|| श्रीकांत जाधव

प्रस्तुत लेखामध्ये आपण पूर्व परीक्षेच्या पहिल्या पेपरमधील भारतीय इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ या घटकाची सविस्तर चर्चा करणार आहोत. या घटकामध्ये प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत तसेच भारतीय कला आणि संस्कृती याचाही अंतर्भाव होतो.

२०११ पासून ते २०१९ पर्यंत या घटकावर वर्षनिहाय विचारण्यात आलेल्या प्रश्नांची संख्या –
२०११-(१३ प्रश्न ),
२०१२-(१८ प्रश्न),
२०१३-(१५ प्रश्न)
२०१४-(२० प्रश्न),
२०१५-(१८ प्रश्न),
२०१६-(१६ प्रश्न),
२०१७ (१४ प्रश्न),
२०१८ (२१ प्रश्न)
२०१९ (१५ प्रश्न)
आणि २०२० (१९ प्रश्न) इतकी आहे.

या प्रश्नांच्या संख्येवरून आपणाला या घटकाचा अभ्यास परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येते. या घटकाचा परीक्षाभिमुख आवाका लक्षात घेऊन याचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे. २०१५ पासून यूपीएससीने पूर्व परीक्षेमध्ये परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे, पेपर दोन हा क्लासिफाइंग म्हणजे पात्रतेसाठी महत्त्वाचा केलेला आहे (एकूण ८० प्रश्न आणि प्रत्येक प्रश्न २.५ गुणांसाठी असतो) ज्यामध्ये उतीर्ण होण्यासाठी कमीत कमी एकूण गुणांपैकी ३३% गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे. या पेपरमध्येही चुकीचा पर्याय निवडल्यास एका प्रश्नासाठी .३३ अशा पद्धतीने एकूण मिळविलेल्या गुणांमधून दंडात्मक गुण (पेनल्टी मार्क्स) कापले जातात. तसेच या पेपरचे गुण गुणवत्ता यादी ठरविण्यासाठी ग्रा धरले जात नाहीत. पहिल्या पेपरमध्ये प्राप्त केलेल्या गुणांवरून अंतिम मेरिट ठरविले जाते.
या घटकातील नेमका कोणता भाग परीक्षेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे याचे आकलन आपणाला गतवर्षीय परीक्षेमध्ये या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरून लक्षात येते. या घटकाची व्याप्ती खूप मोठी आहे तसेच याचे स्वरूप पारंपरिक पद्धतीचे आहे. त्यामुळे हा घटक सर्वप्रथम सखोल पद्धतीने अभ्यासणे गरजेचे आहे आणि त्यानंतर या घटकावर स्वत:च्या उजळणी स्वरूपातील नोट्स तयार कराव्यात जेणे करून हा घटक कमीतकमी वेळेमध्ये परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासता येऊ शकतो. सर्वसाधारणपणे या घटकामध्ये प्राचीन भारत, आधुनिक भारत, भारतीय कला आणि संस्कृती यावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात, तसेच गतवर्षीय परीक्षेमधील प्रश्नाचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, भारतीय कला आणि संस्कृती यावर अधिक प्रश्न विचारण्यात येऊ लागलेले आहेत. त्यामुळे हा भाग व्यवस्थित अभ्यासणे गरजेचे आहे. या घटकावर ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाची स्थळे, सामाजिक आणि आर्थिक संबंधित घडामोडी आणि संकल्पना, राजकीय घडामोडी, व्यक्तीसंबंधित माहिती, साहित्य, विविध कला इत्यादीशी संबंधित वस्तुनिष्ठ पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि अशाप्रकारच्या प्रश्नांची संख्या अधिक असते तसेच विश्लेषणात्मक प्रश्न विचारले जातात पण यांची संख्या तुलनेने कमी असते.ज्यामुळे हा घटक अभ्यासताना वस्तुनिष्ठ माहितीचा अचूक अभ्यास करणे गरजेचे आहे. चुकीच्या पर्यायासाठी दंडात्मक गुण असल्यामुळे अचूक पद्धतीने अभ्यास करणे अपरिहार्य बनलेले आहे. भारतीय इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ या घटकाची परीक्षाभिमुख आकलन करताना साधारणत: खालील पद्धतीने विभागणी केली जाऊ शकते.

प्राचीन भारत

यामध्ये प्राचीन भारताच्या इतिहासाचे महत्त्व आणि अभ्यासाची साधने, प्रागैतिहासिक भारत, ताम्रपाषाण कृषिसंस्कृती, सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, बौद्धयुग अथवा महाजनपदाचा कालखंड, मौर्य कालखंड, मौर्येतर कालखंड, गुप्त कालखंड आणि गुप्तोत्तर कालखंड इत्यादी.

मध्ययुगीन भारत

यामध्ये प्रारंभिक मध्ययुगीन कालखंड( इ.स. ७५०-१२००), दिल्ली सल्तनत, उत्तर भारतातील प्रादेशिक देशी सत्ता, विजयनगर साम्राज्य, बहामनी राजघराणे, मुघल साम्राज्य, मराठा कालखंड आणि मध्ययुगीन भारतातील धार्मिक चळवळी इत्यादी.

आधुनिक भारत

यामध्ये युरोपियनांचे आगमन आणि ब्रिटिशसत्तेची भारतात स्थापना, ब्रिटिशसत्तेचा भारतावरील परिणाम, ब्रिटिशसत्तेच्या विरोधातील उठाव, १९व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी, शिक्षण आणि वृत्तपत्रे यांची वाढ आणि विकास, भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ, क्रांतिकारी चळवळी, कामगार चळवळ, भारतातील सांप्रदायिकतेची वाढ, गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय, भारतातील घटनात्मक विकास,महत्त्वपूर्ण व्यक्ती इत्यादी.

भारतीय कला आणि संस्कृती

यामध्ये भारतीय स्थापत्यकला आणि शिल्पकला, भारतीय चित्रकला, भारतीय संगीत, नृत्य आणि नाटय़, भारतीय साहित्य, भारतीय हस्तकला इत्यादी अशी करावी लागते.

घटकासाठी एन.सी.ई.आर.टी. बोर्डाची शालेय पुस्तके सर्वप्रथम वाचावीत ज्यामधून या घटकाची मूलभूत माहिती आपणाला मिळते. बाजारात या घटकासाठी अनेक गाईड्स स्वरूपात पुस्तके उपलब्ध आहेत. यातील नेमकी कोणती पुस्तके या घटकाची परीक्षाभिमुख तयारी करण्यासाठी महत्त्वाची आहेत याची माहिती असणे गरजेचे आहे. उपरोक्त नमूद प्रत्येक भागाची आपण पुढील लेखामध्ये चर्चा करणार आहोत, यामध्ये गतवर्षीचे भागनिहाय विचारले गेलेले प्रश्न, संबंधित भागाचा मूलभूत अभ्यास करण्यासाठी एन.सी.ई.आर.टी.ची कोणत्या वर्गाची पुस्तके वाचावीत तसेच संबंधित भाग अधिक सखोल आणि सर्वागीण पद्धतीने अभ्यासण्यासाठी कोणते संदर्भग्रंथ अभ्यासावेत याची सविस्तर माहिती घेणार आहोत. तसेच यातील आधुनिक भारत आणि भारतीय कला आणि संस्कृती हा भाग मुख्य परीक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे, त्यामुळे याचा अधिक सखोल आणि सर्वागीण अभ्यास करणे गरजेचे आहे. या पुढील लेखामध्ये आपण प्राचीन भारत या घटकाचा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा आढावा घेणार आहोत.