‘एमपीएससी’मार्फत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात उमेदवारांना सामोरे जाव्या लागणाऱ्या शारीरिक चाचणीची आणि नंतर मुलाखतीची तयारी कशी करावी, याचे सविस्तर मार्गदर्शन.

गेल्या दोन वर्षांत ‘एमपीएससी’च्या विविध परीक्षापद्धतींमध्ये मोठे बदल झाले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेणे, परसेन्टाइल सिस्टीम, मुलाखतीमध्ये ‘कट ऑफ मार्क्स’ यासारख्या बदलांचा उल्लेख करता येईल. ‘पीएसआय’- पोलीस उपनिरीक्षक आणि ‘असिस्टंट’ परीक्षांच्या गुणांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्येही बदल झाले असून ‘एसटीआय’ सोबत ‘टॅक्स असिस्टंट’ पदांची भरती करण्यासारखे बदलही आपल्या लक्षात येतात.
१३ ऑक्टोबर २०१४ रोजी ‘एcv-02मपीएससी’ने नवीन अभ्यासक्रमानुसार आणि गुणपद्धतीनुसार ‘पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा- २०१३’ चा सुधारित निकाल जाहीर केला. या निकालाद्वारे महाराष्ट्रातून २,९८८ उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरले.
‘पीएसआय’ मुख्य परीक्षेच्या केंद्रनिहाय निकालात पुण्यातून सर्वात जास्त उमेदवार उत्तीर्ण झाल्याचे स्पष्ट होते. यशस्वी उमेदवारांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे : पुणे- १७१७, औरंगाबाद- ६६५, नागपूर- ३७०, मुंबई- २३६, एकूण- २९८८.
सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या ‘पीएसआय’ लेखी परीक्षेतील प्रश्नांची काठिण्यपातळीही आजवरच्या परीक्षांपेक्षा अधिक होती. वस्तुनिष्ठ प्रश्नही उमेदवाराच्या स्मरणशक्तीपेक्षा त्याच्या विचारक्षमतेचा कस पाहणारे होते. त्यामुळे नवीन प्रणालीनुसार, किमान पात्रता गुणांची संख्या जरी कमी झाली असली (५० टक्के) तरी प्रश्नांची काठिण्यपातळी अधिक होती, हे निश्चित.
नव्या परीक्षा पद्धतीत बदलत्या काळात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कौशल्यांत अपेक्षित असलेल्या बदलांची चाचणी घेतली जाते. यात, मुलाखतीचेही गुण कमी असले (४०) तरी अंतिम निवडीच्या दृष्टिकोनातून मुलाखतीचे महत्त्व कमी लेखून चालणार नाही.
आजवरच्या ‘एमपीएससी’ परीक्षांमध्ये अंतिम निवड होण्यासाठी मुख्य परीक्षेच्या किमान पात्रता गुणांमध्ये मुलाखत व शारीरिक चाचणीचे कमाल गुण मिसळल्यास जो आकडा येतो तितके गुण संपादन केल्यास उमेदवाराची निवड होऊ शकते. उदा. अलीकडच्या निकालात खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे किमान गुण १०७ आहेत. त्यात मुलाखतीचे ४० व शारीरिक चाचणीतील १०० गुण मिसळल्यास एकूण बेरीज २४७ होते. म्हणजेच खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला ‘पीएसआय’ होण्यासाठी ३५० पकी २४७ गुण मिळवणे आवश्यक आहे. काही वेळा यात जागांच्या संख्येनुसार फरक होऊ शकतो.

haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
fraud in recruitment exam of Mahanirmiti case against four including two candidates
महानिर्मितीच्या भरती परीक्षेत गैरप्रकार, दोन उमेदवारांसह चौघांविरोधात गुन्हा
cetcell latest marathi news, pune cetcell fee, one thousand fee cet cell marathi news
सीईटी सेलचा मोठा निर्णय : उत्तरतालिकांतील प्रश्नोत्तरांवर आक्षेप नोंदवण्यासाठी एक हजार रुपये शुल्क

मुलाखतीच्या व शारीरिक चाचणीच्या तयारीसंबंधी काही महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.

शारीरिक चाचणी
फिटनेस तज्ज्ञांच्या मते, शारीरिक चाचणीमध्ये उत्तम गुण मिळविण्यासाठी मुख्य परीक्षेचा निकाल लागल्यानंतर धावायला सुरुवात करणे उपयोगाचे नाही. शारीरिक चाचणीमध्ये कमाल गुण मिळविण्यासाठी टिकाव धरण्याची वृत्ती, स्टॅमिना तसेच संतुलित आहाराची गरज असते. या गोष्टींचा पाया मजबूत असल्यास लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर दररोज किमान एकवेळ तरी सराव करून आपल्याला ठराविक अंतर कापण्यास किती वेळ लागतो, यासंबंधीची नोंद ठेवावी. हा सराव सकाळ, दुपार अथवा संध्याकाळ अशा वेगवेगळ्या वेळेत करावा, कारण शारीरिक चाचणी ही दिवसभरात कोणत्याही वेळी घेतली जाते.
अर्थातच, शारीरिक चाचणीचे तुमचे लक्ष्य १०० गुण मिळविण्याचे असायला हवे. कारण सर्वसाधारणपणे ‘क्लोजिंग मेरिट’चा निकष पुढीलप्रमाणे असू शकतो= लेखी परीक्षेतील मार्क्स + १०० टक्के शारीरिक चाचणीतील गुण + मुलाखतीचे गुण. ‘पीएसआय’च्या परीक्षेत खुल्या प्रवर्गातील ‘कट ऑफ’ची गुणवत्ता यादी १०७ आहे. मग खुल्या प्रवर्गातील शेवटचा पीएसआय- १०७ + १०० + (४० चे ८०%) = १०७ + १०० + ३२ = २३९ असेल.
त्यामुळे शारीरिक चाचणीचे लक्ष्य १०० गुण मिळविण्याचेच असायला हवे. शिवाय ‘कट ऑफ’ जरी १०७ असला तरी टॉपर १२५ पेक्षा जास्त नसतो. त्यामुळे निवड होण्यासाठी शारीरिक चाचणीचे लक्ष्य १०० पकी १०० हेच असायला हवे.

मुलाखतीची तयारी
सर्वसाधारपणे मुलाखतीविषयी निवडमंडळाचा (पॅनलचा) दृष्टिकोन सकारात्मक असतो. मुलाखत ही उमेदवाराची निवड करण्यासाठी असते, त्याला नाकारण्यासाठी नाही. म्हणूनच, उमेदवाराचा मुलाखतीच्या पॅनलकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा सकारात्मक असायला हवा. ४० पकी निवड होण्यासाठी किमान ३० ते ३२ गुणांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून तयारी करावी, म्हणजे नक्की निवड होऊ शकेल.
‘पीएसआय’ भरतीच्या मुलाखतीत आणि इतर मुलाखतीत फरक असतो. तो म्हणजे ‘पीएसआय’ मुलाखतीची प्रक्रिया ही उमेदवार तत्सम पदांसाठी किती योग्य आहे हे तपासण्यासाठी असते. म्हणजेच ही ज्ञान चाचणी किंवा कल चाचणी नसून व्यक्तिमत्त्व चाचणी असते. सर्वसाधारणपणे प्रशासकीय सेवेतील मुलाखती अधिक औपचारिक असतात. यामध्ये ‘प्रोटोकॉल’ची जाण, वरिष्ठ पदांचे भान या बाबी अपेक्षित असतात. ‘पीएसआय’चे पद हे एकात्मिक सेवा आणि कायदा-सुव्यवस्थेशी थेट निगडित असल्याने उमेदवारांकडून शिस्तीची अपेक्षा अधिक असते. त्यामुळे उमेदवारांचे सादरीकरण व देहबोली सकारात्मक असायला हवी.
मुलाखतीच्या तयारीची सुरुवात नेमकेपणाने करावी. एखादा उमेदवार मुलाखतीच्या पॅनेलसमोर जाण्यापूर्वी निवडमंडळाकडे त्याचे प्रोफाईल आणि एक क्रमांक असतो. जेव्हा उमेदवार पॅनलला सामोरा जातो, तेव्हा त्या क्रमांकाला एक मूर्त स्वरूप प्राप्त होते आणि मग तुमच्या अर्जाच्या आधारित असे प्रश्न तुम्हांला विचारले जातात. पॅनलचा ‘स्टार्टिग पॉइंट’ जर तुम्ही भरून दिलेला अर्ज असेल तर तुमच्या तयारीचा ‘स्टार्टिग पॉइंट’सुद्धा तुमचा अर्ज असायला हवा.
मुलाखतीची तयारी सुरू करताना तुम्ही आयोगाकडे अपलोड केलेल्या अर्जाचे व्यवस्थित वाचन व निरीक्षण करा. त्याकडे तटस्थ व वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहा, तुमच्या अर्जामधील कोणती बाब उठून दिसते, हे लक्षात घ्या. उदा. शिक्षण, नोकरीचा अनुभव किंवा अभाव, शिक्षणेतर कामगिरी अथवा सहभाग इ.
या व्यतिरिक्त पोलीस खात्याचे ज्ञान (सध्या हा घटक मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातही अंतर्भूत आहे.) तसेच काही महत्त्वाच्या चालू घडामोडी यांचे योग्य सादरीकरण मुलाखतीत करता यायला हवे.
जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर आले नाही तर काय करायचे, हा संभ्रम अनेक उमेदवारांना पडतो. सर्वप्रथम लक्षात ठेवा की, ही मुलाखत आहे. तोंडी परीक्षा नाही. त्यामुळे या मुलाखतीचे स्वरूप प्रश्नोत्तराचे नसून संवादाचे आणि साद-प्रतिसादाचे असावे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहीत नसेल तर तुमचा प्रतिसाद संयत असावा. उदा. एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर तुमचे उत्तर- ‘माफ करा सर, मला आठवत नाही.’ अथवा ‘मी वाचले होते, पण नेमके लक्षात नाही.’ असे असावे. मात्र, हे सांगत असताना तुमच्या उत्तरात तुमचा प्रामाणिकपणा आणि विनम्रता दिसायला हवी. एखाद्या वैयक्तिक मुद्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला किंवा मताधिष्ठित प्रश्न विचारला गेला तर तुमचा प्रतिसाद- ‘माहीत नाही.’ ‘आठवत नाही.’ असा असू नये. अशा वेळी अत्यंत संयतपणे, विचारपूर्वक प्रतिसाद देणे आवश्यक आहे. अन्यथा, तुम्ही गुण गमावाल. लक्षात ठेवा, प्रश्नाचे उत्तर आले नाही, म्हणून मार्क्स कमी होत नाहीत. परंतु, त्या परिस्थितीत योग्य प्रतिसाद न दिल्याने तसेच ती परिस्थिती प्रभावीपणे न हाताळल्याने मार्कावर नक्कीच विपरीत परिणाम होतो.
मुलाखतीच्या वेळेस तुमची देहबोलीही महत्त्वाची ठरते. राल्फ इमर्सन यांचे प्रसिद्ध वाक्य आहे, ‘What you do is so powerful, I cannot hear what you say’. अर्थात तुम्ही जे करता, ते इतके लक्षवेधी असते की, तुमचे बोलणे त्यात लपून जाते. म्हणजेच केवळ शब्दांनी संवाद होत नाही तर तुमच्या बोलण्याला देहबोलीची जोड मिळत असते. अनेकदा आपल्या देहबोलीवर आपला ताबा नसतो आणि आपण ती फारशी बदलूही शकत नाही. कारण आपल्या देहबोलीतून आपल्या मनातल्या भावना नकळतपणे व्यक्त होत असतात. मात्र, आपली देहबोली जाणून घेतली आणि त्याविषयी जागरूक राहिलो तर आपण ती प्रभावी करू शकतो. मुलाखतीमध्ये देहबोलीला साधारणपणे ६० टक्के महत्त्व आहे. मुलाखतीसाठी देहबोलीचे प्रमुख घटक म्हणजे आपली बसण्याची पद्धत, नजर, हातवारे, चेहऱ्यावरील हावभाव आणि एकूण सादरीकरण.
देहबोलीची तयारी करण्यापेक्षा आपल्या नसíगक देहबोलीची ओळख करून घेणे महत्त्वाचे असते. त्यासाठी दररोज सकाळ-संध्याकाळ १० ते १५ मिनिटे आरशासमोर बसून स्वत:कडे बघून बोलण्याचा सराव करावा म्हणजे आपले हावभाव, नजर, हातवारे कसे होतात, हे तुम्हाला कळू शकेल. त्रुटी लक्षात घेऊन तुम्ही त्यात सुधारणा केलीत तर मुलाखतीच्या वेळेस होणारी तुमची कामगिरी अधिक उंचावेल.

हे लक्षात घ्या, की मुलाखत हा तुमच्या निवड प्रक्रियेतील अंतिम व महत्त्वपूर्ण भाग आहे. मुलाखतीची तयारी म्हणजे स्वत:ला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याची प्रक्रिया! स्वत:चे गुण-दोष जाणून घेत त्यावर नियंत्रण ठेवण्याची ही अनमोल संधी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलाखतीच्या पॅनलमधील वरिष्ठ आणि तज्ज्ञ मंडळींसोबत वैयक्तिक चर्चा करण्याची तुम्हाला मिळालेली ही संधी आहे. त्यासाठी शुभेच्छा!