श्रीकांत जाधव

अभ्यासक्रमाची तोंडओळख प्रस्तुत लेखामध्ये यूपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर तीनमधील नमूद घटकांची थोडक्यात माहिती घेणार आहोत. या पेपरमध्ये तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन या घटकांचा अभ्यास करावा लागतो.

आर्थिक विकास यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थासंबंधित मुद्दय़ांचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये अर्थव्यवस्थेशी निगडित आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि या संपत्तीच्या वापराचे नियोजन, सर्वसमावेशक वाढ साध्य करण्यासाठी सरकारमार्फत राबविले जाणारे महत्त्वाचे उपक्रम, देशातील बजेट प्रक्रिया (Budgetary process), कृषी आणि कृषीसंबंधित संलग्न असणारी क्षेत्रे तसेच कृषी क्षेत्राची उत्पादकता आणि स्थूल देशांतर्गत उत्पादनातील वाटा वाढविण्यासाठी  सरकारमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना आणि या क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या तसेच त्या  समस्या सोडविण्यासाठी सरकारने आखलेली ध्येयधोरणे. औद्योगिक क्षेत्र, सेवाक्षेत्र यांसारख्या आर्थिक विकासाला आणि आर्थिक वृद्धीला अधिक गती देणाऱ्या क्षेत्रासाठी सरकारमार्फत राबविले जाणारे विविध उपक्रम, योजना, आखण्यात आलेले कायदे, भारतामध्ये परकीय गुंतवणूक वाढविण्यासाठी आखण्यात आलेली रणनीती याचबरोबर भारताचे परकीय व्यापार धोरण व निर्यात वाढीसाठी आखलेल्या विविध उपाययोजना, दळणवळण क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सरकारमार्फत केले जाणारे विशेष प्रयत्न, १९९१ मध्ये भारताने स्वीकारलेले आर्थिक उदारीकरणाचे धोरण आणि याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, जागतिकीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम, इत्यादी अभ्यासावे लागेल.

तंत्रज्ञान या अभ्यास घटकामध्ये भारत सरकारची विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये विकास घडवून आणण्यासाठी आखलेली धोरणे, विज्ञान आणि तंत्रज्ञानचा विकास व व्यवहार उपयोगिता, तसेच याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर होणारा परिणाम, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि दिलेले योगदान तसेच माहिती तंत्रज्ञान, संगणक, अवकाश संशोधन, नॅनो तंत्रज्ञान, जैव-तंत्रज्ञान आणि बौद्धिक संपदा अधिकारसबंधित मुद्दे इत्यादी बाबींचा समावेश आहे आणि यासंबंधी दररोज काहीना काही महत्त्वाच्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे हा घटक अभ्यासताना उपरोक्त नमूद केलेल्या प्रत्येक बाबीची मूलभूत अर्थात संकल्पनांसह योग्य समज असावी लागते. थोडक्यात, विज्ञान आणि तंत्रज्ञान हा घटक अभ्यासताना विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये लावले जाणारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नवनवीन शोध, आणि या शोधामुळे होणारे फायदे आणि तोटे, संबंधित बौद्धिक संपदा अधिकार  तसेच याचे होणारे परिणाम इत्यादी महत्त्वपूर्ण पैलूवर भर देण्यात येतो.

जैवविविधता व पर्यावरण यामध्ये पर्यावरण संवर्धन, पर्यावरण आणि जैवविविधतेचा होणारा ऱ्हास व या ऱ्हासासाठी जबाबदार असणारे घटक, जैवविविधतेला निर्माण झालेला धोका, पर्यावरणीय प्रदूषण, नदी प्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनिप्रदूषण व यामुळे उत्पन्न झालेल्या समस्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षणासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजना, भारत सरकारमार्फत जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षित करण्यासाठी पास करण्यात आलेले विविध कायदे व त्यांची उपयुक्तता याचबरोबर पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन इत्यादी मुद्दे अभ्यासावे लागतात.

आपत्ती व्यवस्थापन यामध्ये आपत्तीचे प्रकार ज्यामध्ये नैसर्गिक आणि मानवनिर्मित प्रकारांचा अंतर्भाव आहे, आपत्तीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, तसेच आपत्ती निवारणासाठी सरकारमार्फत आखण्यात आलेली आपत्ती व्यवस्थापन योजना व कायदे इत्यादी मुद्दे अभ्यासावे लागणार आहेत.

सुरक्षा या घटकामध्ये भारताच्या बा आणि अंतर्गत सुरक्षेसंबंधी मुद्दय़ांचा समावेश करण्यात आलेला आहे. डाव्या विचारसरणीचा दहशतवाद अर्थात नक्षलवाद, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी, दहशतवाद, वाढता प्रादेशिकवाद, पूर्वेकडील राज्यामध्ये होणारी घुसखोरी व वांशिक चळवळी, जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद, आंतरराष्ट्रीय सीमासंबंधी असणारे वादविवाद, संघटित गुन्हेगारी, अवैध पैसा हस्तांतरण, सीमेवर अवैधरीत्या होणारी नशिल्या पदार्थाची तस्करी आणि याचे असणारे संघटित स्वरूप, सततचे  होणारे भाषिक वाद, राज्या-राज्याअंतर्गत असणारे वाद, धार्मिक दंगे, सायबर सुरक्षासंबंधित मूलभूत माहिती, माध्यमे आणि सोशल नेटवर्किंग साइट्स याचा होणारा वापर ज्याद्वारे देशातील सामाजिक सलोख्याला निर्माण होणारा धोका, सुरक्षेला निर्माण होणारी आव्हाने इत्यादी बाबी आणि यासोबत या आव्हानांना सामोरे जाताना भारत सरकारने आखलेली रणनीती ज्यामध्ये सीमा सुरक्षा आणि व्यवस्थापन अधिक सक्षमरीत्या राबविणे, सीमेलगतच्या भागाचा विकास घडवून आणणे, याचबरोबर सागरी सुरक्षा अबाधित राखणे इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा समावेश यात आहे. देशाची बा आणि अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी सरकारमार्फत स्थापन करण्यात आलेल्या विविध सरकारी संस्था आणि संघटना व त्यांना नेमून दिलेले कार्य याचबरोबर सरकारमार्फत वेळोवेळी केल्या जाणाऱ्या उपाययोजना व कायदे याची माहिती असणे आवश्यक आहे.

या पेपरचा अभ्यास करताना पारंपरिक माहिती व महत्त्वाच्या चालू घडामोडी यांची सांगड घालून  परीक्षेच्या दृष्टीने तयारी करावी लागते. या पुढील लेखामध्ये या पेपरमध्ये नमूद केलेल्या आर्थिक विकास या घटकाची तयारी करण्यासाठी लागणाऱ्या उपयुक्त संदर्भग्रंथांचा तसेच गतवर्षीय मुख्य परीक्षेत या  घटकावर कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आलेले होते, याची एकत्रित चर्चा करणार आहोत.