संभाषणामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपल्या भावनांचे संतुलन. जेव्हा आपल्या भावना असंतुलित होऊ लागतात, तेव्हा आपल्या संभाषणातील शब्दही असंतुलित होऊ लागतात. शब्दांचे अर्थ बदलले जातात आणि संवादाच्या नियमांचे उल्लंघन होते. अशा मंडळींना मोठय़ा ताणतणावाला सामोरे जावे लागते किंवा त्यांच्यासमोर समस्या उभ्या ठाकतात. याउलट बोलताना भावना संतुलित असतील तर त्यांना संभाषण कौशल्य शिकता येते. परिस्थितीवर, संभाषणावर, ताणतणावावर आणि समस्यांवर त्यांचे नियंत्रण राहते. संतुलित भावनांसाठी सर्वप्रथम एक तत्त्व लक्षात ठेवावे. ते म्हणजे आपल्या भावना या प्रामुख्याने आपल्या विचारांमुळे असतात. आपल्यासमोर जो प्रसंग घडत असतो त्याबद्दल आपण कोणता विचार करतो, यावर आपल्या भावना अवलंबून असतात. जसा विचार येतो, तशा भावना उमटतात. त्यामुळे तुमच्या मनात जर राग निर्माण होत असेल तर त्याला तुम्हीच जबाबदार असता. समोरचा माणूस कसेही बोलत असला तरी त्या प्रसंगाबद्दल कोणता विचार करावा, हा संपूर्णपणे आपला प्रश्न असतो. आपल्याला राग हा आपल्या विचारांमुळे येतो. विचार बदलले की आपली भावनाही बदलते, हे ध्यानात घ्यायला हवे.संभाषण कौशल्यात हा नियम लागू असतो. कोणाच्याही शेऱ्यामुळे , कोणाच्याही बोलण्याने, कोणाच्याही टीकेमुळे आपले मन विचलित होत असेल तर हा नियम लक्षात ठेवावा. संभाषणादरम्यान जर कुणी विरोधी मत मांडले तर ते शांतपणे ऐकून घेता यायला हवे. त्यावर काहीही शेरेबाजी न करता समोरच्या व्यक्तीला त्याचे मत पूर्णपणे मांडू देण्याची संधी देता यायला हवी. त्यासाठी तुमच्या भावनांवर तुमचे नियंत्रण असणे अत्यावश्यक ठरते.मात्र संवादादरम्यान जर कुणी विरोधी मत मांडले तर त्यावर प्रतिहल्ला करण्याचा मोह अनेकांना आवरत नाही आणि मग हा संवाद न राहता वादावादी होते. त्यामुळे संवादादरम्यान तुमचे मत मांडताना विरुद्ध मतही ऐकून घेता यायला हवे. तर तुमच्या मतालाही समोरची व्यक्ती महत्त्व देईल. संवादात शब्दांची, विचारांची देवाण-घेवाण तेव्हाच होईल.चार शब्द द्यावे-घ्यावे- संजीव परळीकर, मेहता पब्लिशिंग हाऊस, पृष्ठे - ६०, किंमत - ७० रु.