मुलांनी आनंदानं फुलण्यातली शिक्षकाची उत्प्रेरकाची भूमिका समजून घेत ती आपलीशी करू या आणि अनवधानाने हरवत चाललेली आपल्यातली सहसंवेदना जागवू या, हे सांगणारा लेख-
‘आमची शाळा विनाअनुदानित आणि तशी नवीन आहे, पण शिक्षिका बीएड आहेत. सर्वाचा साधारण पाच-सहा वर्षांचा अनुभव आहे, मनापासून शिकवतात. आमच्या शिकवण्याच्या आणि विचार करण्याच्या पद्धती थोडय़ा कालबाह्य़ होतायत असं हल्ली वाटतंय. सगळं फळ्यावर लिहून देणं, पुन:पुन्हा प्रश्नोत्तरं लिहायला लावणं, शिक्षा करणं या गोष्टी शिक्षकांसाठी सोयीच्या आहेत खऱ्या, पण तरी काहीतरी कमी पडतंय. बदलत्या जगाचा वेग पाहिला की वाटतं, शिकवण्यामधलंही काहीतरी बदलायला हवंय. पण म्हणजे नक्की काय करायचं ते कळत नाही. मग सवयीच्या जुन्या पद्धतीच चालू राहतात. आमच्या शाळेत शिक्षिकांशी बोलायला, शेअिरग करायला याल का?’ उपनगरातल्या एका शाळेच्या संचालिकांनी एकदा विचारलं.
सातवीपर्यंत प्रत्येक वर्गाच्या दोन-दोन मराठी आणि एकेक इंग्रजी तुकडय़ा असणारी त्यांची छोटी शाळा होती. साधारणपणे कुठल्याही शाळेतल्या शिक्षिकांसारख्याच ‘मुलं लक्षच देत नाहीत’, ‘अजिबात ऐकत नाहीत’, ‘अभ्यास करत नाहीत,’ ‘गृहपाठ टाळतात’ अशा प्रकारच्या त्यांच्याही समस्या/ तक्रारी होत्या. मात्र ‘आजकालची पिढी बिघडत चाललीय, मुलांच्या वागण्याला काही ताळतंत्रच राहिलेला नाही, दणकून शिस्त लावली पाहिजे,’ अशा साच्यात त्या अडकलेल्या नव्हत्या. सगळ्याच मुलांबाबत हे प्रश्न येताहेत याचा अर्थ आपल्यालाही विचारांचा ढाचा बदलला पाहिजे, हे त्यांना जाणवत होतं, हे विशेष होतं.

शिक्षणाच्या क्षेत्रात काम करताना विविध प्रकारच्या शाळा-शिक्षकांशी संबंध येतो. शिक्षणशास्त्रातले पदवीधर शिक्षक असतात, तसेच अप्रशिक्षित पण मुलांवर प्रेम करणारे, बांधीलकीनं शिकवणारे, हौशीही असतात. शिक्षक आणि शिकवणं याबाबतच्या अनेक बऱ्या-वाईट अनुभवांतले हे काही प्रातिनिधिक अनुभव.
‘या चौथीतल्या मुलांना अजून बेरजा-वजाबाक्या येत नाहीत, मोठय़ा अक्षरातली वाक्यंदेखील वाचता येत नाहीत, स्वत:च्या नावाचं स्पेिलगसुद्धा करता येत नाही.. कसं शिकवायचं यांना?’ झोपडपट्टीतल्या एका वर्गात शिकवायला येणारे पाच-सहा अभियंते एकदा हताशपणे सांगत होते.  
हे अभियंते काम करायचे, त्या कॉर्पोरेट कंपनीनं झोपडपट्टीतल्या मुलांसाठी वर्ग चालवणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला ‘सीएसआर’ खाली जोडून घेतलं होतं.  (सीएसआर – कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे सामाजिक जबाबदारी म्हणून कंपन्यांनी दरवर्षी आपल्या नफ्यातील काही विशिष्ट रक्कम आणि वर्षांला काही विशिष्ट मनुष्य तास सामाजिक कामासाठी दिले पाहिजेत, असे कायदेशीर बंधन कॉर्पोरेट कंपन्यांवर आहे, त्यानुसार केलेलं काम.) संस्थेकडे मुलांना अनेक खेळ आणि थोडा अभ्यास शिकवण्यासाठी अर्धवेळासाठी काही महाविद्यालयीन विद्यार्थी होते. शिवाय कॉर्पोरेट कंपनीतले अनेक तरुण अभियंते इंग्रजी आणि सामान्य ज्ञान शिकवण्यासाठी आळीपाळीनं आठवडय़ातले दोन तास येत. काही वर्षांनी याच मुलांमधून विशिष्ट प्रशिक्षित मनुष्यबळ मिळावं अशीही कंपनीची अपेक्षा होती. सामाजिक बांधीलकीच्या दृष्टीनं हा उपक्रम उत्तमच होता. मुलांनाही हे ‘दादा’ आवडत होते. अभियंत्यांची  मुलांशी चांगली दोस्ती जमली होती आणि ते अस्वस्थ होते. ‘महापालिकेच्या शाळेत जाणाऱ्या या मुलांना खेळ, स्मार्टनेसबद्दल शिकवणं ठीक आहे, पण त्यांना अभ्यासातलं काहीच धड येत नाही तर गरजेपुरतं इंग्रजी तरी कसं शिकवणार? ही त्यांची समस्या होती. तर ‘लेखन-वाचन आणि हिशेबांएवढी तरी किमान कौशल्यं सगळ्या मुलांपर्यंत कशी पोहोचवायची?’ अशी या वर्गाला रोज अभ्यासविषय शिकविणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अडचण होती.  

‘आज आमच्या शाळांमधली बहुसंख्य मुलं माध्यान्ह भोजनामुळे शाळेत येतात, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. जेवणानंतर खूप मुलं पळूनच जातात. शाळा आवडते म्हणून मुलं शाळेत यावीत आणि टिकावीत यासाठी तुमच्याकडे काही आहे का? मी विज्ञान खेळण्यांसंबंधी काम करत असताना एका माजी शिक्षण संचालकांनी विचारलं होतं.

मुलांना मारहाण, टोचून बोलणं, मानहानीकारक शिक्षा आणि टोमणे, जात-धर्माच्या संदर्भात आपल्यातली – त्यांच्यातली मुलं’ हा फरक करणं हे तर सगळीकडेच कमी-अधिक प्रमाणात दिसतं, पण एका शाळेतला विदारक अनुभव लक्षात राहिलाय. शाळेच्या संचालिका बाईंनी आवर्जून शाळा पाहायला बोलावलं. एक शिक्षिका सोबत दिल्या. सरकारी अधिकाऱ्यांना दाखवतात त्याच पद्धतीनं बाईंनी मलाही शाळा दाखवली. शिक्षकांनी मुलांकडून बनवून घेतलेलं ‘ज्ञानदीप’ छापाचं साहित्य, सुविचार, शाळेचा निकाल, प्रयोगशाळा, एखाद्या वर्गानं म्हणून दाखवलेली कविता वगरे नेहमीचं सगळं झालं. शाळेची आणखी वैशिष्टय़ं दाखवून थोडी छाप पाडावी, असं बाईंना वाटलं असावं. ‘ऊस तोडणी कामगारांची एवढी मुलं या वर्गात आहेत. उभं रहा रे ऊस कामगारांच्या मुलांनी’ म्हणत त्यांनी मुलांना उभं केलं. मग एखादं अपंग मूल, एखादं गतिमंद मूल.. मुलांसाठी ते ‘उभं रहा रे..’ नेहमीचं असावं. ती मख्ख चेहऱ्यांनी अवघडून उभी राहात होती. मी अस्वस्थपणे हे प्रदर्शन थांबवण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांनी आणखी एका मुलाला उभं केलं. ‘याच्या आई-वडिलांना दोघांनाही ‘एड्स’ झाला आहे. ते हॉस्पिटलमध्ये आहेत, पण आम्ही त्याला शाळेत ठेवलंय. त्याचं नुकसान होऊ दिलेलं नाही..’ त्यांनी अभिमानानं सांगितलं. मी त्या मुलाच्या खांद्यावर जरासं थोपटून झटकन वर्गाबाहेर पडले. त्याच्या नजरेला मला नजर देता आली नाही..

मुलांविषयीच्या गोष्टी वागण्याबद्दलच्या असोत की अभ्यासाच्या, ठिकठिकाणचे अनुभव हेच सांगतात की, मुलं आणि शिकवणं याबाबत प्रत्येक संबंधितानं वाढवायला हवी आहे ती संवेदनशीलता. शिक्षक प्रशिक्षित असोत, वस्तीतल्या वर्गात शिकवणारे अप्रशिक्षित असोत किंवा सामाजिक भान असणारे हौशी उच्चशिक्षित असोत, शाळा आणि शिक्षणाबद्दल सगळीकडे एक हताश भावना व्यापून राहिली आहे. परिस्थिती बदलत नाही कारण त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आणि गृहीतकं आपण  बदलत नाही. आजही सगळं काल घडलं तसंच घडत असेल तर बदल कसा घडेल? आपल्या साच्यातल्या भूमिकेतून बाहेर पडून विद्यार्थ्यांपर्यंतचं अंतर कापून आपण जेव्हा त्यांच्या जवळ जाऊ, त्यांच्या भूमिकेत शिरू, तेव्हा तिथून पुढे जायला त्यांना कशी मदत करायची तेही आपोआप लक्षात येईल.
मुलांबद्दलची मनातली गृहीतकं बाजूला ठेवून समोरचं प्रत्येक मूल ही आपल्यासारखीच एक व्यक्त आहे हे लक्षात ठेवलं की बरंचसं स्पष्ट दिसायला लागतं. सहसंवेदना जागी झाली की दुसऱ्यांचा आत्मसन्मान दिसतो, अडचणी समजतात. पण आपल्या सवयींमध्ये एवढे अडकलेले असतो की कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याच्या आपल्या स्वत:चा अ‍ॅप्रोच कसा आहे, ते आपण त्रयस्थपणे पाहातच नाही. तो योग्य आहे की अयोग्य हा त्यानंतरचा प्रश्न.
उदाहरणार्थ, मुलांकडे आपण जेव्हा ‘लहान आहेत, त्यांना काय कळतंय?’ असं पाहतो तेव्हा आपल्या मनात मुलं ‘मातीचा गोळा’ असतात, ज्यांना आपण ठाकून ठोकून आकार देणार असतो. एकदा मुलांना मातीचा गोळा मानल्यावर त्यांच्या संवेदनांचा प्रश्नच  येत नाही. आपण तर त्यांच्यापेक्षा वयानं मोठे आणि ज्ञानी असतोच, वर ठाकण्याठोकण्याचा अधिकारही घेऊन आपण आणखी ‘शक्तिमान’ होतो. हा पॉवर गेम  आणि त्याच्यासोबत येणारी हरण्याची भीती या दोन्ही भावनांपुढे शिकवण्यातला आनंद मागे पडतो.
याउलट ‘प्रत्येक मूल ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे, तिला तिचा आकार मिळेलच, फक्त ती लहान असल्यामुळे अडेल तिथे मी मदत करायची आहे आणि तिची काळजी घ्यायची आहे’ अशी भूमिका असेल तर मुलांच्या वाढण्याच्या प्रक्रियेचा शिकवणारा उत्प्रेरक बनतो आणि त्या प्रक्रियेचा दोघांनाही आनंद मिळतो.

हा अ‍ॅप्रोच बदलायचा म्हणजे करायचं काय? ज्या शिक्षकांना ‘काहीतरी कमी पडतंय’ असं कळत असतं त्यांनी स्वत:च्या मनातल्या ‘याला समजत ‘कसं’ नाही?’ हा प्रश्नाकडे दुसऱ्या बाजूनं थोडं जवळून पाहावं. ‘समजत कसं नाही तुला?’च्या पुढच्या कंसातल्या ओळी असतात, ‘बावळटच आहेस’, ‘तुला डोकंच कमी आहे’, ‘तुला लक्षच द्यायचं नसतं’, ‘..मग मी तुला कसं शिकवणार?’ या कंसातल्या ओळी संताप देतात किंवा हताशपणा. त्याऐवजी, तोच प्रश्न याला ‘कशामुळे’ येत नाहीये? त्याची काय अडचण आहे?असा बदलला तर कंसात असेल, ‘तेवढी अडचण सोडवली की त्याला समजायला लागेल. कुणालाही सहज समजण्याएवढा विषय सोपा कसा करायचा ते शोधावं लागेल.’
विषय सोपा करायचा याचाच अर्थ, मूल आता शिकण्याच्या कुठल्या टप्प्यावर आहे ते पाहायला शिकायचं. वर उल्लेख केलेले अभियंते ‘या वयाच्या मुलांना एवढं यायला पाहिजे’ या गृहीतकात अडकलेले होते. त्याऐवजी बहुसंख्य मुलांना किती येतंय, ते पाहून त्यांनी तिथून सुरुवात केली की मुलांना समजायला लागेल. ‘देणारा’च्या भूमिकेत गेलं की मनात कुठेतरी श्रेष्ठत्वाची भावना असते. पण मुलांना शिकवताना ते जिथे असतील त्या पातळीवरच पोहोचावं लागतं. मग मुलांची समजण्याची नस पटकन सापडते. पहिल्या टप्प्यानं थोडा जास्त वेळ घेतला तरी पुढे वेग पकडता येतो.
मोठय़ा शाळांमध्ये वर्गाची पटसंख्या खूप असल्यामुळे अगदी प्रत्येकाला समजून घेणं अवघड असेल तरी मुलांचे त्या त्या वेळच्या आकलनाच्या टप्प्याप्रमाणे गट करून शिकवणं सोयीचं होऊ शकतं. कधी गटांप्रमाणे गृहपाठ देणे, किंचित स्पर्धा निर्माण करून वाढायची प्रेरणा देणे हीच खरं तर शाळेची कामं. प्राथमिक शाळेच्या वयापासूनच शिक्षकाचं काम ‘मुलांना पेपर चांगला लिहिता येण्यासाठी शिकवणं’, ‘पास होण्यासाठी किंवा पाठांतरासाठी मदत करणं’ असं असण्यापेक्षा.
शिकायला शिकवणं, पाहायला आणि वेचायला शिकवणं असा शिक्षकाचा अ‍ॅप्रोच जादू घडवू शकतो. शाळा म्हणजे शिकण्याचं कौशल्य एकत्रितपणे मोठय़ा समूहापर्यंत पोहोचविण्यासाठीचे माध्यम. प्रत्येक अनुभवातून काही ना काही शिकण्याचं कौशल्य शाळेने मुलांपर्यंत पोहोचवायला हवं.
महाराष्ट्रातल्या प्रयोगशील शाळा हे ‘शिकायला शिकवणं’ कसं जमवतात आणि किमान कौशल्यं समूहापर्यंत पोहोचवण्यासाठी पालकांसह मुलांची ऊर्जा कशी वापरतात, शाळेकडे ‘माध्यम’ म्हणून कसं पाहतात याची काही उदाहरणं द्यावीशी वाटताहेत.
तिसरी-चौथीच्या टप्प्यावर काही शाळांमध्ये ‘प्राणिसंग्रहालयाची सहल’ हा ‘गृहपाठ’ असतो. ‘पुढच्या सोमवापर्यंत मुलांना प्राणिसंग्रहालय दाखवून आणावे’ अशी चिठ्ठी पालकांना जाते. काय काय पाहाल? याची यादीदेखील सोबत जोडलेली असते. शाळेनं सांगितलंय म्हणून का होईना, पण वर्गातल्या सर्व मुलांना (अगदी बिझी पालकांच्या मुलांनादेखील) त्यानिमित्ताने एका कौटुंबिक सहलीचा अनुभव मिळतो. ‘काय पाहाल?’मध्ये पक्ष्यांच्या नख्या, त्यांचं बसणं, प्राण्यांचे दात, जबडे, अंगावरचे पट्टे अशा गोष्टी असतात. गृहपाठ म्हणून या सगळ्या गोष्टी पाहतानाच नकळतपणे विद्यार्थी ‘निरीक्षण करण्याचं कौशल्य’ शिकत असतात. कित्येक पालकांनाही हा दृष्टिकोन नवीन असतो. त्यानंतर शाळेत मुलं त्या अनुभवांचं शेअिरग करतात आणि आपण काय काय ‘पाहिलं’ ते सांगतात. त्या संदर्भात असणारा अभ्यासक्रमातला टॉपिक आपोआप शिकवून झालेला असतो किंवा त्याची पूर्वतयारी झालेली असते.
माध्यमिक वर्गामध्ये विज्ञान शिकवताना त्या त्या धडय़ातली इंग्रजी टर्मिनॉलॉजीपण लिहून दिली जाते आणि परीक्षेत त्यावर प्रश्न असतो. त्यामुळे सर्व मुलांना ते समजून घेऊन पाठ करावंच लागतं. शब्द ओळखीचे झाल्यामुळे पुढे महाविद्यालयात गेल्यावर समजायला अडचण पडत नाही.
  शिकणं असं मुलांच्या पातळीवर जाऊन सहसंवेदनेतून रुजायला हवं. मग तो स्वभाव बनतो. शिक्षा करत शिकवणं फारसा परिणाम देत नाही. शिक्षा केल्यामुळे अचानक मुलांचं आकलन वाढू शकत नाही, हे आपण समजून घ्यायला हवं. याचा अर्थ शिस्त नको, शिक्षा नको असा नव्हे, तर अवमानकारक शिक्षा नको, अतिरेकी शिस्त नको. असंवेदनशील शिस्त आणि शिक्षेमुळे मुलांच्या मनात शाळा आणि शिकण्याचीच भीती बसते, तिटकारा येतो. माझ्याकडे ‘केस’ म्हणून आलेली कित्येक मुलं कुठलाही ‘प्रश्न’ विचारला की ब्लँक होतात. त्यांचं शरीर खटकन ताठरतं. त्यांच्या मनापर्यंत कशाला कानापर्यंतही शब्द पोहोचत नसतात. हळूहळू गप्पा मारत मोकळं केल्यावर सांगतात की ‘प्रश्न ऐकला की आता मार बसणार, नाहीतर ओरडा खावा लागणार अशी एकदम भीती वाटते आणि समजेनासं होतं.’  तर काही मुलं एवढी निगरगट्ट बनतात की कितीही जवळ जायचा प्रयत्न केला तरी दाद देत नाहीत. त्यांची संवेदना शिक्षांनी आणि परिस्थितीनं बोथट केलेली असते.
स्पध्रेच्या युगामुळे, संख्येच्या ताणामुळे, सवयीच्या पूर्वग्रहांमुळे किंवा अनवधानाने हरवत चाललेली आपल्यातली सहसंवेदना जागवण्याचं या शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपण सर्वानी एकत्रितपणे ठरवू या. मुलांनी आनंदानं फुलण्यातली आपली उत्प्रेरकाची भूमिका समजून आपलीशी करू या.