श्रीकांत जाधव
आजच्या लेखामध्ये आपण ‘मध्ययुगीन भारत’ या घटकाची चर्चा करणार आहोत. या घटकावर २०११ ते २०२० मध्ये एकूण २२ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. इतिहासातील इतर घटकाच्या तुलनेत या घटकावर कमी प्रश्न विचारले जातात.
गतवर्षीय परीक्षेतील प्रश्न
* २०२० मध्ये प्रतिहार, चोळ, व पाला या राजकीय सत्ता, त्याचबरोबर हुंडी हा हर्षांत्तोर कालखंड (Post Harsha Period) मधील काय प्रकार होता हे प्रश्न विचारण्यात आलेले होते. हे प्रश्न प्रारंभिक मध्ययुगीन कालखंडाशी संबंधित आहेत.
* २०१९ मध्ये मुघलकालीन जहागिरीदार आणि जमीनदार यांच्यात काय फरक होता याचबरोबर दिल्ली सल्तनतमधील महसूल अधिकारी, इक्ता पद्धत , मीर बक्ष आणि त्यांचे कार्य इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.
* २०१८ मध्ये खालीलपैकी कोणत्या परकीय प्रवाशाने विस्तृतपणे भारतातील हिरे आणि हिऱ्यांच्या खाणी याविषयी चर्चा केलेली आहे? असा प्रश्न विचारलेला होता आणि यासाठी अनुक्रमे फँ्रकोइस बर्नियर, जीन बाप्टिस्टे टेवर्नियर, जेंन दी थेवेनोत व अब्बे बार्थलेमी कारे हे चार पर्याय देण्यात आलेले होते.
* २०१७ मध्ये काकतीय राज्यामधील खालीलपैकी कोणते महत्त्वाचे बंदर (seaport) होते, असा प्रश्न विचारण्यात आलेला होता, यासाठी काकिनाडा (Kakinada),मोतुपल्ली (Motupalli), मसूलीपत्तनम (Masulipatanam/Machalipatnam) व नेल्लुरू (Nelluru) असे चार पर्याय देण्यात आलेले होते.
* २०१६ मध्ये मध्ययुगीन भारताच्या आर्थिक इतिहास संदर्भात अराघत्ता (Araghatta) हे काय दर्शविते, असा प्रश्न विचारण्यात आलेला होता व यासाठी – वेठबिगार, सैनिक अधिकाऱ्यांना दिले जाणारे भूदान, जमीन सिंचनासाठी वापरले जाणारे जलचक्र आणि पडीक जमिनीचे सुपीक जमिनीमध्ये केले जाणारे रूपांतर असे चार पर्याय दिलेले होते.
* २०१५ मध्ये बाबरच्या भारतातील आगमनामुळे काय झाले व यासाठी – उपखंडामध्ये दारूगोळा वापरण्यास सुरुवात झाली, स्थापत्यकलेमध्ये कमान आणि घुमट बनण्यास सुरुवात झाली आणि तैमूर राजवंशाची स्थापना करण्यात आली हे पर्याय दिलेले होते.
* २०१४ मध्ये मध्ययुगीन भारतात महत्तर आणि पट्टीकल पदनाम कशाशी संबंधित होते, हा प्रश्न विचारला होता आणि याचे सैनिक अधिकारी, ग्रामप्रमुख, वैदिक कर्मकांडामधील विशेषज्ञ आणि कारागार श्रेणीप्रमुख असे चार पर्याय देण्यात आलेले होते.
* २०१२ मध्ये सूफी चळवळीवर प्रश्न आला होता. ‘गूढ सूफीवाद पुढीलपैकी कोणत्या मार्गाचा पुरस्कार करणारे म्हणून ओळखले जातात?’ हा प्रश्न विचारला होता आणि यासाठी ध्यान आणि श्वासावर नियंत्रण, एकांतात खडतर संन्याशी जीवन आणि धार्मिक गीताद्वारे श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणे असे तीन पर्याय दिलेले होते.
उपरोक्त स्वरूपाचे प्रश्न या घटकावर विचारले जातात, साधारणत: या प्रश्नाचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ पद्धतीचे आहे. ह्य घटकावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नावरून असे लक्षात येते की, हा घटक मुद्देनिहाय माहितीचे संकलन करून अभ्यासणे गरजेचे आहे, पण यासाठी सर्वप्रथम या घटकाचे मूलभूत ज्ञान असणे गरजेचे आहे.
अभ्यासाच्या दृष्टीने या घटकाचे नियोजन
मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात साधारणत: इ.स. ७५० पासून मानली जाते. सुरुवातीचा कालखंड (इ.स ७५०-१२००पर्यंत) या कालखंडाची महत्त्वाची दोन वैशिष्टय़े पाहावयास मिळतात. यातील पहिले म्हणजे भारतात सरंजामशाही स्वरूपाच्या राजकीय शासनव्यवस्थेचा उदय आणि दुसरे म्हणजे भारतात इस्लाम धर्माचे आगमन आणि सिंध प्रांतातून सुरू झालेले अरबांचे व तुर्काचे आक्रमण होय. या कालखंडामध्ये भारताचा विविध भागामध्ये प्रादेशिक राजकीय सत्तेचा उदय झालेला होता. उत्तर भारतामधील राजपूत सत्ता-प्रतिहार, परमार, चौहान व चंदेला इत्यादी, पूर्व भारतामध्ये पाल यांची सत्ता तसेच मध्य भारतात राष्ट्रकुट आणि दक्षिण भारतात चोल, चालुक्य इत्यादींच्या सत्ता होत्या. या नंतरचा कालखंड हा दिल्ली सल्तनत व समकालीन प्रादेशिक सत्तांचा होता आणि दिल्ली सल्तनतीस समकालीन असणाऱ्या सत्तांमध्ये देवगिरीचे यादव, होयसळ, काकतीय विजयनगर साम्राज्य, बहामनी राजघराणे तसेच काश्मीर, बंगाल, गुजरात या प्रांतांतील प्रादेशिक राजकीय सत्ता यांचा मुख्यत्वे समावेश होता. दिल्ली सल्तनतेच्या नंतर मुघल साम्राज्याची सत्ता भारतात स्थापन झालेली होती. या सत्तेला समकालीन असणाऱ्या सत्तांमध्ये राजस्थानमधील राजपूत सत्ता तसेच दख्खन भागातील आदिलशाही, निजामशाही आणि महाराष्ट्रातील मराठा साम्राज्य इत्यादींचा समावेश होतो. याचबरोबर मध्ययुगीन भारतात भक्ती चळवळ आणि सूफी चळवळ या दोन धार्मिक चळवळी अस्तिवात आलेल्या होत्या आणि यांचा तत्कालीन समाजजीवनावर खूप मोठा प्रभाव पडलेला होता तसेच यातील भक्ती चळवळ ही हिंदू धर्माशी संबंधित होती आणि सूफी चळवळ ही इस्लाम धर्माशी संबंधित होती. याव्यतिरिक्त शीख चळवळीच्या माध्यमातून शीख धर्माची स्थापना झालेली होती, याची स्थापना गुरु नानक यांनी केलेली होती. अशा पद्धतीने या घटकाचे नियोजन करावे लागते.
या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकाचा आधार घ्यावा लागतो. यामध्ये Our past part II इयत्ता ७वी आणि इयत्ता १२वीचे Themes in Indian History part— II ही पुस्तके अभ्यासावी लागतात आणि याच्या जोडीला सतीश चंद्र लिखित मध्ययुगीन भारतावरील जुने एनसीईआरटीचे पुस्तक वाचावे जेणेकरून या घटकाची योग्य परीक्षभिमुख तयारी आपणाला करता येते. या पुढील लेखामध्ये आपण भारतीय कला आणि संस्कृती या घटकाचा आढावा घेणार आहोत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 19, 2021 2:18 am