श्रीकांत जाधव

आजच्या लेखामध्ये आपण मध्ययुगीन भारत या घटकाची चर्चा करणार आहोत. या घटकावर २०११ ते २०१८ मध्ये एकूण १४ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. इतर घटकांच्या तुलनेत या घटकावर कमी प्रश्न विचारले जातात.

अभ्यासाच्या दृष्टीने या घटकाचे नियोजन

मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात साधारणत: इ.स ७५०पासून होते, असे मानले जाते. सुरुवातीचा कालखंड (इ.स ७५०-१२००पर्यंत) या कालखंडाची महत्त्वाची दोन वैशिष्टय़े  पाहावयास मिळतात. यातील पहिले म्हणजे भारतात सरंजामशाही स्वरूपाच्या राजकीय शासनव्यवस्थेचा उदय आणि दुसरे म्हणजे भारतात इस्लाम धर्माचे आगमन व सिंध प्रांतातून सुरू झालेली अरबांची व तुर्काची आक्रमणे. या कालखंडामध्ये भारताचा विविध भागांमध्ये प्रादेशिक राजकीय सत्तांचा उदय झालेला होता. उत्तर भारतामधील राजपूत सत्ता-प्रतिहार, परमार, चौहान व चंदेला इत्यादी; पूर्व भारतामध्ये पाल यांची सत्ता तसेच मध्य भारतात राष्ट्रकुट आणि दक्षिण भारतात चोल, चालुक्य इत्यादीच्या सत्ता होत्या. यानंतरचा कालखंड हा दिल्ली सल्तनत व समकालीन प्रादेशिक सत्तांचा होता. दिल्ली सल्तनतीला समकालीन असणाऱ्या सत्तांमध्ये देवगिरीचे यादव, होयसळ, काकतीय विजयनगर साम्राज्य, बहामनी राजघराणे तसेच काश्मीर, बंगाल, गुजरात या प्रांतातील प्रादेशिक राजकीय सत्ता यांचा मुखत्वे समावेश होता. दिल्ली सल्तनतीनंतर मुघल साम्राज्याची सत्ता भारतात स्थापन झालेली होती. या सत्तेला समकालीन असणाऱ्या सत्तांमध्ये राजस्थानमधील राजपूत सत्ता तसेच दख्खन भागातील आदिलशाही, निजामशाही व महाराष्ट्रातील मराठा साम्राज्य इत्यादीचा समावेश होतो.

याचबरोबर मध्ययुगीन भारतात भक्ती चळवळ आणि सुफी चळवळ या दोन धार्मिक चळवळी अस्तिवात आलेल्या होत्या. त्यांचा तत्कालीन समाजजीवनावर खूप मोठा प्रभाव पडलेला होता. यातील भक्ती चळवळ ही िहदू धर्माशी संबंधित होती आणि सुफी चळवळ ही इस्लाम धर्माशी संबंधित होती. याव्यतिरिक्त शीख चळवळीच्या माध्यमातून शीख धर्माची स्थापना गुरुनानक यांनी केलेली होती. अशा पद्धतीने या घटकाचे नियोजन करावे लागते.

मागील परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न पुढीलप्रमाणे

* २०१२ मध्ये सुफी चळवळीवर प्रश्न विचारलेला होता.

तो प्रश्न होता – गूढ सुफिवादी पुढीलपैकी कोणत्या मार्गाचा पुरस्कार करणारे म्हणून ओळखले जातात?

पर्याय होते – १)ध्यान आणि श्वासावर नियंत्रण, २)एकांतात खडतर संन्यासी जीवन आणि ३)धार्मिक गीतांद्वारे श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणे. (हा टउद प्रकारात मोडणारा प्रश्न)

* २०१४ मध्ये प्रश्न होता..

मध्ययुगीन भारतात महत्तर आणि पट्टीकल पदनाम कशाशी संबंधित होते?

पर्याय – १) सैनिक अधिकारी, २)ग्रामप्रमुख, ३)वैदिक कर्मकांडामधील विशेषज्ञ आणि ४)कारागार श्रेणी प्रमुख.

* २०१५ मध्ये प्रश्न होता..

बाबरच्या भारतातील आगमनामुळे काय झाले?

पर्याय – १)उपखंडामध्ये दारूगोळा वापरण्यास सुरुवात झाली, २)स्थापत्यकलेमध्ये कमान आणि घुमट बनण्यास सुरुवात झाली आणि ३)तमुर राजवंशाची स्थापना करण्यात आली हे पर्याय दिलेले होते. (टउद प्रकारात मोडणारा प्रश्न.)

* २०१६ मध्ये प्रश्न होता..

मध्ययुगीन भारताच्या आर्थिक इतिहास संदर्भात अराघत्ता (Araghatta) हे काय दर्शविते? असा प्रश्न विचारण्यात आलेला होता.

यासाठी पर्याय होते. – १) वेठबिगार, २) सैनिक अधिकाऱ्यांना दिले जाणारे भुदान, ३)जमीन सिंचनासाठी वापरले जाणारे जलचक्र आणि ४)पडीक जमिनीचे सुपीक जमिनीमध्ये केले जाणारे रूपांतर.

* २०१७ मध्ये  प्रश्न होता..

काकतीय राज्यामधील खालीलपैकी कोणते महत्त्वाचे बंदर (seaport) होते? असा प्रश्न विचरण्यात आलेला होता.

यासाठी पर्याय होते. – १)काकिनाडा (Kakinada), s)मोतुपल्ली (Motupalli), ३)मसुलीपट्टनम/मच्छलीपट्टनम (Masulipatanam/Machalipatnam) व ४) नेल्लुरू (Nelluru)

* २०१८ मध्ये  प्रश्न होता..

खालीलपैकी कोणत्या परकीय प्रवाशाने विस्तृतपणे भारतातील हिरे आणि हिऱ्यांच्या खाणी यांविषयी चर्चा केलेली आहे? असा प्रश्न विचारलेला होता.

यासाठी पर्याय होते – १) फ्रँकोइस बर्नियर, २)जीन बाप्टिस्टे टेवर्नियर, ३)जेंन दी थेवेनोत व ४)अब्बे बार्थलेमी कारे.

उपरोक्त स्वरूपाचे प्रश्न या घटकावर विचारले जातात, साधारणत: या प्रश्नाचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ पद्धतीचे आहे. या घटकावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नावरून असे लक्षात येते की, हा घटक मुद्देनिहाय माहितीचे संकलन करून अभ्यासणे गरजेचे आहे. पण यासाठी सर्वप्रथम या घटकाचे मूलभूत ज्ञान असणे गरजेचे आहे.

संदर्भ साहित्य – या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. यामध्ये Our past part II  इयत्ता सातवी आणि इयत्ता बारावीचे Themes in Indian History part- II  ही पुस्तके अभ्यासावी लागतात. याच्या जोडीला सतीश चंद्र लिखित मध्ययुगीन भारतावरील जुने एनसीईआरटीचे पुस्तक वाचावे. ज्यामुळे या घटकाची योग्य परीक्षभिमुख तयारी आपणाला करता येते.