प्रश्नवेध एमपीएससी : रोहिणी शहा महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आणि त्यानंतरचा घटनाक्रम मागील लेखामध्ये (१४ डिसेंबर) देण्यात आला आहे. या घटनाक्रमामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारात घ्यावयाचे मुद्दे आहेत - विधानसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुका, दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष, दोन्हींची सदस्यसंख्या व मतदारसंघ, मंत्रिमंडळ, विश्वास व अविश्वास ठराव, मंत्र्यांच्या शपथेचे नमुने, पक्षांतरबंदी कायदा, राष्ट्रपती राजवट, राज्यपालांची भूमिका व अधिकार, केंद्र व राज्य संबंध इत्यादी. मागील लेखामध्ये (११ जानेवारी) या बाबतचे काही सराव प्रश्न देण्यात आले होते. या आणि पुढील लेखामध्ये उर्वरित मुद्यांबाबत सराव प्रश्न देण्यात येत आहेत. प्रश्न १. भारतीय संविधानाचे भाग आणि त्यांचे विषय यांच्या जोडय़ांपकी अयोग्य जोडी कोणती? अ. भाग ५ - संघ राज्य सरकार ब. भाग ७ - राज्य शासन क. भाग ११ - केंद्र राज्य संबंध १) केवळ अ २) केवळ ब ३) केवळ क ४) तिन्हीपकी एकही नाही प्रश्न २. पुढीलपकी योग्य विधान/ने कोणते/ती? अ. आणीबाणीच्या काळात राज्यसूचीतील विषयांवर संसद कायदा करू शकते. ब. घटकराज्यांनी केलेले कायदे केंद्र शासनाच्या कायद्यांशी विसंगत असून चालत नाही. क. समवर्ती सूचीतील कायद्यांबाबत केंद्र व राज्याचा कायदा यापकी सर्वात शेवटचा म्हणजे अद्ययावत कायदा लागू होतो. पर्यायी उत्तरे १) केवळ अ २) केवळ ब ३) केवळ क ४) वरील तिन्ही प्रश्न ३. घटनात्मक आयोग / यंत्रणा आणि त्यांचे कार्यक्षेत्र यापकी कोणती जोडी बरोबर आहे? १) वित्त आयोग - केंद्र शासन, राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांमध्ये कर उत्पन्नाचे वाटप ठरविणे. २) पाणी लवाद - केंद्र शासन व एक किंवा अधिक राज्य सरकारे यांमधील नदी पाणी वाटपाबाबतचे विवाद मिटविणे. ३) आंतरराज्यीय परिषद -राज्यांराज्यांमधील विवादांची चौकशी करून त्याबाबत सल्ला देणे. ४) उच्च न्यायालय - केंद्र शासन व एक किंवा अधिक राज्य सरकारे यांच्यामधील विवादामध्ये निर्णय देणे. प्रश्न ४ - राज्यपालपदाच्या कालावधीबाबत पुढीलपकी कोणते/ती विधान/ने अचूक आहेत? अ. राज्यपाल राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पद धारण करतो. ब. राज्यपालपद ग्रहण केल्यापासून पाच वर्षांपर्यंत आपले पद धारण करतो. क. पदावधी संपला तरी दुसरी व्यक्ती पद ग्रहण करेपर्यंत राज्यपाल त्या पदावर राहतो. पर्यायी उत्तरे १) केवळ अ २) केवळ ब ३) केवळ क ४) वरील तिन्ही उत्तरे आणि स्पष्टीकरणे प्रश्न १. योग्य उत्तराचा पर्याय क्र.(२) भारतीय संविधानाचे भाग व त्यांचे विषय पुढीलप्रमाणे. भाग १ - संघराज्य आणि त्याचे कार्यक्षेत्र भाग २ - नागरिकता भाग ३ - मूलभूत हक्क भाग ४ - राज्याची नीती निर्देशक तत्त्वे भाग ५- संघराज्य भाग ६ - राज्ये भाग ७ हा निरसित केलेला आहे. भाग ८ - केंद्रशासित प्रदेश भाग ९ - पंचायत राज, नगर पालिका, सहकारी संस्था भाग १० - अनूसूचित व जनजाती क्षेत्रे भाग ११ - केंद्र राज्य संबंध भाग १२ - वित्त व्यवस्था, मालमत्ता, संविदा व दावे भाग १३ - भारताच्या राज्यक्षेत्रातील व्यापार, वाणिज्य भाग १४ - शासकीय सेवा व न्यायाधिकरणे भाग १५ - निवडणुका भाग १६ - विवक्षित वर्गासंबंधी विशेष तरतुदी भाग १७ - राजभाषा भाग १८ - आणीबाणीविषयक तरतुदी भाग १९ - संकीर्ण भाग २० - घटना दुरुस्ती भाग २१ - विशेष तरतुदी भाग २२ - संक्षिप्त नाव व हिंदी पाठ प्रश्न २. योग्य उत्तराचा पर्याय क्र. (३) राज्य घटनेच्या कलम २५० अन्वये आणीबाणीच्या काळात राज्यसूचीतील विषयांवर संसद कायदा करू शकते. संसदेने केलेला कायदा राज्याच्या कायद्यावर अधिक्रमित होतो. त्यामुळे राज्यांनी आपले कायदे करताना ते केंद्राच्या कायद्याशी सुसंगत असतील याची काळजी घेणे आवश्यक आहे. समवर्ती सूचीतील विषयावर एखाद्या राज्याचा केंद्राच्या कायद्याशी विसंगत असलेली तरतूद असलेला कायदा राष्ट्रपतींच्या मंजुरीने पारित झाला असेल तर ती विसंगत तरतूद त्या राज्यापुरती लागू होते. प्रश्न ३. योग्य उत्तराचा पर्याय क्र.(३) केंद्रीय वित्त आयोग (कलम २८० व २८१)-केंद्र शासन आणि राज्य शासन यांमध्ये कर उत्पन्नाचे वाटप ठरविणे तर राज्य वित्त आयोग (कलम २४३ झ) राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांमध्ये कर उत्पन्नाचे वाटप ठरविणे पाणी लवाद - एक किंवा अधिक राज्य सरकारे यांमधील नदी पाणी वाटपाबाबतचे विवाद मिटविणे. सर्वोच्च न्यायालय - केंद्र शासन व एक किंवा अधिक राज्य सरकारे यांच्यामधील विवादामध्ये निर्णय देणे. प्रश्न ४. योग्य उत्तराचा पर्याय क्र.(४)