स्पर्धा परीक्षा हा एक कैफ आहे. जोपर्यंत आपण यशस्वी होत नाही, तोपर्यंत तो उतरत नाही. स्पर्धा परीक्षेसंबंधी एक वास्तव आहे, ते समजून घेणे आवश्यक आहे. खरं तर आयुष्यात पदोपदी स्पर्धा असते. स्पर्धातील सहभाग हा घडवणारा, जीवनाला समृद्ध करणारा अनुभव आहे. जर या परीक्षेत यश मिळाले तर प्रशासकीय सेवेत प्रवेश करता येतो. समाजासाठी धोरणे राबविण्याचे काम समाधान देणारे असतेच, त्यासोबत आर्थिक स्थर्य, करिअरची सुरक्षितता येते. मात्र, खूप प्रयत्न करूनही अपयश आलेच तर अभ्यास वाया जात नाही, तो आयुष्यभर कामी येतो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि या अभ्यासाचा अनुभव आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बळ देतो.
यूपीएससीच्या अंतिम निकालात अपयशी ठरलेल्या माझ्या एका मित्राला समजावताना मी एकदा म्हणालो होतो, ‘हे अपयश म्हणजे तुझे जीवन नाही.’ तेव्हा तो म्हणाला, ‘मी माझ्या आयुष्यात फक्त आयएएस होण्याचं स्वप्न पाहिलं, मी त्याच्यासाठीच जगलो, मी अपयशी ठरलो आहे, आज आयुष्यात पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटतंय. आयुष्य नीरस झालंय, गेल्या कित्येक दिवसांपासून मी या प्रश्नाचं उत्तर शोधतो आहे, खरंच स्पर्धापरीक्षेत अपयशी ठरलो, म्हणजे आयुष्यात अपयशी ठरलो असे आहे का?’  याचं उत्तर आहे – ‘नक्कीच नाही.’
स्पर्धा परीक्षा ही मुळात वेगवेगळ्या टप्प्यांवरची परीक्षा, निवडप्रक्रिया अशी सुमारे एक ते दीड वर्ष चालते. अभ्यासाचे एक वर्ष धरले तर उमेदीची अडीच ते तीन वर्षे. त्यात दुसरा किंवा तिसरा प्रयत्न असेल तर स्पर्धा परीक्षेद्वारे निवडप्रक्रिया ही जवळजवळ पाच वष्रे चालणारी, काही जणांच्या बाबतीत हा काळ जास्त वर्षांचा असण्याची शक्यता असते आणि एवढं केल्यानंतरही यश मिळाले तर ठीक, परंतु, अपयशी ठरलो तर निराशा येणे साहजिकच आहे. कारण उमेदीची वष्रे निघून गेलेली असतात, त्यातही आपल्या मित्रांची निवड झाली व आपली झाली नाही तर अपयश जिव्हारी लागणारे असते.
दरवर्षी चार ते साडेचार लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात, त्यातही जागांची संख्या जास्तीत जास्त हजारांपर्यंत असते. गणिताच्या कोणत्याही नियमाचा आधार घेतला, तरी असं होतं की काही चांगल्या मुलांनाही अंतिम यादीत स्थान मिळत नाही.
एका विशिष्ट मर्यादेपेक्षा उत्तम तयारी करूनही जर यश मिळाले नाही, तरी निराश होण्याचे काही कारण नाही. जीवन हे यूपीएमसी, एमपीएससी किंवा अन्य कोणत्याही तात्कालिक यश अपयशाहून खूप मोठे आणि मोलाचे आहे.
यासाठी स्पर्धापरीक्षेची तयारी लवकरात लवकर सुरू करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही जर पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षांपासूनच अभ्यासाला सुरुवात केलीत, तर पदवी मिळेपर्यंत बराच अभ्यास झालेला असतो व त्यानंतर एक वर्ष अभ्यासाची एक विशिष्ट पातळी गाठली जाते आणि यश मिळण्याची शक्यता वाढते. अभ्यास करताना आपले पदवीनंतरही शिक्षण सुरू ठेवावे. उमेद न सोडता, प्रत्येक प्रयत्नातून शिकत यशस्वी होण्यासाठी निरंतर प्रयत्न चालू ठेवावेत.
स्पर्धा परीक्षेत यश नक्कीच मिळेल, हे मात्र सांगता येत नाही, किंबहुना ज्याला स्पर्धा परीक्षा कळली तो मात्र या परीक्षेची खात्री देऊ शकणार नाही, यश मिळविण्यासाठी प्रयत्न कमी न होऊ देता एका पर्यायी करिअरचे नियोजन करून ठेवले तर जास्त चांगले, हवंतर त्याला Plan B म्हणा. तुमच्यावर या Plan B ची वेळ येऊ नये, अशी मात्र मनापासून इच्छा आहे.
संघ लोकसेवा आयोगाच्या किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तुमची निवड व्हावी, तरीही पर्यायी करिअरच्या तयारीचा शासकीय सेवेतही, आयुष्यातही उपयोग होतो.
बऱ्याच वेळा एक प्रश्न विचारला जातो, काम करत तयारी शक्य आहे का, याचे उत्तर जरा अवघड आहे, कारण प्रत्येकाला लागू पडेल असे उत्तर देणे कठीण असते. मात्र, जर आपण एवढय़ा मोठय़ा जबाबदारीच्या पदाची अपेक्षा करत असू, तर मग दिवसाचे कमीत कमी ८ ते १२ तास झोकून देऊन अभ्यास करायलाच हवा.
जीवन प्रत्येकाच्या वाटय़ाला वेगवेगळे आलेले असते, काहींसाठी आयुष्य हे फारच सोपे असते, मात्र काहींना आयुष्यात गरिबी, आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागतो. त्यांना काम करण्याशिवाय पर्यायही नसतो. तुम्ही पूर्ण वेळ देऊन अभ्यास केला की नोकरी करत अभ्यास केला, याला महत्त्व नाही. तुम्ही दिल्लीत जाऊन अभ्यास केला की एखाद्या झाडाखाली बसून केला यालादेखील महत्त्व नाही. महत्त्वाचे एवढेच आहे की तुमचा अभ्यास होणे आवश्यक आहे, शक्यतो पूर्ण वेळ अभ्यास करणे आवश्यक आहे, मात्र घरच्या जबाबदारीमुळे नोकरी करण्याची वेळ आली तर धीर न सोडता मिळेल तेवढय़ा वेळेत अभ्यास करावा, मात्र परीक्षेच्या पहिल्यांदा देण्यापूर्वी किंवा पहिला प्रयत्न झाल्यानंतर एक वर्ष पूर्ण वेळ अभ्यास अत्यंत आवश्यक आहे.
पहिल्या प्रयत्नात जर यश नाही मिळाले तर प्रयत्न सोडून न देता चुकांचा आढावा घ्यावा. आपल्यातील उणिवा दूर करण्यासाठी ज्येष्ठ तज्ज्ञ किंवा मित्र परिवाराबरोबर चर्चा करावी. अभ्यास साहित्य अपडेट करून घ्यावे. तोच पेपर थोडासा अभ्यास करून सोडवून पाहवा, जर आपण मुख्य परीक्षेच्या टप्प्यावर अपयशी झालो असलो, तर आपण का अपयशी ठरलो, याची कारणमीमांसा करावी, मुख्य परीक्षेत शब्दमर्यादा आपण पाळली होती का? निबंधाचा पेपर लिहिताना काही अडचणी आल्या का? पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुख्य परीक्षेला गेल्यानंतर आपण फाजील आत्मविश्वासात पेपर लिहिला होता का? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला पुढच्या प्रयत्नांसाठी उपयुक्त ठरतात. मागील प्रयत्नांत झालेल्या चुका दूर करून पुढच्या प्रयत्नांसाठी तयार व्हावे, म्हणजे यश मिळण्याची शक्यता जास्त वाढते.
मुख्य परीक्षेचा पेपर मराठीतून लिहावा की इंग्रजीतून लिहावा, हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत सोडत नसतो. परंतु मला नेहमीच वाटते, पेपर कोणत्याही भाषेत लिहिला तरी त्याचा फारसा फरक पडत नाही, तुम्ही तुमचे विचार ज्या माध्यमातून व्यक्त करू शकता ते माध्यम निवडावे. दोन वर्षांपूर्वी जर तुम्ही मुख्य परीक्षा इंग्रजीतून दिली असेल, तर मुलाखत ही इंग्रजीमधूनच द्यावी लागत असे, मात्र आता तुम्ही मुख्य परीक्षा इंग्रजीतून लिहिली असेल, तरी मुलाखत मात्र मराठीतूनही देता येते. मात्र इंग्रजीचा विनाकारण धसका घेऊ नये. इंग्रजी जर अगदीच कच्चे असेल तर ते प्रयत्नपूर्वक सुधारण्याचा प्रयत्न करावा. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी बरेच संदर्भ ग्रंथ इंग्रजीत आहेत, इंटरनेटवरून माहिती घ्यावयाची असेल तर तीही माहिती ही इंग्रजीत आहे. आज इंग्रजी ही ज्ञान-विज्ञानाची भाषा, दळणवळणाची भाषा आहे, आंतरराष्ट्रीय संबंधांची भाषा आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेत व एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेत काही घटकांसाठी इंग्रजी अनिवार्य आहे. यूपीएससीच्या मुख्य परीक्षेला इंग्रजीचा एक स्वतंत्र अनिवार्य पेपर आहे, जरी त्याचे गुण अंतिम गुणांमध्ये मोजले जात नसले तरी हा पेपर जर पास झाले तरच मुख्य परीक्षेचे इतर पेपर तपासले जातात व या पेपरमध्ये नापास झालात तर इतर पेपर तपासले जात नाहीत, हे लक्षात ठेवावे. थोडक्यात इंग्रजीचा अत्यंत द्वेष करणे योग्य नाही आणि इंग्रजीची भीती बाळगणेही योग्य नाही. इंग्रजीविषयीचे भयगंड आणि न्यूनगंड काढून ते सुधारण्यासाठी प्रयत्न करावा.
समजा, एवढे प्रयत्न करूनही जर आपण अपयशी ठरलोच, तर आपण जीवनातील सर्व काही गमावून बसलो, असे समजण्याचे कारण नाही. स्पर्धा परीक्षेत एक विचित्र सत्य आहे, कधीकधी पात्रता असूनही काही विद्यार्थ्यांची निवड शेवटपर्यंत होत नाही. स्पर्धा परीक्षा त्यातल्या त्यात संघ लोकसेवा आयोगाची परीक्षेची तयारी हा प्रवास आहे. या प्रवासादरम्यान आपण संपादन केलेली गुणसंपदा हीच या प्रवासातील शिदोरी आहे. स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने भरपूर अभ्यास होतो, सामान्यज्ञान, इतिहास, भूगोल यांचा अभ्यास करताना मेंदू तल्लख होतो.
हा प्रवास आपल्यापासून सुरू झालेला असतो आणि आपल्याजवळ येऊनच पोहचतो. ज्या फळाच्या अपेक्षेने आपण कर्म करीत असतो, एक दिवशी आपणास जाणवतं की, कर्म करण्यातच खरा आनंद आहे, मौज आहे.
नागरी सेवांच्या माध्यमातून आपण सार्वजनिक सेवेत पोहचतो. या सेवेत असताना कायदा व्यवस्था सांभाळताना लोककल्याणकारी कामे करण्याची संधी मिळते. स्थर्य आणि सुरक्षिततेच्या बाबतीत म्हणाल तर राज्य घटनेनेच सुरक्षिततेची हमी दिली आहे (१४ वा भाग, कलम ३०८ व ३१४) मर्यादित स्वरूपात का होईना पसा, जीवनशैली, सुरक्षितता आणि
शक्ती या सर्व गोष्टी नागरी परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर मिळतात. याहून दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागरी सेवांचा यूपीएससीचा अभ्यास करतानाच इतर परीक्षेचाही अभ्यास होऊन जातो. उदा.  यूपीएससी व एमपीएससीच्या प्राथमिक (पूर्व) परीक्षेचा अभ्यासक्रम सारखाच आहे व जर  यूपीएससीच्या मुख्य
परीक्षेचा सामान्य अध्ययनाचा अभ्यास केला तर एमपीएससीच्या मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययनासाठी आपणास विशेष
श्रम पडणार नाहीत, म्हणजे यूपीएससीचा अभ्यासक्रम इतर परीक्षेसाठी पूरक आहे. अनेकदा अभ्यास करताना बऱ्याच
वेळा निराशा येते व जर एक-दोन प्रयत्न करूनही यश मिळाले नाही तर निराशा जास्तच वाढत जाते. त्यातही एखादा मित्र असा असतो की, त्याचे पूर्ण अटेम्प्ट संपल्यानंतरही त्याला यश मिळत नाही, परंतु त्याच्या अपयशाकडे पाहून स्वत:चे प्रयत्न कमी
करू नयेत.
प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते, त्या व्यक्तीला लागू पडलेला नियम आपल्याला लागू पडेल असे नाही. भोवतालच्या परिस्थितीकडे पाहून किंवा या परीक्षेतील अस्थिरता जाणून आपण निराश होण्याचे कारण नाही, आपल्या हातात अभ्यास करणे एवढेच आहे, रोज मनापासून अभ्यास करत आपली गुणवत्ता वाढवत न्यावी. बाह्य़ परिस्थितीवर आपले नियंत्रण नसते. मात्र आपण काय करावे हे आपल्या हातात आहे, अभ्यास कधीच वाया जात नसतो, जीवनात यश-अपयश, सुख-दु:ख, अपेक्षा, अवहेलना इ. पासून कुणाची सुटका नाही. ज्याचा स्वत:वर विश्वास आहे, आपल्या स्वप्नांवर विश्वास आहे, जो सतत प्रयत्न करीत राहतो, त्याचा कधीही पराभव होऊ शकत नाही. आज ना उद्या त्याचा विजय होणारच असतो.
या परीक्षेचा अभ्यास करताना देश बदलण्याचा, समाज बदलण्याचा विचार थोडा बाजूला ठेवला, तर एक गोष्ट लक्षात येते, या परीक्षेचा अभ्यास म्हणजे खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व विकासाची कार्यशाळा आहे. या परीक्षेच्या अभ्यासाचा नियम जीवनासही लागू पडतो. तुम्ही जिंकलात तर तुम्हाला सारं काही मिळेल आणि प्रयत्न करूनही तुम्ही अपयशी झालात तर सारेच उद्ध्वस्त झाले असे नाही, अभ्यास करताना तुम्ही ज्या गोष्टींचा सामना केला आहे तो अनुभव आयुष्याच्या इतर लढाया जिंकण्यासाठी तुम्हाला उपयुक्त ठरणारच आहे. शेवटी मी एवढंच म्हणेन, येथे जिंकलात तर जिंकलात आणि हरलात तरी जिंकलात..!   

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
Rohit Sharma statement regarding the World Cup 2027 sport news
पुढील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास उत्सुक! इतक्यातच निवृत्तीचा विचार नाही; रोहितचे वक्तव्य
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Eligibility in Zopu Yojana without human intervention
झोपु योजनेत यापुढे पात्रता मानवी हस्तक्षेपाशिवाय!