घटकांवर अवलंबून असतात. संगणक व दळणवळण क्षेत्रातील नवीन प्रणालींवरही काही प्रश्न विचारले जातात.या सर्व परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान हा घटक थोडासा वेगळा असून, बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांमध्ये व्यापारी बँका, विकास बँका, र्मचट बँका, सहकारी बँका, बँकिंग व्यवसायाची तत्त्वे-व्यवहार, ई-बँकिंग, रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया, मुद्राविषयक धोरण, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था, चलनक्षम दस्तऐवज, पेमेंन्ट नेटवर्क, एटीएम, इंटरनेट पॅकिंग, एमआयसीआर चेक, सीटीएस चेक, व चालू बँक धोरण या घटकांवर अधिक भर असतो. विमा कंपन्यांच्या परीक्षांमध्ये बँकिंगमधील काही घटकांबरोबरच भांडवलबाजार, नाणेबाजार, आयआरडीए, विमा व्यवसाय, विमा धोरण, परकीय थेट गुंतवणूक या संबंधित प्रश्न विचारले जातात. याशिवाय काही प्रश्न भारतीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, राजकोषीय धोरण, आंतरराष्ट्रीय व्यापार, औद्योगिक क्षेत्र, जागतिकीकरण, शेती व्यवसाय, विविध पुरस्कार, स्पर्धा, नोबेल पारितोषिके, पुस्तक व लेखक आणि चालू घडामोडींवर विचारले जातात.‘विशेष अधिकारी’ पदाच्या परीक्षांकरता या घटकांव्यतिरिक्त व्यावसायिक ज्ञानाची चाचणी घेतली जाते. यामधील घटक पदानुसार वेगवेगळे असतात. माहिती-तंत्रज्ञान अधिकारी पदासाठी माहिती-तंत्रज्ञान विषय, विधी अधिकारी पदासाठी कायद्यामधील विविध घटक, मनुष्यबळ विकास अधिकारी पदासाठी मनुष्यबळ व्यवस्थापनातील घटक अशी रचना असते. बँकिंग व विमा क्षेत्रात नोकरीच्या उपलब्ध झालेल्या संधींचा लाभ युवावर्गाने करून घेण्याची ही वेळ आहे. योग्य दिशेच्या प्रयत्नांनी या विविध प्रवेश परीक्षांमध्ये यश मिळवणे सहजशक्य आहे.