यूपीएससीची तयारी : सुश्रुत रवीश

मागच्या लेखात आपण वृत्तीचा आणि दृष्टिकोनाचा वर्तनावर कसा परिणाम होतो हे पाहिले. दृष्टिकोनामुळे वर्तन बदलते/प्रभावित होते हे सहज लक्षात येते. एखाद्या गोष्टीबद्दलची आपली वृत्ती बदलली की त्या अनुषंगाने वर्तन बदलते. बरेचदा पालक किंवा इतर मोठय़ा व्यक्ती मुलांना त्यांचा दृष्टिकोन बदलायला सांगतात. खरं तर त्यांना वर्तनातील बदल अपेक्षित असतो, व दृष्टिकोन ((Attitude)) बदलला की वर्तन बदलेल अशी सर्वसाधारण धारणा असते. त्यामधूनच (Attitude) बदलण्याविषयी सल्ला दिला जातो. अजून याच प्रकारचे उदाहरण द्यायचे तर नागरिकांनी कार चालवताना सीट बेल्ट घालावा, वाहतुकीचे नियम पाळावेत या व अशा विविध गोष्टी सुचविणारे फलक, सूचना, घोषणा वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे लावले जातात, लोकांच्या विचार करण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव टाकून त्यायोगे त्यांच्या वागण्यात बदल केला जातो. समुपदेशन, शिकवणे, मूल वाढवणे या सर्व प्रक्रियांमधील एक समान धागा म्हणजे – वैयक्तिक आयुष्यातील धारणा, दृष्टिकोन सामाजिक वर्तनावर प्रभाव टाकत असतात असे समजणे आणि म्हणूनच कुणाचेही वर्तन बदलायचे असल्यास त्याचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे.

विसाव्या शतकाच्या मध्यात, दृष्टिकोन आणि वर्तन यांच्यामधील संबंध खूप दृढ नाही असे संशोधकांच्या लक्षात येऊ लागले. लोकांच्या दृष्टिकोनात बदल झाल्यावरही वर्तनात बदल होतोच असे नाही. उदा. बहुतेक सुशिक्षित लोकांना सिगरेट ओढण्याने होणारा त्रास व त्यातून होणारी शरीराची हानी याचे ज्ञान असते, तरीदेखील धूम्रपान सुरूच राहते. अशा प्रकारची धोक्याची सूचना छापल्याने वर्तनात कोणताही आमूलाग्र बदल दिसून येत नाही. हेल्मेट घालणे सुरक्षिततेसाठी गरजेचे आहे हे मान्य असले तरीही अनेक दुचाकीस्वार हेल्मेट न घालता गाडी चालवताना दिसतात. अनेक मानसशास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनाद्वारे दाखवून दिले आहे की वृत्ती/दृष्टिकोन बदलल्याने वर्तन बदलतेच असे नाही. अनेकांच्या अभ्यासातून एक समान निष्कर्ष असाही आला की वर्तन बदलले की दृष्टिकोन बदलतो.

अशा प्रकारचा विरुद्ध आंतरसंबंध कसा अस्तित्वात असू शकतो याची अनेक स्पष्टीकरणे दिली जातात. फिलिप (Phillip Zimbardo) यांचा Stanford Prison Experiment  असं दाखवून देतो की लोकांना एखादी विशिष्ट भूमिका वठवायला दिली तर त्या भूमिकेचे दृष्टिकोनही ती व्यक्ती आत्मसात करते. या प्रयोगामध्ये सहभागींचे दोन गट करण्यात आले. यापकी एका गटाने तुरुंगातील कैद्यांसारखे वागायचे होते तर दुसऱ्या गटातील व्यक्तींना तुरुंग अधिकाऱ्यांसारखे वागायचे होते. तात्पुरत्या उभ्या केलेल्या तुरुंगामध्ये काही दिवसांसाठी हा प्रयोग चालला.

काही दिवसांनी असे पाहण्यात आले की तुरुंग अधिकाऱ्यांचा गट कैद्यांच्या गटाशी अतिशय िहसक पद्धतीने वागत आहे. हा वर्तनातील व दृष्टिकोनातील बदल इतका तीव्र होता की प्रयोग मध्यातच बंद करावा लागला. (Stanford Prison Experimentहा अतिशय महत्त्वाचा, मलाचा दगड मानावा असा प्रयोग आहे. इंटरनेटवर याबद्दल खूप सविस्तर माहिती उपलब्ध आहे.) इथे नोंद करण्यासारखी गोष्ट म्हणजे इतक्या थोडय़ा काळामध्येही बदललेले वर्तन हे वृत्ती बदलण्यास कारण ठरू शकते. अशाच अनेक खऱ्या आयुष्यातील घटना व प्रसंगांमध्येही हेच निरीक्षण नोंदवता येऊ शकते.

वृत्ती व वर्तन यांच्यातील हा संबंध स्पष्ट करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आहे. यातील एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे Congnitive dissonance  आकलनातील विसंगती होय. यात असे सुचवले आहे की, आपल्या आकलनातील सुसंगतता कायम ठेवण्याकरता आपण आपल्या वृत्तीमध्ये गरजेप्रमाणे बदल करून घेत असतो.

इसापनीतीमधील कोल्ह्याची आणि द्राक्षांची गोष्ट प्रसिद्ध आहे. ज्यामध्ये उंचावर असलेली द्राक्षं, जी कोल्हा खाऊ शकत नाही, ती आंबटच असली पाहिजेत आणि म्हणून ती त्याला नकोच होती, अशी स्वतची समजूत कोल्हा करून घेतो. हे cognitive dissonanceचे अतिशय समर्पक उदाहरण आहे. आपण करत असलेल्या चच्रेच्या अनुषंगाने आपण हे लक्षात घेतले पाहिजे की वृत्तीतील हा बदल वरवरचा आणि थोडाच काळ टिकणारा असा नसून खोलवर रुजलेला आणि दीर्घकाळ टिकणारा असतो. या प्रक्रियेमध्ये मेंदू वृत्ती (आपल्या उदाहरणातील द्राक्षं खाण्याची तीव्र इच्छा) आणि वर्तन (द्राक्षांपर्यंत न पोहोचू शकणे) यांच्यातील संघर्षवृत्ती बदलून सोडवत असतो. म्हणूनच जिथे अशा प्रकारची विसंगती आहे तिथे वर्तनवृत्ती बदलू शकते.

आतापर्यंत आपण असे पाहिले की दृष्टिकोन/वृत्ती वर्तन बदलतात; तसेच वर्तनामुळे वृत्ती बदलतात हेपण आपण पाहिले. अर्थातच यावर काही मर्यादा आहेत. आपल्या समोरील प्रमुख मुद्दा म्हणजे या सगळ्याचा नागरी सेवांशी कसा आणि काय संबंध आहे याचा विचार करणे. हा विचार आपण पुढील लेखात करणार आहोत.