श्रीकांत जाधव प्रस्तुत लेखामध्ये आपण आधुनिक भारताच्या १८५७ ते १९४७ पर्यंतच्या कालखंडाचा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा सर्वागीण आढावा घेणार आहोत. मागील परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले काही प्रश्न व या प्रश्नांची उकल करण्यासाठी लागणारा दृष्टिकोन. जगामध्ये घडलेल्या कोणत्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींनी भारतातील वसाहतविरोधी संघर्षांला प्रेरणा दिलेली होती? हा प्रश्न व्यवस्थित समजून घेण्यासाठी १८ व्या, १९ व्या आणि २० व्या शतकातील अनुक्रमे अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती, १९ व्या शतकातील युरोपमधील क्रांती समजून घेणे आवश्यक आहे. तसेच जर्मनी आणि इटली या राष्ट्रांचा उदय, जपानचा आधुनिक राष्ट्र म्हणून झालेला उदय आणि युरोपमधील प्रबोधनामुळे अस्तित्वात आलेली उदारमतवाद आणि साम्यवाद ही आधुनिक विचारधारा तसेच रशियन राज्यक्रांती इत्यादी महत्त्वपूर्ण घडामोडींचा विचार करावा लागेल. या सगळ्याचा विचार करून यातून भारतातील वसाहतविरोधी संघर्षांला कशी प्रेरणा मिळाली, याचे विश्लेषण करणे अभिप्रेत आहे. स्वतंत्र भारतासाठी संविधानाचा मसुदा फक्त तीन वर्षांमध्ये तयार करण्याचे ऐतिहासिक कार्य संविधान सभेला पूर्ण करणे कठीण गेले असते, पण १९३५ च्या भारत सरकारच्या कायद्याच्या अनुभवामुळे करता आले. चर्चा करा. हा प्रश्न समजून घेताना ब्रिटिश शासनकाळात संविधाननिर्मितीला चालना देणारे कायदे आणि हे कायदे १९३५ चा भारत सरकार कायदा याची पाश्र्वभूमी तयार करणारे कसे होते हे सर्वप्रथम समजून घेणे गरजेचे आहे. या प्रश्नाचे उत्तर लिहिताना १९३५ चा भारत सरकार कायदा आणि यातील तरतुदी याचा प्रामुख्याने स्वतंत्र भारताचे संविधान तयार करताना संविधान सभेने विचार केलेला होता आणि यातील अनेक तरतुदींचा संविधानामध्ये समावेश केलेला होता, हे थोडक्यात नमूद करून १९३५ चा भारत सरकार कायदा हा संविधान सभेला कशा स्वतंत्र भारताचे संविधान तीन वर्षांमध्ये तयार करण्यासाठी उपयुक्त ठरला, याची चर्चा करणे अपेक्षित आहे. आधुनिक भारतात महिलांसंबंधी असणारे प्रश्न १९ व्या शतकातील सामाजिक सुधारणा चळवळीचा भाग म्हणून उठविण्यात आलेले होते. त्या काळात महिलांसंबंधी कोणते मुख्य मुद्दे आणि वादविवाद होते? १९ व्या शतकातील सामाजिक सुधारणांचा गाभा हा भारतीय समाजातील अंधश्रद्धा आणि महिलांसंबंधी असणारे सामाजिक प्रश्न हा होता. या सामाजिक प्रश्नांमध्ये महिलांवर असणारी पारंपरिक बंधने, शिक्षणाचा अभाव, सती प्रथा, विधवा महिलांसंबंधी असणारे प्रश्न इत्यादींचा समावेश होता. तसेच याच्याशी संबंधित वादविवादही भारतीय समाजात चालू होते हे उत्तरात सोदाहरण नमूद करून चर्चा करावी. सद्य:स्थितीमध्ये महात्मा गांधीजींच्या विचारांचे महत्त्व यावर प्रकाश टाका. या प्रश्नाचे उत्तर लिहिताना महात्मा गांधीजींची विचारधारा थोडक्यात नमूद करून, सद्य:स्थितीमध्ये घडणाऱ्या घडामोडींची पाश्र्वभूमी देऊन ही विचारधारा कशी महत्त्वाची आहे, हे अधोरेखित करून दाखवावे. १९४० च्या दशकादरम्यान सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया गुंतागुंतीची बनविण्यामागील ब्रिटिश साम्राज्य सत्तेच्या भूमिकेचे मूल्यांकन करा. या प्रश्नाचे आकलन करताना दुसऱ्या जागतिक महायुद्धामुळे निर्माण झालेली स्थिती आणि तत्कालीन भारतीय चळवळीतील भारतीय नेत्यांच्या मागण्या याविषयीची समज लागते. या मागण्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने ब्रिटिशांनी केलेल्या उपाययोजना व या उपाययोजनांनी सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया कशी गुंतागुंतीची बनविलेली होती हे सोदाहरण स्पष्ट करून ब्रिटिश साम्राज्य सत्तेच्या भूमिकेचे मूल्यांकन करावे लागते. या घटकाचे परीक्षाभिमुख आकलन खालील पद्धतीने करणे उपयुक्त ठरू शकते. १८५७ च्या उठावामुळे कंपनीची सत्ता संपुष्टात आलेली होती आणि भारतावर ब्रिटिश राजसत्तेचे थेट नियंत्रण प्रस्थापित करण्यात आलेले होते. हे सत्तांतर १८५८ च्या भारत सरकारच्या कायद्याद्वारे झाले होते; पण १९ व्या शतकामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडत होत्या. पाश्चिमात्य शिक्षण घेतलेल्या भारतीयांनी सामाजिक व धार्मिक सुधारणा हाती घेतल्या. या सुधारणांनी जातीप्रथा, अस्पृश्यता, सामाजिक आणि कायदेशीर भेदभाव यांसारख्या सामाजिक परंपरा आणि मूर्तिपूजा आणि अंधश्रद्धा यांसारख्या धार्मिक बाबींवर प्रहार करण्यास प्रारंभ केला. या चळवळी पुरोगामी स्वरूपाच्या होत्या. या सर्व चळवळी व्यक्तिगत समानता, सामाजिक समानता, विवेकवाद, प्रबोधन आणि उदारमतवाद यांसारख्या लोकशाही मूल्यांवर आधारित सामाजिक व्यवस्था प्रस्थापित करणे या उद्देशांनी प्रेरित होत्या. पाश्चिमात्य शिक्षणामुळे भारतीयांनी आधुनिक विवेक, धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि राष्ट्रवादी राजकीय दृष्टिकोनाचा अंगीकार केलेला होता. इंग्रजी भाषेने देशात राष्ट्रवादाची वाढ होण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली होती आणि ही भाषा भारतातील विविध प्रदेशांतील उच्चशिक्षित लोकांची वैचारिक देवाणघेवाण करण्याची माध्यम बनली. पाश्चिमात्य शिक्षणामुळे देशात स्वातंत्र्य, समता व बंधुता या संकल्पना रुजण्यास सुरुवात झाली व शिक्षित भारतीयांमध्ये दृष्टिकोन आणि हितसंबंध यामध्ये काहीसा एकसारखेपणा निर्माण झाला. तसेच काही भारतीयांनी ब्रिटिश साम्राज्यवादाच्या आर्थिक धोरणाची समीक्षा करून ब्रिटिश आर्थिक धोरणे भारतीयांचे शोषण कशा प्रकारे करत आहेत हे दाखवून दिले. या सर्वाचा एकत्रित परिणाम असा झाला की, भारतात राष्ट्रवादाची उभारणी झाली आणि १८८५ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली. येथूनच पुढे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भारतीय राष्ट्रीय चळवळीची वाटचाल सुरू झाली. साधारणत: भारतीय राष्ट्रीय चळवळीचे तीन टप्पे केले जातात. १८८५ ते १९०५ (मवाळ कालखंड), १९०५ ते १९२० (जहाल कालखंड) आणि १९२० ते १९४७ (गांधीयुग). या टप्प्यानिहाय भारतीय राष्ट्रीय चळवळीतील इतर प्रवाह याअंतर्गत क्रांतिकारी चळवळी, कनिष्ठ जातीतील चळवळी, कामगार चळवळ, भारतीय संस्थाने व संस्थानातील प्रजेच्या चळवळी, भारतीय राष्ट्रीय चळवळीमधील महिलांचे योगदान, आधुनिक भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्ती इत्यादी आणि गव्हर्नर जनरल आणि व्हाइसराय यांचे कार्य व ब्रिटिशांच्या काळातील भारतातील घटनात्मक विकास यांसारख्या बाबींचा अधिक विस्तृत आणि सखोल अभ्यास करावा लागणार आहे. या घटकाची मूलभूत माहिती आपल्याला एनसीईआरटीच्या आधुनिक भारताशी संबंधित पुस्तकांमधून मिळते आणि या विषयाची सर्वागीण आणि सखोल तयारी करण्यासाठी ग्रोवर आणि ग्रोवर लिखित ‘आधुनिक भारताचा इतिहास’, बिपिन चंद्र लिखित ‘इंडियाज स्ट्रगल फॉर इंडीपेंडन्स’ आणि शेखर बंडोपाध्याय लिखित ‘प्लासी टू पार्टिशन’ यांसारख्या संदर्भग्रंथांचा उपयोग होतो.