श्रीकांत जाधव

आजच्या लेखात आपण आधुनिक भारताचा इतिहास या घटकावर चर्चा करणार आहोत. सर्वसाधारणपणे आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात १८ व्या शतकाच्या सुरुवातीपासून होते, असे मानले जाते. प्रस्तुत लेखामध्ये १८ व्या आणि १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजेच १८५७ पर्यंतच्या आधुनिक भारताच्या इतिहासावर मागील परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे स्वरूप कसे होते आणि यासाठी लागणारा आकलनात्मक दृष्टिकोन कसा असावा, याचा आढावा  घेणार आहोत.

गतवर्षीय परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले काही प्रश्न आणि या प्रश्नांची उकल करण्यासाठी लागणारा दृष्टिकोन ‘वेगवेगळ्या पद्धतीने लॉर्ड डलहौसीने आधुनिक भारताचा पाया रचला’. विस्तार करा.

या प्रश्नाचे आकलन करताना आपणाला लॉर्ड डलहौसीने राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कोणती कामगिरी केलेली होती, याचा दाखला देत त्याने आधुनिक भारताचा पाया कसा रचला याची कारणमीमांसा करून उत्तर लिहावे लागते. त्यामुळे उत्तर अधिक मुद्देसूद व समर्पक आणि प्रश्नाचा योग्य आशय प्रमाणित करते.

‘१८ व्या शतकाच्या मध्यापासून ते स्वातंत्र्यापर्यंतच्या ब्रिटिशाच्या आर्थिक धोरणाच्या विविध पैलूचे समीक्षात्मक विश्लेषण करा’.

या प्रश्नाचे आकलन करताना आपणाला ब्रिटिश ध्येयधोरणे ही ब्रिटिश साम्राज्यवादाला कशी पूरक होती आणि जास्तीत जास्त याचा फायदा व्यापारासाठी कसा होईल, हा मूलभूत विचार ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाच्या रणनीतीचा भाग होता, हे सर्वप्रथम समजून घेणे गरजेचे आहे आणि त्यानुसार काळानुरूप ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाच्या रणनीतीमध्ये कोणते बदल करण्यात आले याचा उदाहरणासह परामर्श उत्तरामध्ये देणे अपेक्षित आहे.

‘१७६१ मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. पानिपत येथेच अनेक साम्राज्यांना धक्का देणाऱ्या लढाया का झाल्या?’

हा प्रश्न एका विशिष्ट ठिकाणाचा संदर्भ देऊन विचारण्यात आलेला आहे आणि याचे आकलन करताना आपल्याला १५२६ मध्ये झालेल्या पानिपतच्या पहिल्या लढाईचा संदर्भ लक्षात घेऊन हे स्थान व्यूहात्मकदृष्टय़ा कसे महत्त्वाचे होते या अनुषंगाने उत्तर लिहावे लागते.

‘१८५७ चा उठाव हा वसाहतिक भारतातील ब्रिटिश धोरणाच्या विकासातील महत्त्वाची घटना होती’, स्पष्ट करा.

या प्रश्नाचे योग्य आकलन होण्यासाठी कंपनी काळातील ब्रिटिश धोरणांची मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे. कारण १८५७ च्या उठावानंतर जे काही बदल करण्यात आले होते याला कंपनी काळात राबविण्यात आलेली ब्रिटिश धोरणे कारणीभूत होती आणि उत्तर लिहिताना या धोरणाचा उत्तरामध्ये दाखला देऊनच उत्तर लिहावे आणि १८५७ च्या उठावाचे महत्त्व नमूद करावे.

अठराव्या शतकाच्या मध्यातील भारतातील राजकीय व्यवस्था विखंडीत छायेने कशा प्रकारे घेरलेली होती, स्पष्ट करा.

या प्रश्नाचे योग्य आकलन होण्यासाठी १८ व्या शतकातील राजकीय सत्ता समीकरणे कशी होती याची माहिती असणे गरजेचे आहे. १७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झालेले होता आणि  येथून पुढे मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाची सुरुवात झाली. मुघल साम्राज्यात कार्यरत असणाऱ्या सुभेदारांनी  स्वत:च्या स्वायत्त सत्ता बंगाल, हैदराबाद आणि अवध या प्रांतामध्ये स्थापन केल्या होत्या. याचबरोबर मराठा सत्तेचे पेशवे यांच्या आधिपत्याखाली पुनरुज्जीवन झालेले होते व एक प्रबळ राजकीय सत्ता म्हणून तिचा  उदय झालेला होता.  दक्षिणेत हैदर अलीच्या नेतृत्वाखाली म्हैसूर  राजकीय सत्ता बनलेली होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने स्वत:ला राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून प्रस्थापित करण्यास प्रारंभ केलेला होता. इत्यादी महत्त्वाच्या घडामोडींचा  उत्तरामध्ये परामर्श देऊन अठराव्या शतकाच्या मध्यातील भारतातील राजकीय व्यवस्था विखंडीत छायेने कशा प्रकारे घेरलेली होती हे स्पष्ट करावे लागते.

कोणत्या कारणामुळे ब्रिटिशांनी भारतातून करारबद्ध कामगार त्यांच्या इतर वसाहतीमध्ये आणलेले होते? ते त्यांची सांस्कृतिक ओळख तेथे जतन करू शकले का?

ब्रिटिशांच्या वसाहती या मुखत्वे व्यापारवाढीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेल्या होत्या आणि पुढे यातूनच ब्रिटिश साम्राज्यवादाची सुरुवात झालेली होती. अशातच १८ व्या शतकाच्या मध्यामध्ये ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती सुरू झालेली होत. तसेच यापूर्वीच ब्रिटिशांनी आफ्रिका, आशिया आणि अमेरिका खंडामध्ये वसाहती स्थापन केलेल्या होत्या, या वसाहतीमध्ये भारतातून त्यांनी कामासाठी कामगार आणलेले होते. या वसाहती ब्रिटनमधील औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारा कच्चा माल निर्यात करत असत. अशा पद्धतीने या प्रश्नाची उकल करून उदाहरणासह हे कामगार तेथील वसाहतीमध्ये स्वत:ची सांस्कृतिक ओळख जतन करू शकले का याचे विश्लेषण उत्तरामध्ये द्यावे.

एकोणिसाव्या शतकातील भारतीय प्रबोधन आणि राष्ट्रीय ओळख याचा उदय यामधील दुवे (linkages) यांचे परीक्षण करा.

या प्रश्नाचे आकलन करताना भारतीय प्रबोधनाचा  थोडक्यात परामर्श  घ्यावा.  तसेच १९ व्या शतकाच्या मध्यानंतर भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण होण्याची सुरुवात झालेली होती आणि यातूनच भारतीय राष्ट्रवादाचा उदय झालेला होता व यामुळे भारतीयांना एक राष्ट्रीय ओळख मिळालेली होती. यामध्ये भारतीय प्रबोधनाने महत्त्वाची भूमिका होती. म्हणून भारतीय प्रबोधन आणि राष्ट्रीय ओळख याचा उदय यामधील दुवे अधोरखित करून परीक्षण करणे उतरामध्ये अपेक्षित आहे.

उपरोक्त प्रश्नांच्या विश्लेषणावरून आपणाला या घटकाची तयारी कशी करावी याची एक सुस्पष्ट दिशा मिळते. या घटकाचा मूलभूत अभ्यास करण्यासाठी आपणाला बिपिनचंद्र लिखित ‘आधुनिक भारत’ हे जुने एनसीईआरटीचे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे. त्यानंतर या घटकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी बी.एल. ग्रोवर लिखित ‘आधुनिक भारताचा इतिहास’ आणि शेखर बंडोपाध्याय लिखित ‘प्लासी टू पार्टिशन’ या  संदर्भग्रंथांचा उपयोग होतो.