गणपतीनंतर डिसेंबपर्यंतच दिवस खूप वेगाने जातात ना! गणपतीनंतर नवरात्रोत्सव, दसरा आणि त्यानंतर दिवाळीच्या पाऊलखुणा!  
दसऱ्याच्या दिवशी होणारी शस्त्रपूजा, सरस्वती पूजा यामागची कारणपरंपरा लक्षात घेतली तर आढळतं, त्यामागे आपल्याला दैनंदिन जगणं जगायला ज्या गोष्टी मदत करतात, त्या गोष्टींबद्दल कृतज्ञता दाखवणे, हा भाव असायचा.

पण आज या भावनेपेक्षा सणांची चमकदमकच अधिक वाढलीय. म्हणजे काय तर सणाच्या निमित्ताने महागडी खरेदी, खाण्यापिण्याच्या पाटर्य़ा, फटाके यांचा यथेच्छ अंतर्भाव ‘सेलिब्रेशन’ या संकल्पनेत होऊ लागला आहे. आणि या सगळ्यात सण साजरा करण्यामागचा ज्ञानाधिष्ठित, तात्त्विक वा आध्यात्मिक भाव झपाटय़ाने गायब होऊ लागलाय. आपल्या घरात मुलाच्या, भाच्याच्या वा पुतण्याच्या पाटीपूजेत आपण खरंच मनापासून सहभागी असतो? हेच बघा ना, पूर्वी गिरण्या वा कुठल्याही कंपनीत मशीनवर काम करणारा कामगार दसऱ्याला आपल्या मशीनची मनोभावे पूजा करायचा, तो भाव आज आपल्यात उरलाय का? ज्या विद्येच्या आधारे आपण वर्षभर आपली रोजीरोटी कमावतो, त्याची आठवण आपल्याला होते का? त्या आठवणीपोटी आपल्याला आपल्या शिक्षिकेला वा करिअरच्या सुरुवातीच्या दिवसातील फ्रेंड- फिलोसॉफर-गाइड असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला फोन करावासा वाटतो का?
त्याउलट सण हे एक सेलिब्रेशन बनलंय. खरेदीचं- झालंच तर श्रीमंती मिरवण्याचं निमित्त बनलंय. सेलिब्रेशन म्हणजे काय, तर गणपती वा दुर्गेच्या काळजाचा थरकाप होईल, इतक्या मोठय़ा आवाजातील ‘हलकट जवानी’सारख्या गाण्यांचा गजर निकानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांची माळ! हे सहन करायला लावून नंतर या देवदेवतांची रवानगी बंपर टु बंपर ट्रॅफिकमध्ये! एकूणच, अलीकडे सणाचा केवळ रंजक भाग आपण सोयीस्कररीत्या उचलू लागलो आहोत आणि मानवी मनाची वाढ आणि समाजाचा विकास होण्यासाठी म्हणून सण असा जो सणाचा मुख्य पैलू होता, तो मात्र मानवाच्या शेपटीसारखा गळून पडायला लागला आहे.
आज सण – उत्सव वाढलेत आणि ते साजरी करण्याची प्रवृत्तीही! साजरा करण्याचा जोशही असा और की अगदी महाग कपडे, दागिने, डाएट प्लान, ऐसपैस शॉपिंग, रोषणाई, डेकोरेशन या सगळ्याची लयलूट असते! त्यासोबत डाएट-मेजवानी यांचा घातलेला अजब मेळ, ऑफिसमधल्या पाटर्य़ा.. एकूणच या साऱ्या गदारोळात सणाच्या दिवशी ‘शक्ती दे’च्या प्रार्थना विरून जातात का?
आज आपण पुरते शाळा, क्लास, कॉलेज, कोर्सेस आणि नोकरी या न संपणाऱ्या चक्रात अडकलोय. आणि ते निभावताना आपल्याकडे ज्ञान आणि अनुभव यांना महत्त्व द्यायला म्हणून वेळ किंवा शक्ती उरत नाही. ज्या पूर्वजांनी ‘साधुसंत येती घरा..’ ही सणाची व्याख्या केली, आज साधुसंतच काय, प्रत्यक्ष ब्रह्मदेव अवतरले, तरी त्यांना एंटरटेन करायलाही वेळ नसेल, आपल्याकडे!
पूर्वजांनी सणांची सांगड त्या ऋतूशी, त्या ऋतूत बहरणाऱ्या पाना-फुलांशी घातली. सणासंदर्भातील रुचतील, पटतील त्या गोष्टी सोबत घेत, त्यात आवश्यक ते कालानुरूप बदल करत आपल्याला पुढे नाही का सरकता येणार? भोंडल्यातील सासू-सुनेची गाणी ऑफिसमधल्या बॉसवर रचण्याइतकी सृजनशीलता आपल्याला दाखवता नाही का येणार?
‘साधुसंत’ या ओळीचा अर्थ धार्मिकपेक्षा, आध्यात्मिक आणि तात्त्विक अधिक आहे. आता दिवाळी आलीच आहे. अलीकडे हवेतील गारव्यापेक्षा ‘सेलिब्रेशन’च्या सतराशे साठ जाहिरातींनी दिवाळीची चाहूल लागते. हा दिव्यांचा सण आहे, हे कबूल! पण आपल्याला मंद तेवणाऱ्या दिव्यांची दिवाळी हवी की प्रखर प्रकाशात न्हाऊन निघालेली दिवाळी हवी, हा पुन्हा ज्याचा त्याचा प्रश्न!
भरगच्च शॉपिंग आणि लक्ष्मीपूजनाला उडवले जाणारे फटाके यात रमणारी तरुणाई घरी कंदील बनवणं तर सोडाच, रांगोळी काढणे, मातीचे किल्ले बनवणे, साऱ्यांनी मिळून फराळाचा पदार्थ करणे यात रमत असलेली तशी दिसत नाही.  यावर ‘अभ्यास, करिअरमधून सवड नसते, या फावल्या गोष्टींकरता,’ असे फणकाऱ्याने दिलेले उत्तर आपल्या तोंडावर आदळते. (पण गंमत म्हणजे हीच तरुणाई दिवाळीच्या दिवशी भल्या पहाटे तय्यार होऊन फडके रोड आणि राम मारुती रोडवर मिरवण्यासाठी मात्र आवर्जून वेळ काढते.) मग त्यावर उतारा म्हणजे सोयीस्कर असणाऱ्या गोष्टींसाठी आपला वेळ वापरणे, हे आलेच. आणि वेळ नसेल तर मग सणाची सुट्टी गोंगाट नि बेसुमार खर्च करण्यासाठी वापरण्यापेक्षा थोडा आराम करून, चांगलं वाचून नाही का साजरी करता येणार?
खरं तर रामाने रावणाचा पराजय केला तो दसरा आणि तो आपल्या अयोध्येत परतला ती दिवाळी! याचा जल्लोष म्हणून दसरा- दिवाळी साजरा करण्याची प्रथा आहे. पण तोच सण फटाके नि कच्छीबाजाच्या तालावर साजरा करताना आपण काय बरं इतका पराक्रम केलाय, निदान आपल्यासमोरचे प्रश्न तरी सत्याच्या आधारे सोडवलेत का कधी, हा विचार करता येईल का?
आज ऑफिसमध्ये दसरा-दिवाळी साजरी होते. दिवाळीच्या दिवसांत सुका मेवा नि तऱ्हेतऱ्हेच्या गिफ्टस्ची मांदियाळी पाहिली की, त्याचं पॅकेजिंग, प्लास्टिक आणि कार्डबोर्डचा अंगावर येणारा वापर हा भीतीदायक आहे. महागाईच्या नावाने ठणाणा करताना महागडय़ा शॉप्समधली गर्दी काही ओसरत नाहीए. महागाईसोबत दिखाऊपणाही वाढतोय नी भंपकपणाही. सणासाठी नवे कपडे आपण आधीही घ्यायचो, पण ते वर्षभर वापरण्यासाठी! आज सणांसाठी म्हणून घेतले जाणारे कपडे पाहिले तर त्याची किंमत, ते कसे आणि आणि कधी वापरले जातील, हा विचार करूनच छाती दडपते.
या साऱ्या गदारोळात साधीशी, कमी खर्चिक, कमी कानठळ्या बसवणारी, ऑफिशिअल गिफ्टची जबरदस्ती कमी असलेली दिवाळी आपल्या वाटय़ाला यावी, यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केले, तर ही दिवाळी नक्कीच आपलं जगणं उजळून टाकणारी ठरेल!