एमपीएससी मंत्र : फारूक नाईकवाडे

अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा सामान्य अध्ययन घटकातील चालू घडामोडी, इतिहास, राज्यव्यवस्था व अर्थव्यवस्था या घटकांच्या तयारीबाबत मागील लेखांमध्ये चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये सामान्य अध्ययनातील भूगोल व पर्यावरण या उपघटकांच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

भूगोल या विषयाची तयारी विज्ञान विषयाप्रमाणे मुद्देसूदपणे आणि परस्परसंबंध समजून घेऊन करता येणे शक्य आहे. अभियांत्रिकीचा अभ्यास करताना वापरलेल्या नोट्स काढण्याच्या किंवा एकूणच अभ्यासाच्या पद्धती हा घटक विषय अभ्यासताना उपयोगी ठरतात. त्यामुळे कमी गुणांसाठी जास्त अभ्यासक्रम असला तरी या व पर्यावरण दोन्ही घटकांची तयारी आत्मविश्वासाने करणे शक्य आहे.

भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा भूगोल

भूगोलाचा अभ्यास करताना उपघटकांना प्राकृतिक- आर्थिक- सामाजिक अशा क्रमाने महत्त्व देणे आवश्यक आहे.

मूलभूत संज्ञा व संकल्पना आधी समजून घेऊन मग भौगोलिक घटना व प्रक्रियांचा अभ्यास करावा.

मान्सूनची निर्मिती, वितरण, भारताच्या/ महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्व, ॠतूंची निर्मिती, मृदा निर्मिती, समुद्री प्रवाह, भूकंप, ज्वालामुखी इ. प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे.

प्राकृतिक विभाग, नदी-पर्वत प्रणाली यांचा अभ्यास नकाशा समोर ठेवून करावा. याबाबत भारत-महाराष्ट्र अशा क्रमाने महत्त्व देऊन अभ्यास आवश्यक आहे. भारतातील हिमालयीन व द्विकल्पीय नदी प्रणालींचा तुलनात्मक अभ्यास आवश्यक आहे.

चालू घडामोडींमध्ये नैसर्गिक आपत्ती, चक्रीवादळांची नावे यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.

आर्थिक भूगोलामध्ये खनिजे व त्यांचे उत्पादन, महत्त्वाची पिके व त्यांचे उत्पादक प्रदेश यांचा अभ्यास कोष्टकामध्ये करता येईल.

खनिजे व ऊर्जा स्रोत, महत्त्वाचे पायाभूत उद्योग, महत्त्वाची धरणे/प्रकल्प व महत्त्वाची पर्यटन, धार्मिक स्थळे यांचा कोष्टकामध्ये मांडून पुढील मुद्यांच्या आधारे अभ्यास करता येतो : स्थान (जिल्हा, नदी किनारा, पर्वत इत्यादी), वैशिष्ट्ये, आर्थिक महत्त्व, असल्यास वर्गीकरण, असल्यास पर्यावरणीय मुद्दे, संबंधित समस्या, कारण, उपाय, असल्यास संबंधित चालू घडामोडी.

भारतातील प्रसिद्ध वने, उद्याने व सद्यस्थितीत चर्चेत असलेली स्थळे याची माहिती करून घ्यावी.

प्रशासकीय विभागातील जिल्हे, त्यांची मुख्यालये व त्यांची वैशिष्ट्ये, जिल्ह्यांची कालानुक्रमे निर्मिती, महत्त्वाची शहरे, आर्थिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे यांची टिप्पणे कोष्टकामध्ये काढावी.

राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा, इतर राज्यांच्या सीमेवरील जिल्हे, जिल्ह्यांच्या सीमा म्हणून उपयुक्त ठरणारी नदी/ डोंगर/ नैसर्गिक भूरूप आणि राज्याचा राजकीय नकाशाही व्यवस्थित अभ्यासणे आवश्यक आहे.

पर्यावरण – मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण विशेषत: वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य/ राष्ट्र जागतिक पातळीवरील संघटना/ संस्था.

अभ्यासक्रमामध्ये उल्लेख नसला तरी हरितगृह परिणाम, ओझोन क्षय, जागतिक तापमानवाढ या संकल्पना व त्यांचा परस्परसंबंध समजून घ्यायला हवा.

मानवी विकास व पर्यावरण यांचा परस्परसंबंध समजून घ्यावा. विकास प्रकल्पांच्या पर्यावरणावरील परिणामांबाबतचे महत्त्वाचे मुद्दे समजून घ्यावेत. एखाद्या प्रकल्पाबाबत वाद उद्भवले असतील तर त्यातील पर्यावरणाशी संबंधित मुद्दे समजून घ्यावेत. महत्त्वाच्या पर्यावरणविषयक चळवळी, या क्षेत्रात कार्यरत महत्त्वाच्या संस्था व व्यक्ती यांचा आढावा घ्यायला हवा.

वनसंधारणाबाबतचे भारतातील व महाराष्ट्रातील प्रयत्न, योजना माहीत करून घ्याव्यात. वन अहवालातील महत्त्वाचे मुद्दे पाहणे उपयुक्त ठरेल.

प्रदूषणांचे प्रकार, स्रोत, परिणाम, उपाय हे मुद्दे समजून घ्यावेत. पर्यावरणविषयक कायद्यांवर प्रश्न विचारण्यात आलेले नसले तरी त्यांचा थोडक्यात आढावा घेता आला तर अधिक चांगले.

आर्थिक व पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्वाच्या परिसंस्था पाहायला हव्यात. कवउठच्या रेड लिस्टमधील भारताच्या संकटग्रस्त प्रजाती, वन्यजीव संवर्धनाचे कायदे, ठराव, अभयारण्ये व संबंधित संकल्पना यांचाही आढावा आवश्यक आहे.

पर्यावरण क्षेत्रामधील आंतरराष्ट्रीय संस्थांची माहिती, संमेलने त्यातील महत्त्वाचे ठराव त्यातील उद्दिष्टे, शाश्वत विकास लक्ष्यांमधील पर्यावरणविषयक उद्दिष्टे यांचा आढावा घ्यायला हवा.

हवामान बदलविषयक जागतिक ठरावांबाबत भारताची भूमिका नेमकेपणाने समजून घ्यायला हवी आणि भारतातील यासाठीचे प्रयत्न, त्यासाठीचे कायदे, धोरणे, योजना पाहायला हव्यात.

एकूणच सामान्य अध्ययनामध्ये बहुविधानी प्रश्नांची संख्या आधीच्या दोन वर्षांच्या तुलनेत सन २०१९ मध्ये लक्षणीयरीत्या कमी झालेली आहे. सरळसोट किंवा बहुविधानी अशा कोणत्याही स्वरूपात विचारलेले असले तरी या घटकाच्या प्रश्नांची काठिण्यपातळी खूप जास्त नाही. इतिहास वगळता या घटकांवरचे प्रश्न ‘मूलभूत’ संकल्पना पक्क्या असतील तर आत्मविश्वासाने सोडविता येतात. विषयाच्या मूलभूत संकल्पना, तथ्ये, विश्लेषणे, चालू घडामोडी अशा वेगवेगळ्या पैलूंवर आधारित प्रश्न विचारण्यात येतात. त्यामुळे यांचा परिपूर्ण अभ्यास आवश्यक आहे. मेहनत किती घेताय यापेक्षा ती कशी घेताय यावरच यश अवलंबून असते. विश्लेषणावर आधारित अभ्यास व अभ्यासक्रमाच्या चौकटीत केलेली तयारीच यशस्वी होण्यासाठी आवश्यक असते.