फारुक नाईकवाडे

राज्य सेवा पेपर दोन हा कलचाचणीचा पेपर आहे. अधिकारी म्हणून काम करताना उमेदवार कोणत्या पद्धतीने विचार करुन निर्णय घेऊ शकतो हे तपासणारा घटक म्हणजे निर्णय क्षमता व व्यवस्थापन कौशल्ये. म्हणजेच खऱ्या अर्थाने उमेदवाराचा कल तपासणारा हा घटक आहे.

नकारात्मक गुण पद्धत लागू नसल्याने हा हमखास गुण मिळवून देणारा घटकही आहे. एकूण १२.५ गुणांसाठी ५ प्रश्न या विभागात विचारले जातात. या प्रश्नांना नकारात्मक गुण दिले जात नाहीत. त्यामुळे चांगले गुण मिळवायचे असतील तर अधिकाधिक समर्पक उत्तरे देऊन जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. या पाच प्रश्नांसाठी एकूण १० मिनिटे वापरली  तर किमान ५ गुण आणि योग्य अभिवृत्ती  विकसित केली  तर १० गुणांपर्यंत नक्कीच पोचता येते.

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकातील प्रश्नाचे ढोबळ स्वरूप समजून घेता येते. एखाद्या सुजाण नागरिकाचे हक्क आणि त्याची एखाद्या प्रसंगातील नागरिक या नात्याने किंवा हितसंबंधीय म्हणून असलेली कर्तव्ये यांचेशी संबंधित दैनंदिन जीवनातील पेचप्रसंग आणि त्यावरील तोडगा विचारला जातो. याचबरोबर संस्थेत किंवा प्रशासनात अधिकारपदावर असताना येणारी आव्हाने व त्यावरील तोडगा किंवा नैतिकदृष्टय़ा द्विधा मन:स्थितीत अडकविणाऱ्या समस्यांवर आधारित प्रश्न यामध्ये विचारले जातात. उमेदवारांचा महिलांबाबतचा दृष्टिकोन व संवेदनशीलता तपासणारा किमान एक तरी प्रश्न विचारला जातो.

सर्वसाधारण व्यवहारज्ञान, नैतिकदृष्टय़ा योग्य-अयोग्य मुद्दयांची जाण आणि भारतीय संविधानाचे भान असल्यास कमीत कमी वेळेत हा विभाग जास्तीत जास्त गुण मिळवून देऊ शकतो. हा घटक पेपरच्या सुरुवातीला सोडवून आत्मविश्वास बळकट करायचा की शेवटच्या दहा मिनिटांत किंवा खूपच अवघड प्रश्नांमध्ये वेळ गेल्यावर ताण दूर करण्यासाठी अशा प्रश्नांनंतर सोडवायचा हे तुम्ही स्वत:च ठरवायचे आहे. पण हे प्रश्न सोडविताना मन शांत ठेवून पर्यायांचा विचार करणे आणि जास्तीत जास्त समर्पक उत्तर शोधणे शक्य करायचे असेल तर सराव आणि सरावाचे विश्लेषण यांना पर्याय नाही!

असे प्रश्न सोडविताना पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.

*      प्रश्न लक्षपूर्वक वाचून नेमकी समस्या समजून घ्यावी.

*      या प्रसंगातील तुमची नेमकी भूमिका कोणती आहे ते लक्षात घ्यावे. कोणतीही भूमिका स्पष्टपणे तुम्हाला दिलेली नसेल तर एक सुजाण नागरिक म्हणून किंवा त्या प्रसंगात तुमचे हितसंबंध गुंतलेले असतील तर त्या दृष्टीने योग्य निर्णय घेणे तुमच्याकडून अपेक्षित आहे हे समजून घ्यावे.

*      प्रसंगातील सर्वात कच्चा आणि मजबूत पक्ष कोणता ते लक्षात घ्यावे.

*      राज्यघटनेतील तरतुदी व तत्त्वज्ञान, सर्वसाधारण नैतिकता व नैसर्गिक न्याय, निर्बल समाजघटकांविषयी तसेच पर्यावरणीय संवेदनशीलता यांच्या आधारे समतोल दृष्टिकोन व तटस्थता ठेवून दिलेल्या परिस्थितीचे मूल्यमापन करावे. यातील प्रत्येक पैलू महत्त्वाचा आहे आणि तो परिस्थितीच्या मूल्यमापनासाठी मूलभूतपणे आवश्यक आहे हे लक्षात ठेवावे. किंबहुना हे पैलू तुमच्या अभिवृत्तीचा अविभाज्य घटक बनतील असे प्रयत्न केल्यास त्यांचा मुलाखतीच्या दरम्यान आणि एकूणच सकारात्मक करीअर घडविण्यामध्येही मोठा उपयोग होऊ शकतो.

*      प्रसंगाचे मूल्यमापन आणि तुमच्याकडून अपेक्षित भूमिका समजून घेतल्यावर दिलेले सर्व पर्याय व्यवस्थित वाचून घ्यावेत.

*      त्यानंतर वरील मूल्यमापनाच्या आधारे पूर्णपणे असंवेदनशील, बेजबाबदार, टोकाचे पर्याय बाद करावेत.

*      यानंतर योग्य वाटणाऱ्या पर्यायांच्या योग्यतेची श्रेणी ठरवावी. अशी श्रेणी ठरवताना तुमच्या भूमिकेच्या अनुषंगाने पर्यायामधील आवश्यकता, व्यवहार्यता विचारात घ्यावी. आवश्यक वाटू शकला तरी व्यवहार्य नसलेला पर्याय बाजूला ठेवावा. त्यानंतर असा पर्याय अमलात आणण्याचे अधिकार तुमच्याकडे आहेत का हे तपासावे. असा अधिकार नसेल तर तो पर्याय योग्य असला तरी तुम्ही अमलात आणू शकत नसल्याने त्याची श्रेणी त्या भूमिकेपुरती कमीच गृहीत धरायला हवी. अशा श्रेणीकरणातून जास्तीत जास्त योग्य पर्यायापर्यंत पोचण्यास मदत होते.

*      उरलेल्या पर्यायातून जास्तीत जास्त सकारात्मक आणि बहुतांश हितसंबंधियांना मान्य होऊ शकेल असा पर्याय शोधावा. असे दोन पर्याय आढळले तर जास्त दूरगामी परिणाम करणारा, कायमस्वरूपी  तोडगा सांगणारा पर्याय निवडावा.

हे प्रश्न सोडवताना एकच पर्याय निवडायचा आहे. मात्र निवडलेल्या पर्यायाला ०, १, १.५ की २.५ गुण मिळतील याचा विचार आवश्यक आहे. त्यामुळे पर्यायांचे श्रेणीकरण करण्याची सवय असल्यास आपण निवडलेल्या उत्तराला तुलनात्मकरीत्या किती गुण मिळू शकतील याचा अंदाज येत जातो. काही वेळेला उत्साहाच्या भरात एकदम आदर्शवादी पर्याय निवडला जातो. पण तो अमलात आणण्याचा अधिकार आपल्याकडे नसू शकतो किंवा त्यातून एखादा ‘साइड इफेक्ट’ उद्भवण्याची शक्यताही असते. त्यामुळे सर्वात योग्य पण व्यवहार्य आणि उपलब्ध असल्यास दूरगामी परिणाम साधणारा पर्याय निवडणे हे २.५ गुण मिळण्यासाठी आवश्यक आहे. यासाठी सराव हीच गुरुकिल्ली आहे.

व्यवस्थापकीय अभिवृत्ती हा बोजड पारिभाषिक शब्द सोपा करून पाहिला की लक्षात येते हा आपल्या दैनंदीन जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे. घरी भाजी शिल्लक नसेल तर गृहिणी एखादी उसळ बनवतात; कागदपत्रांची तातडीने गरज असेल तर ती पोस्टाने पाठविण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीला ती घेऊन प्रत्यक्ष पाठविले जाते आणि त्याआधी इमेल किंवा व्हॉट्स अ‍ॅप केली जाते; पावसाळा सुरू होण्याआधी शेतकरी जमिनीची मशागत करून ठेवतात ही सगळी त्या त्या व्यक्तींची आपापल्या क्षेत्रातील व्यवस्थापन कौशल्येच आहेत. आवश्यक असेल तिथे आपल्या अधिकारांचा वापर करून परिस्थिती आणि त्यातील संबंधित लोकांना हाताळणे आणि समोरची समस्या सोडविणे म्हणजे व्यवस्थापन. हे समजून घेतले तर या घटकाची तयारी सोपी होते.