डॉ. अमर जगताप

विद्यार्थी मित्रांनो, मागील लेखांमधील चालू घडामोडींविषयक प्रश्नांची चर्चा या लेखामध्ये आपण पुढे चालू ठेवणार आहोत. भूगोल विषयाचा अभ्यास करताना आर्थिक भूगोलामधील नसर्गिक साधन संपत्ती हा महत्त्वाचा घटक आहे. एखाद्या राष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये राष्ट्रामध्ये उपलब्ध असलेली साधन संपत्ती अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. राष्ट्र जर आवश्यक साधन संपत्तीच्या उपलब्धतेबाबत स्वयंपूर्ण असेल तर त्या राष्ट्रास आर्थिक प्रक्रियांमध्ये वेगाने वाढ करून वेगात आर्थिक विकास साध्य करता येतो. या पार्श्वभूमीनुसार साधन संपत्तीवर प्रश्न विचारले जाणे अपेक्षित आहे. पृथ्वीवर उपलब्ध असणाऱ्या साधन संपत्तीमध्ये मृदा, जल, वन, पशू, खनिज व ऊर्जा साधन संपत्ती महत्त्वाची आहे. यापकी भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ऊर्जा, खनिज, जल, मृदा संपत्ती सर्वाधिक महत्त्वाची असून त्या पाठोपाठ वन व पशू संपत्ती महत्त्वाची आहे. त्यामुळे २०११सालापासूनच्या मुख्य परीक्षेतील प्रश्नांचा आढावा घेतल्यास सातत्याने किमान एकतरी प्रश्न साधन संपत्तीवर विचारलेला आढळतो. त्यामध्ये देखील प्रामुख्याने ऊर्जा व जल साधन संपत्तीवर प्रश्न विचारलेले आढळतात. त्यापकी काही प्रश्नांचा आढावा आपण या लेखामध्ये घेणार आहोत.

  1. The ideal solution of depleting ground water resources in India is water harvesting systemll How can it be made effective in urban areas?
  2. In what way micro-watershed development projects help in water conservation in drought- prone and semi-arid regions of India?
  3. The effective management of Land and Water resources will drastically reduce the human miseries. Explain.
  4. India is well endowed with fresh water resources. Critically examine why it still suffers from water scarcity?

वरील प्रश्नांचा आढावा घेतल्यास भारतातील पाणीटंचाईची सद्य:स्थितीतील समस्या डोळ्यांसमोर ठेवून हे सर्व प्रश्न विचारले आहेत, हे लक्षात येते. परिणामी, या पाणीटंचाईवर भविष्यात पुन्हा प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे, कारण भारतातील मोठय़ा शहरांमध्ये उदा. चेन्नईमध्ये यावर्षी भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. या प्रकारच्या प्रश्नांची तयारी करण्यासाठी भारतातील जल साधन संपत्तीच्या उपलब्धतेचा प्रथम अभ्यास करावा. पाण्याच्या ग्रामीण व नागरी पातळीवरील वापराचे स्वरूप अभ्यासावे; त्यातून उद्भवणारी टंचाई अभ्यासावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या समस्येवरील उपाय; तेसुद्धा प्रामुख्याने पर्यावरणपूरक शाश्वत उपाय म्हणून नदी जोड प्रकल्पाची उपयुक्तता अभ्यासावी.

वर नमूद केलेल्या प्रत्येक प्रश्नाचा आपण आढावा घेऊ.

प्र. १. भारतामधील भूजल पातळीमध्ये वेगात होणारी घट!

या समस्येवर जल संवर्धन हा सर्वोत्तम उपाय आहे. त्याची नागरी प्रदेशामध्ये अंमलबजावणी कशा प्रकारे होऊ शकते. याचे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. या उत्तरामध्ये प्रथम भूजल पातळीमध्ये वेगात घट होण्याची कारणे थोडक्यात नमूद करावीत. त्यानंतर भूजल पातळीमध्ये वाढ करण्यासाठी मृदा व जल संवर्धन पद्धती कशा प्रकारे उपयुक्त ठरेल ते उदाहरणासह स्पष्ट करावे. त्यामध्ये विशेषत: नागरी प्रदेशात जलसंवर्धन कशा प्रकारे करावे ते नमूद करणे आवश्यक आहे. उदा. नागरी वस्तीमधील निवासी व व्यापारी इमारतींवर पर्जन्य जल संवर्धन (Rain Water Harvesting) यंत्रणा राबवावी. पावसाच्या काळात प्राप्त होणारे पाणी टाक्यांमध्ये साठवून, त्याद्वारे विंधन विहीर (बोअरवेल), विहिरी यांचा वापर करून भूजल पुनर्भरण करण्याच्या प्रक्रिया आकृतींसह स्पष्ट कराव्यात.

प्र. २. भारतातील अवर्षणप्रवण व निम्न शुष्क प्रदेशांमध्ये सूक्ष्म पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प कशा प्रकारे जल संवर्धनास उपयुक्त ठरतील?

या प्रश्नाच्या उत्तरामध्ये अवर्षणप्रवण व निम-शुष्क प्रदेशातील पर्जन्याचे स्वरूप(सरासरी, वारंवारता) स्पष्ट करावे, कारण प्रश्नामध्ये सूक्ष्म पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पाचा उल्लेख आहे. त्यामुळे सूक्ष्म पाणलोटाचे कमी पावसाच्या प्रदेशासंदर्भात महत्त्व काय आहे, ते स्पष्ट करणे आवश्यक आहे. त्याकरिता राजस्थानमधील ग्रामीण भागात पाण्याच्या स्वयंपूर्णतेकरिता राबविलेल्या-विशेषत: वैयक्तिक पातळीवर जलसंवर्धन पद्धतींचे उदाहरण द्यावे.

प्र. ३. या प्रश्नांमध्ये भारतातील विविध समस्या, लोकांचे हाल कमी करण्यासाठी जमीन व पाणी या साधन संपत्तीचा परिणामकारक वापर उपयुक्त ठरेल. याचे स्पष्टीकरण द्यावे.

उत्तराच्या सुरुवातीस जमीन व पाणी या साधन संपत्तीचे महत्त्व स्पष्ट करावे. त्यानंतर मानवाच्या प्रमुख समस्या, ज्या जमीन व पाण्याशी संबंधित आहेत, त्या स्पष्ट कराव्यात. उत्तराच्या उर्वरित भागामध्ये जमीन व पाण्याचा शाश्वत पद्धतीने वापर केल्यास या समस्या कशा प्रकारे कमी होऊ शकतील, याचे उदाहरणासह स्पष्टीकरण द्यावे.

प्र. ४. भारतामध्ये गोडय़ा पाण्याचे (पेयजलाचे) मुबलक साठे उपलब्ध आहेत, परंतु तरी देखील भारतामध्ये पाणीटंचाई जाणवते. याचे टीकात्मक मूल्यमापन करणे अपेक्षित आहे.

उत्तरामध्ये प्रथम भारतातील जल साठय़ांचे विभागानुसार वितरण स्पष्ट करावे. त्यानंतर पाणीटंचाईस कारणीभूत ठरणारे घटक जसे की, पाण्याचा कृषीक्षेत्रातील अवाजवी (अतिरिक्त) वापर, पाण्याचा वापर करताना चुकीच्या पद्धतीने वापर केल्याने पाणी दूषित होणे, पावसाळ्यात प्राप्त होणारे पाणी योग्य प्रकारे न साठवणे इ. घटकांचे उदाहरणासह स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे.

वरील सर्व प्रश्नांचा आढावा घेतल्यास काही निष्कर्ष काढता येतात. साधन संपत्ती महत्त्वाचा घटक आहे. भारतामध्ये ज्या साधन संपत्तीची टंचाई जाणवत आहे; ज्याबाबत समस्या आहे; त्याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. थोडक्यात, भारतासमोरील समस्यांचा आढावा घेऊन प्रश्नांचे पूर्वकथन करण्याचा प्रयत्न करावा.