यूपीएससीची तयारी : प्रवीण चौगले
आजच्या लेखामध्ये यूपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपरमधील आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यासघटकामध्ये अंतर्भूत असणारा ‘परदेशस्थ भारतीय’ (Indian Diaspora) या घटकाविषयी चर्चा करणार आहोत.

डायस्पोरा (Diaspora)) हा मूळ ग्रीक शब्द आहे ज्याचा अर्थ विखुरणे किंवा पेरणे होय. जे लोक नोकरी, व्यवसाय किंवा इतर कोणत्याही हेतूसाठी मूळ देश सोडतात आणि जगाच्या इतर भागात राहतात अशा लोकांचा उल्लेख करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. परदेशस्थ भारतीयांसंबंधीच्या एका उच्चस्तरीय समितीच्या अहवालानुसार जगाच्या विविध भागांमध्ये स्थलांतरित झालेल्या आणि आपली स्वतंत्र भारतीय ओळख जपणाऱ्या भारतीयांचा समूह म्हणजे ‘परदेशस्थ भारतीय’ अशी व्याख्या केली आहे. मिनिस्ट्री ऑफ ओव्हरसीज इंडियन अफेयर्सने परदेशस्थ भारतीयांचे अनिवासी भारतीय (NRI) आणि भारतीय वंशाचे लोक (PIO) अशा दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेले आहे. परदेशस्थ भारतीयांचे विस्तृत वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येईल.

चरितार्थासाठी जाणारे

वसाहतीक कालखंडामध्ये शेतमळ्यांमध्ये काम करण्यास फिजी, दक्षिण आफ्रिका,

त्रिनिदाद व टोबॅगो, सुरीनाम इ. देशांत गेलेले भारतीय, ज्यांना गिरमिटिया (Indentured) असे म्हणतात.

भारतीय नागरिकत्व असणारे, परंतु परदेशामध्ये वास्तव्यास असणारे, ज्यांना

ग्रीनकार्डसारख्या सवलती मिळतात.

पर्यटक, संशोधन करण्यास जाणारे, अल्प कालावधीमध्ये परतणारे (फ्लोटिंग).

भारतीय डायस्पोरा हा एक सामान्य Generic) शब्द आहे, जो भारतीय प्रजासत्ताकातून परदेशात स्थलांतरित झालेल्यांना संबोधित करण्यासाठी वापरला जातो. परदेशस्थ भारतीयांची संख्या अंदाजे ३० दशलक्षांहून अधिक आहे. भारत सरकारला या समूहाचे महत्त्व समजले आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा घटक म्हणून आणि त्यांचे आर्थिक योगदान लक्षात घेता परदेशस्थ भारतीय हा घटक महत्त्वपूर्ण आहे. ९ जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या प्रवासी भारतीय संमेलनामध्ये  परदेशस्थ भारतीयांना पंतप्रधानांनी मातृभूमीकडून सर्व प्रकारच्या सहकार्याचे आश्वासन दिले. त्यांनी ‘वंदे भारत’ मोहिमेचा उल्लेख केला ज्यामध्ये कोरोना काळात ४५ लाखांहून अधिक भारतीयांची सुटका करण्यात आली. तसेच बाहेरील देशातील भारतीयांचे रोजगार टिकवून ठेवण्यासाठी केलेल्या मुत्सद्दी प्रयत्नांची माहिती दिली. आखाती देश व इतर भागांतून परत आलेल्या परप्रांतीयांसाठी ‘कुशल कामगार आगम डेटाबेस फॉर एम्प्लॉयमेंट सपोर्ट’चा (स्वदेस – SWADES) पुढाकार तसेच प्रवासी भारतीयांशी सुसंवाद आणि संपर्क करण्यासाठी ग्लोबल प्रवाशी रिश्ता पोर्टलबाबतदेखील त्यांनी चर्चा केली. यावरून भारत सरकारची परदेशस्थ भारतीयांविषयीची प्राथमिकता दिसून येते. या घटकावर यूपीएससी मुख्य परीक्षेत आतापर्यंत २०१७ व २०२० असा दोन वेळा प्रश्न विचारला गेला.

Q. Indian diaspora has a decisive role to play in the politics and economy of America and European Countriesl. Comment with examples. २०२०

परदेशात वास्तव्य करणारे भारतीय लोक दरवर्षी फार मोठ्या प्रमाणावर रक्कम पाठवितात. २०१८ साली इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार परदेशस्थ भारतीयांनी भारतामध्ये सुमारे साडे पाच लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम पाठविली होती.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या २०१५ च्या पाहणीनुसार, परदेशात गेलेल्यांच्या जगातील एकूण स्थलांतरितांपैकी भारतीयांची संख्या अधिक आहे. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने प्रादेशिक सार्वभौमत्वावर दिलेल्या भरामुळे परदेशस्थ भारतीयांकडे दुर्लक्ष झाले. परिणामी, परदेशस्थ भारतीयांची परराष्ट्र धोरणाला आकार देण्यातील भूमिका मर्यादित राहिली.

१९९१ नंतर अनिवासी भारतीयांच्या अर्थव्यवस्थेतील सहभागाबाबत विचार केला गेला. विविध योजना व कार्यक्रमांद्वारे परदेशस्थ भारतीयांशी निकटचे संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न भारत सरकारद्वारे सुरू असतात. परराष्ट्र धोरण अभ्यासकांच्या मते, नव-उदारमतवादी धोरणात्मक पुढाकारांना प्रोत्साहन देणारे घटक म्हणून भारत सरकारला परदेशस्थ भारतीयांच्या आर्थिक क्षमतेची झालेली जाणीव तसेच परदेशस्थ भारतीयांचा सॉफ्ट पॉवर म्हणून वापर यामुळे परदेशस्थ भारतीयांबाबतच्या सरकारच्या दृष्टिकोनामध्ये बदल घडून येण्यास मदत झाली.

परदेशस्थ भारतीयांनी ते ज्या देशात राहतात तेथे केवळ आर्थिक विकासातच नव्हे तर तिथल्या राजकीय प्रक्रिया आणि एकंदर विकासातही योगदान दिलेले आहे. कित्येक भारतीयांनी राजकारणात चांगला ठसा उमटवला आहे. उदा. अनिरुद्ध जगन्नाथ- मॉरिशस, महेंद्र सिंग चौधरी- फिजी, लिओ वराडकर- आयर्लंड आणि कमला हॅरिस यांची अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी नुकतीच निवड झाली. याबरोबरच गुगलचे सुंदर पीचई आणि मायक्रोसॉफ्टचे सत्य नाडेला यांसारख्या प्रभावशाली भारतीयांचा एक दबाव गट तयार करता येईल का, याची चाचपणी करणे आवश्यक ठरते. कारण अशा दबावगटाच्या माध्यमातून भारताचा आंतरराष्ट्रीय राजकारणात दबदबा निर्माण करता येईल, तसेच भारतामध्ये गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण इ. बाबींचा ओघ वाढण्यास मदत होईल. सध्या भारत सरकारचे बहुचर्चित कार्यक्रम डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया यांनाही फायदा होऊ शकतो.

परदेशस्थ भारतीयांना भारत सरकार विविध मार्गांनी भारताशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यांना भारतामध्ये उद्योगस्नेही वातावरण निर्माण करून देण्याची निकड आहे. सध्या प्रचलित असणारे कायदे, कररचना, पर्यावरणीय मंजुऱ्या इ. बाबींमधील क्लिष्टता कमी करणे आवश्यक आहे.

परदेशस्थ भारतीयांना अधिकाधिक भारताशी जोडून भारत आणि ते राहत असलेले देश यांच्या विकासामध्ये त्यांचे सहकार्य प्राप्त करण्याची आवश्यकता आहे. या घटकाच्या तयारीमध्ये परदेशस्थ नागरिकांकरिता भारत सरकार राबवत असलेल्या विविध योजना, उपक्रम इत्यादींची माहिती घेणे आवश्यक आहे. उदा. प्रवासी कौशल योजना या उपक्रमाद्वारे परदेशात जाणाऱ्या कामगारांना तिकडे जाण्यापूर्वी प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यात संबंधित देशातील सामाजिक चालीरीती, समजुती, नियम व आधुनिक उपकरणे या बाबत माहिती दिली जाते. परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या ‘नो इंडिया प्रोग्रॅम’द्वारे (‘ल्लङ्म६ कल्ल्िरं स्र१ङ्मॠ१ेंी) आजपर्यंत विदेशातील भारतीय युवक व युवती निवड करून त्यांना भारतातील संस्कृती, शहरे, ग्रामीण जीवन, चित्रपट, लोकांचे राहणीमान इत्यादींची ओळख करून दिलेली आहे.

Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…

toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?

ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

Controversy over opting out in recruitment process of Maharashtra Public Service Commission
‘ऑप्टिंग आऊट’वरून पुन्हा वाद; या पर्यायामुळे आर्थिक गैरव्यवहार….