आजच्या लेखामध्ये आपण मानवी भूगोल या विषयातील लोकसंख्या भूगोल, वसाहत भूगोल आणि आर्थिक भूगोल या घटकाची परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त तयारी कशी करावी याबाबत माहिती घेणार आहोत.

मानवी भूगोल या घटकावर २०१३ मध्ये ३; २०१४ मध्ये ५; २०१५ मध्ये ६; २०१६ मध्ये ५ आणि २०१७ मध्ये ५ प्रश्न विचारण्यात आले होते. पहिल्या लेखामध्ये आपण मानवी भूगोलामध्ये समाविष्ट असणाऱ्या घटकांचा तसेच त्यात समाविष्ट बाबींची माहिती घेतली आहे. मागील प्रश्नांच्या विश्लेषणावरून आपणाला सर्वाधिक प्रश्न कोणत्या घटकावर विचारण्यात आलेले आहेत याची माहिती मिळते.

२०१३ ते २०१७ दरम्यान आर्थिक भूगोल या घटकावर विचारण्यात आलेले काही प्रश्न –

२०१३मध्ये ‘भारतातील सुती उद्योग अत्यंत विकेंद्रित आहे, यासाठी कारणीभूत असलेल्या घटकांचे विश्लेषण करा.’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाची योग्य उकल होण्यासाठी मुळात भारताची प्राकृतिक रचना आणि वेगवेगळ्या प्रदेशांतील पोषक वातावरण, कच्च्या मालाची उपलब्धता इत्यादीविषयी मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे. या घटकांचा परिणाम कशा प्रकारे सुती उद्योगावर झाला आहे, ते उदाहरणासहित विश्लेषण उत्तरामध्ये येणे अपेक्षित आहे.

२०१४ मध्ये ‘नसíगक संसाधनाने समृद्ध म्हणून नावारूपाला येणाऱ्या आफ्रिकेतील आर्थिक क्षेत्रामध्ये भारत स्वत:चे स्थान कशा प्रकारे पाहतो?’ हा प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्नाचा कल हा भारताच्या आफ्रिकेविषयी एकत्रित आखल्या गेलेल्या धोरणाचे आकलन विद्यार्थ्यांना कितपत आहे, याकडे झुकतो. येथे भारताने आफ्रिका खंडातील विविध देशांसोबत स्थापन केलेले संबंध आणि यातून भारताला होणारा फायदा तसेच आफ्रिका खंड हा नसíगक संसाधनाने समृद्ध असलेला खंड आहे इत्यादी महत्त्वाच्या पलूंचा एकत्रित विचार करून आफ्रिकेमधील आर्थिक क्षेत्रामध्ये भारत स्वत:चे स्थान कशा प्रकारे पाहतो याची उत्तरामध्ये चर्चा करणे महत्त्वाचे आहे.

२०१५ मध्ये ‘भारतातील स्मार्ट शहरे, स्मार्ट खेडय़ाशिवाय शाश्वत होऊ शकत नाहीत. या विधानाची ग्रामीण व नागरी एकत्रीकरणाच्या पाश्र्वभूमीवर चर्चा करा.’ हा प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न भारत सरकारने आखलेल्या स्मार्ट शहरे धोरणाशी संबंधित आहे. हा प्रश्न भारतातील नागरीकरण आणि ग्रामीण विकास या प्रक्रियेला आधारभूत मानून विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाची योग्य उकल होण्यासाठी स्मार्ट शहरे ही संकल्पना नेमकी काय आहे आणि स्मार्ट शहरे हे नेमकी कशी असणार आहेत आणि याचा संबंध ग्रामीण भारतातील खेडय़ासोबत कशा प्रकारे येणार आहे आणि जर स्मार्ट शहरे हे शाश्वत करावयाची आहेत तर यासाठी स्मार्ट खेडय़ाची आवश्यकता का गरजेची आहे. तसेच भारतातील खेडी स्मार्ट बनविण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत आणि यामुळे ग्रामीण व नागरी एकत्रीकरणाची प्रक्रिया कशी सुरू झालेली आहे असा मुख्य रोख या प्रश्नाचा होता. त्याआधारे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.

२०१६ मध्ये ‘सिंधू नदी पाणी करार (Indus Water Treaty) याची माहिती द्या आणि बदलत्या द्विपक्षीय संबंधाच्या पाश्र्वभूमीवर याचे पर्यावरणीय, आर्थिक आणि राजकीय परिणामाचे परीक्षण करा.’ हा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे सरळ दोन भाग पडतात. यातील पहिला भाग सिंधू नदी पाणी करार व यातील तरतुदी याची माहिती आणि दुसरा भाग सद्य:स्थितीतील भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंधाबाबत आहे. हा प्रश्न चालू घडामोडींशी संबंधित आहे. येथे प्रामुख्याने सिंधू नदीशी संबंधित प्राकृतिक माहिती आणि या दोन देशांमधील संबंध या दोन्हीची सांगड घालून जर हा करार मोडीत निघाला अथवा यामध्ये काही एकतर्फी बदल केले गेले तर याचे नेमके परिणाम काय होऊ शकतात याची चर्चा करायला हवी. तसेच हा प्रश्न भूगोल या घटकाशी संबंधित असल्यामुळे येथे पर्यावरणीय परिणामाची चर्चा करणे अधिक गरजेचे आहे. अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचे आकलन करून उत्तर लिहिणे योग्य ठरते.

२०१७ मध्ये ‘भारतात येणारे पूर जलसिंचनासाठी शाश्वत स्तोत्र आणि सर्व प्रकारच्या हवामानामध्ये आंतर्देशीय जलवाहतुकीसाठी कशा प्रकारे रूपांतरित करता येऊ शकतील?’ अशा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे योग्य आकलन होण्यासाठी पूर का येतात याची माहिती जी विषयाच्या पारंपरिक अनुषंगाने माहीत असणे गरजेचे आहे तसेच याचा विकासासाठी कसा वापर करता येऊ शकतो हे उदाहरणसह स्पष्ट करावे लागते.

या घटकाशी संबंधित बहुतांश प्रश्न हे भारताच्या आर्थिक भूगोलाशी संबंधित आहेत तसेच यातील काही प्रश्न भारत व जगाचा मानवी भूगोल यांचा एकत्रित विचार करून विचारण्यात आलेले आहेत. उपरोक्त प्रश्नांवरून आपणाला या विषयाचे पारंपरिक ज्ञान, यातील महत्त्वाच्या संकल्पना तसेच यासंबंधी घडणाऱ्या चालू घडामोडी इत्यादींची योग्य माहिती असणे गरजेचे आहे, हे लक्षात येते.

संदर्भ साहित्य

या विषयाच्या सर्व घटकांची मूलभूत माहिती सर्वप्रथम अभ्यासावी. त्याकरिता आपणाला एनसीईआरटीच्याFundamentals of Human Geography (XII), Indian People and Economy. (XII) या क्रमिक पुस्तकाचा आधार घेता येतो. परिणामी या विषयाचे सरळ व सोप्या भाषेत आकलन  करता येऊ शकते आणि या विषयाची र्सवकष तयारी करण्यासाठी  Certificate Physical and Human Geography (by Goe Cheng Leong), India Comprehensive Geography ( by D.R. Khullar), World Geograhy (by Majid Husain) यांसारख्या संदर्भग्रंथांचा आधार घेता येऊ शकेल. तसेच या विषयाशी संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी इंग्रजी वर्तमानपत्रे उदा. द हिंदू आणि योजना व कुरुक्षेत्र यांसारख्या मासिकांचे वाचन करावे.