महापुरे झाडे वाहती, तेथे लव्हाळे वाचती। तुकोबाराय म्हणालेत; ते किती खरं आहे.. लहानपणातच म्हणजे नम्रपणातच मोठेपण दडलेलं असतं. स्वभावातली नम्रता माणसाला यशाचं शिखर दाखवत असते. तुम्ही किती ‘मोठे’ आहात हे तुम्ही किती नम्रतेनं वागता; यावरून ठरत असते. नम्रतेला उंची असते; प्रतिष्ठा असते. एक ओळख असते. नम्रता म्हणजे लाचारी वा अगतिकता नव्हे. नम्रता म्हणजे आपल्या विचारांचं कृतीतून अभिव्यक्त होणारं प्रतिरूपच असतं. नम्रता आपल्याला बऱ्याचदा आपल्या पात्रतेपेक्षाही प्रतिष्ठा, प्रेम, पत आणि पद देत असते. नम्रतेमुळेच आपण लोकांच्या हृदयाच्या समीप राहात असतो. कारण नम्रता आपल्या विचारांतून आणि कृतीतून नकळतपणे आपली ओळख सांगत असते. नम्रता आपल्याला आंतरबाह्य व्यक्त करत असते. नम्रतेचे पाय मातीचे हवेत आणि हात मात्र संस्कारांचे हवेत. मग आपण खूप काही रुजवू शकतो, फुलवू शकतो, साकार करू शकतो.. नम्रतेमध्ये नकाजत हवी.. स्वाभाविकता हवी.. सहजगता हवी.. मग नम्रता भरभरून देत असते सर्वकाही मनासारखं.. मनसोक्त. जगाचा आवाका असतो ज्यांच्या डोक्यात तीच डोकी झुकत असतात; इतरांसमोर.. झुकता वही हैं; जिस में जान होती हैं । अकडे रहना मुडदे की पहचान होती हैं ॥ आयुष्यात जे काही मिळवायचं असतं ते प्राप्त करण्यासाठी विनयशीलताच महत्त्वाची असते. म्हणूनच असं म्हटलं गेलंय ‘विद्या विनयेन शोभते’.. आयुष्यभर विद्यार्थी होऊन जगता आलं पाहिजे. ज्ञानवंतांना ज्ञानाची वेगवेगळी कवाडं उघडण्यासाठी नम्रता साहाय्यभूत ठरत असते. म्हणूनच एकलव्य होऊन अशक्यप्राय गोष्ट साध्य करता येते. ८ ८ प्रा. विजय जामसंडेकर ५्र्नं८्नंे२ंल्लीि‘ं१@८ंँ.ूे