यूपीएससीची तयारी : श्रीकांत जाधव प्रस्तुत लेखामध्ये आपण यूपीएससी मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर तीनमधील जैवविविधता आणि पर्यावरण या घटकाची चर्चा करणार आहोत. या घटकावर विचारण्यात आलेले प्रश्न - पर्यावरण आघात मूल्यांकन (Environment Impact Assessment (EIA)) मसुदा -२०२० हा सद्य:स्थितीत अस्तित्वात असणाऱ्या पर्यावरण आघात मूल्यांकन अधिसूचना, २००६ यापेक्षा कशा प्रकारे भिन्न आहे? (२०२०) पर्यावरण संबंधित परिस्थितीकी तंत्रमधील वहनक्षमता (carrying capacity) याची परिभाषा करा. आणि स्पष्ट करा की, कशा प्रकारे ही संकल्पना एखाद्या प्रदेशाच्या शाश्वत विकास नियोजनाच्या सटीक आकलनासाठी महत्त्वाची आहे. (२०१९). भारतात जैवविविधता कशा प्रकारे वेगवेगळी आढळून येते? वनस्पती आणि प्रजाती यांच्या संवर्धनासाठी जैविक विविधता कायदा २००२ कशा प्रकारे साहाय्यकारी आहे? (२०१८) हवामान बदल ही एक जागतिक समस्या आहे. भारत हवामान बदलामुळे कशा प्रकारे प्रभावित होईल? हवामान बदलामुळे भारतातील हिमालयीन आणि समुद्रकिनारपट्टी असणारे राज्ये कशी प्रभावित होतील? (२०१७) मोठय़ा प्रकल्पांचे नियोजन करताना मानवी वस्त्यांचे पुनर्वसन हा एक महत्त्वाचा पर्यावरणीय परिणाम आहे, ज्यावर नेहमीच वादविवाद होतो. विकासाचे मोठे प्रकल्प प्रस्तावित करताना हे परिणाम सुसाह्य़ करण्यासाठी सुचविलेल्या उपायांवर चर्चा करा. (२०१६) नमामी गंगे आणि स्वच्छ गंगासाठीचे राष्ट्रीय मिशन (NMCG) कार्यक्रम आणि यापूर्वीच्या योजनांपासून मिळालेल्या संमिश्र परिणामाच्या कारणांवर चर्चा करा. गंगा नदीच्या संवर्धनासाठी कोणती मोठी झेप ही वाढीव योगदानाच्या अपेक्षेपेक्षा अधिक साहाय्यकारी होऊ शकते? (२०१५) जरी कार्बन क्रेडिट आणि स्वच्छ विकास प्रणाली यू.एन.एफ.सी.सी.सी.च्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या असल्या तरी, यातील कार्बन क्रेडिटच्या मूल्यामध्ये मोठय़ा प्रमाणात घसरण झालेली आहे, अशा स्थितीतही हे चालू ठेवावे का? आर्थिक वृद्धीसाठी भारताला आवश्यक असणारी ऊर्जेची गरज या संदर्भात चर्चा करा. (२०१४) अवैधरीत्या खाणकामामुळे काय परिणाम होतात? कोळसा खाण क्षेत्रासाठी पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या ‘जा किंवा जाऊ नका’ (GO AND NOT TO GO) या संकल्पनेची चर्चा करा. (२०१३) उपरोक्त स्वरूपाचे प्रश्न या घटकावर विचारण्यात आलेले आहेत. संपूर्ण पेपर तीनचा विचार केल्यास या घटकावर साधारणत: एक किंवा दोन प्रश्न विचारण्यात येतात. तसेच हे प्रश्न विषयाच्या पारंपरिक ज्ञानापेक्षा या घटकाशी संबंधित चालू घडामोडींचा विचार करून विचारण्यात येतात. २०२० मध्ये कोरोना या महामारीचा प्रादूर्भाव संपूर्ण जगात झालेला आहे आणि याचा पर्यावरण आणि जैवविविधता यावरती कसा प्रभाव झालेला आहे, तसेच भारत सरकारने पर्यावरण आघात मूल्यांकन अधिसूचना २०२० जाहीर केलेली आहे, या मुद्याचा अभ्यास येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी करावा लागणार आहे आणि यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. या घटकाच्या पारंपरिक ज्ञानाची व्याप्ती अधिक विस्तृत आहे. पण उपरोक्त प्रश्नाचे विश्लेषण केल्यास आपणाला या घटकाचा अभ्यास नेमक्या कोणत्या पद्धतीने करावा याची दिशा मिळते. वरील प्रश्नामध्ये संकल्पना, तसेच संबंधित कार्यक्रम आणि त्यापासून झालेला फायदा आणि त्यांची जैवविविधता आणि पर्यावरण याचे संवर्धन करण्यासाठीची उपयुक्तता यासारख्या पैलूंचा मुख्यत्वे विचार केलेला दिसून येतो. तसे या घटकाचे स्वरूप वैज्ञानिक पद्धतीचे आहे आणि यात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पनांची मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे. जैवविविधता आणि पर्यावरण-परीक्षाभिमुख आकलनासाठी लागणारा दृष्टिकोन जगातल्या संपन्न जैवविविधता असलेल्या मोजक्या प्रदेशांपैकी भारत एक आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि याच्या परिणामस्वरूप भारतातील उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असून याचा भारतातील पर्यावरण आणि जैवविविधतेवर नकारात्मक परिणाम होत आहे. याचबरोबर आधुनिकीकरणाच्या युगात नैसर्गिक साधनसंपत्तीवर मोठय़ा प्रमाणावर संकट येत आहेत. शहरीकरण, वाढत जाणारी लोकसंख्या, जंगलाची होत असलेली तोड, नष्ट होत चाललेले वन्यजीवांचे अधिवास, जैविक संपत्तीचा अमर्याद वापर यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जैविक उत्पादने व साधनसंपत्तीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्या तसेच एकूण जैवविविधतेच्या संपत्तीवर विपरीत परिणाम होत आहे. शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन वेळीच करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात खूप मोठय़ा पर्यावरणीय समस्यांना सामोरे जावे लागेल आणि याचे गंभीर परिणाम जैवविविधता आणि पर्यावरण यावर होऊ शकतात. या सर्व पैलूंचे एकत्रित आकलन करून हा घटक समजून घ्यावा लागतो. या घटकामध्ये जैवविविधता आणि पर्यावरण याचे संरक्षण, पर्यावरणीय प्रदूषण आणि होणारा ऱ्हास, पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन इत्यादी मुद्दे आपणाला अभ्यासावे लागणार आहेत जे पर्यावरण आणि जैवविविधतेचा होणारा ऱ्हास आणि या ऱ्हासासाठी जबाबदार असणारे घटक, जैवविविधतेला निर्माण झालेला धोका, पर्यावरणीय प्रदूषण, नदी प्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण व यामुळे उत्पन्न झालेल्या समस्या याची तयारी करावी लागते. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षणासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजना, भारत सरकारमार्फत जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षित करण्यासाठी पास करण्यात आलेले विविध कायदे आणि त्यांची उपयुक्तता तसेच पर्यावरणासंबंधी करावयाचे पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन आणि हे का अनिवार्य करण्यात आलेले आहे, तसेच याची नेमकी काय उपयुक्तता आहे, या सारख्या एकत्रित बाबींचा विचार करून या घटकाचे परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारे नियोजन करावे लागणार आहे. या घटकासाठी एन.सी.ई.आर.टी. ची पर्यावरणासंबंधित पुस्तके वाचावीत. बाजारात या घटकासाठी गाईड्स स्वरूपातील अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. यातील कोणतेही पुस्तक जे सोप्या पद्धतीने या घटकाची माहिती देईल ते वाचावे. याचबरोबर इंडिया इअर बुकमधील पर्यावरणाचे प्रकरण याचाही अभ्यास करावा. चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी इंडियन एक्स्प्रेस, लोकसत्ता ही दैनिके , योजना, कुरुक्षेत्र आणि डाऊन टू अर्थ ही मासिके, तसेच पर्यावरण आणि वन मंत्रालय, जैवविविधता प्राधिकरण यांची संके तस्थळे यांचा वापर करावा आणि यासोबतच भारत सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालातील जागतिक तापमानवाढ आणि शाश्वत विकास हे प्रकरण अभ्यासावे.