भारतीय नौदलात प्रशिक्षणार्थी नौसैनिकांची निवड करण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून खालीलप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहेत. आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदारांनी बारावीची परीक्षा गणित व भौतिकशास्त्र हे आवश्यक विषय व त्याशिवाय रसायनशास्त्र, जीवशास्त्र व संगणकशास्त्र यांसारख्या विषयांसह व कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोगट - अर्जदारांचा जन्म १ ऑगस्ट १९९८ ते ३१ जुलै २००१ च्या दरम्यान झालेला असावा व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. निवड प्रक्रिया- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची लेखी निवड परीक्षा घेण्यात येईल. निवड परीक्षा बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल व त्यामध्ये इंग्रजी, विज्ञान, गणित व सामान्य ज्ञान या विषयांचा समावेश असेल. परीक्षा इंग्रजी वा हिंदी माध्यमातून देण्यात येईल. लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना नौदल निवड मंडळातर्फे शारीरिक पात्रता परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल व त्याआधारे त्यांची नौदलात निवड करण्यात येईल. प्रशिक्षण, वेतनश्रेणी व फायदे- निवड झालेल्या उमेदवारांना नौदलात प्रशिक्षणार्थी नौसैनिक म्हणून नेमण्यात येईल. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना नियमितपणे वेतनश्रेणीत नेमण्यात येईल. उमेदवारांना नौसैनिक म्हणून दरमहा २१,६०० ते ६९,१०० या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल. या वेतनश्रेणीतील मूळ वेतनाशिवाय त्यांना दरमहा ५२०० रु. चा विशेष भत्ता, ६२०० रु.चा समूह भत्ता, इतर भत्ते, फायदे व नौदलाच्या नियमांनुसार भविष्यकालीन बढतीच्या संधी उपलब्ध होतील. अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली भारतीय नौदलाची जाहिरात पाहावी अथवा नौदलाच्या joinindiannavy.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०१७ आहे. - द.वा.आंबुलकर मी सध्या एम.ए. च्या पहिल्या वर्षांला आहे. मला लेक्चरर व्हायचे आहे. त्यासाठी मला कोणत्या परीक्षा द्याव्या लागतील. त्याची अर्हता काय? एखादी पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर मला कुठे कुठे नोकरीच्या संधी मिळू शकतील? केवळ पदवीमुळे कोणत्या संधी मिळतील? - सोहेल शेख लेक्चरर होण्याची पात्रता प्राप्त करण्यासाठी नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट किंवा स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच नेट/सेट द्यावी लागेल. नेट उत्तीर्ण उमेदवार हे देशातील कोणत्याही यूजीसी मान्यताप्राप्त महाविद्यालयातील अध्यापक पदासाठी पात्र ठरतात. सेट उत्तीर्ण उमेदवार हे महाराष्ट्रातील कोणत्याही यूजीसी मान्यताप्राप्त महाविद्यालयातील अध्यापक पदासाठी पात्र ठरतात. ही परीक्षा कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवीधारक देऊ शकतो. तथापी केवळ ही पात्रता मिळवली म्हणजे नोकरी लागेलच असे नाही. कारण त्यानंतर मुलाखत/व्यक्तिमत्त्व चाचणी अशा प्रक्रियेमधून उमेदवारांना जावे लागते. जे विद्यार्थी यात उत्तम गुण मिळवतात, त्यांचीच निवड होते. सध्या आपल्या देशात केवळ पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर थेट कोणतीही शासकीय नोकरी मिळत नाही. अशी नोकरी मिळवण्यासाठी तुला राज्य किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा द्याव्या लागतील. मी बीए, एम.लिब. आणि सेट परीक्षा उत्तीर्ण आहे. मला नोकरीच्या तत्काळ संधी कुठे उपलब्ध होतील? - ज्ञानेश्वर आहेर सध्यातरी आपल्या देशात व राज्यात कोणतीही पदवी घेतली तरी थेट नोकरी मिळेल अशी स्थिती नाही. ही बाब लक्षात घेतल्यास तत्काळ तुला कोणतीही थेट नोकरी मिळू शकत नाही. मात्र राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, स्टाफ सिलेक्शन परीक्षा, रेल्वे रिक्रूटमेट बोर्ड परीक्षा, एलआयसी, जीआयसी ,पोस्ट ऑफिसेसमधील विविध पदांसाठी घेण्यात येणारी परीक्षा, सार्वजनिक बँकांमधील विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांद्वारे दरवर्षी किमान ५० हजारांवर उमेदवार निवडले जातात. त्यासाठी तू प्रयत्न करावास. तुझ्या पदव्युत्तर पदवीद्वारे तू अध्यापन क्षेत्रातील नोकरीसाठी प्रयत्न करू शकतोस. त्यासाठी तुला अशा संधीचा सतत शोध घ्यावा लागेल. मला कृषी अधिकारी व्हायचे आहे. मी सध्या बी.एच्या दुसऱ्या वर्षांला आहे. मी काय करावे? - विजय म्हस्के कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी राज्य लोकसेवा आयोगामार्फत कृषी सेवा परीक्षा घेतली जाते. या परीक्षेला बी.एस्सी ( कृषी), बी.एस्सी (कृषी जैव तंत्रज्ञान), बी.एस्सी( कृषी व्यवसाय व्यवस्थापन), बी.एस्सी (उद्यानविद्य), बी.एस्सी(गृह विज्ञान), बी.टेक इन फूड टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ फिशरी सायन्स यांपैकी कोणतीही एक अर्हता प्राप्त उमेदवार बसू शकतात. तुझ्याकडे ही अर्हता नसल्याने तू या परीक्षेला बसू शकत नाही. मी कला शाखेचा पदवीधर आहे. पण माझे इंग्रजी कच्चे आहे. मला पोलीस उपनिरीक्षक व्हायचे आहे. मला काय करावे लागेल ? - अविनाश हिवरे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत इंग्रजी विषयाचा पेपर असतो. त्याचा दर्जा हा साधारणत: दहावी किंवा बारावीच्या इंग्रजीच्या पेपरइतका असतो. मुलाखत व शारीरिक चाचणीत निवड होण्यासाठी तुला लेखी परीक्षेत किमान गुण मिळवावेच लागतील. त्यामुळे तुझे इंग्रजी कच्चे असले तरी तुला त्या विषयाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. उपनिरीक्षकपद निवडीच्या लेखी परीक्षेत इंग्रजी सोडून सर्व विषयांत उत्तीर्ण झालास तरी पुढील टप्प्यातून तू बाद होशील. इंग्रजीचा अभ्यासक्रम लक्षात घेऊन तू चांगल्या शिक्षकांकडे शिकवणी लावावीस असे वाटते. या शिक्षकाला स्वत:मधील कमतरता मोकळेपणाने सांगून टाकावी. त्यानंतर ते सांगतील तसा मुळापासून अभ्यास करावा. व्याकरणाच्या संकल्पना स्पष्ट करून घ्याव्यात. शब्दसंपत्ती वाढवावी. भरपूर इंग्रजी वाचावे. लिखाणाचा सराव करावा.