आजच्या लेखामध्ये आपण ‘स्वातंत्र्योत्तर भारत’ या घटकाची चर्चा करणार आहोत. या घटकावर २०१३ ते २०१६मध्ये एकूण सहा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ते खालीलप्रमाणे होते.

  • विनोबा भावे यांच्या भूदान व ग्रामदान आंदोलनाच्या उद्देशाची चिकित्सा करा आणि त्याच्या यशाची चर्चा करा.
  • ‘जय जवान जय किसान’ नाऱ्याचा (घोषवाक्य) उदय आणि महत्त्व यावर चिकित्सक पद्धतीने लेख लिहा.
  • कोणत्या परिस्थितीमुळे १९६६चा ताश्कंद करार करण्यात करण्यात आला, त्याचे विश्लेषण करा. करारातील प्रमुख वैशिष्टय़ांची चर्चा करा.
  • कोणत्या अटळ परिस्थितीमुळे भारताला तत्परतेने बांगलादेशाच्या उदयामध्ये निर्णायक भूमिका बजावावी लागली, याचे चिकित्सक पद्धतीने परीक्षण करा.
  • भारताने स्वातंत्रप्राप्तीनंतर लगोलग आखलेल्या धोरणांना लेनिनच्या १९२१च्या नवीन आíथक धोरणाने प्रभावित केलेले होते, मूल्यांकन करा.
  • भाषावार राज्य निर्मितीमुळे भारतीय एकतेच्या उद्देशाला मजबुती मिळालेली आहे का?

या घटकाच्या अभ्यासाचे नियोजन कसे करावे याचा थोडक्यात आपण आढावा घेऊ. उपरोक्त प्रश्नाच्या आधारे आपणाला या घटकावर नेमक्या कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात याची एक समज प्राप्त होते. त्याआधारे आपणाला या घटकाच्या अभ्यासाचे नियोजन करता येते. साधारणत: या विषयाची सुरुवात करताना आपल्याला पुढील काही मुख्य मुद्दय़ांची तयारी करावी लागते. – भारताची फाळणी व फाळणीचे परिणाम, संस्थानांचे विलीनीकरण, भाषावार प्रांतरचना, विकासासाठी आखली गेलेली धोरणे व नियोजन, नेहरूचे परराष्ट्र धोरण व भारताची आंतरराष्ट्रीय भूमिका, कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांमधील भारताची प्रगती, चीन आणि पाकिस्तान या देशांनी भारतासोबत केलेली युद्धे व याचाशी निगडित करार व त्याचे परिणाम, इंदिरा गांधी यांचा कालखंड-बांग्लादेश मुक्ती, आणीबाणी व जयप्रकाश नारायण, जमीनसुधारणा धोरण व जमीन सुधारणा, नक्षलवाद व माओवाद, नवीन सामाजिक चळवळी-वांशिक चळवळी, पर्यावरण चळवळ व महिला चळवळ इत्यादी, पंजाब व आसाममधील दहशतवाद व पूर्वोत्तर राज्यातील घुसखोरी, राजकीय क्षेत्रातील बदल व प्रादेशिकवादाचे राजकारण तसेच या सर्व घटकाशी संबंधित घटना, व्यक्ती आणि मुद्दे या अनुषंगाने याची तयारी करावी लागते.

उपरोक्त प्रश्नांचे योग्य आकलन केल्यास आपणाला असे दिसून येते की यातील जवळपास सर्व प्रश्न हे भारताच्या स्वातंत्रप्राप्तीनंतरच्या पुढील दोन दशकांतील महत्त्वाच्या घडामोडींशी संबंधित आहेत. म्हणून भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दोन दशकांतील घडामोडींची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. उपरोक्त प्रश्नांमधील  ‘भाषावार राज्य निर्मितीमुळे भारतीय एकतेच्या उद्देशाला मजबुती मिळालेली आहे का?’ हा प्रश्न योग्य पद्धतीने समजून घेण्यासाठी भाषावार प्रांत रचना का करण्यात आलेली होती तसेच याची नेमकी कोणती कारणे होती व याचा नेमका इतिहास काय आहे आणि यासाठी सरकारमार्फत कोणत्या उपाययोजना आखण्यात आलेल्या होत्या याची माहिती असायला हवी. तसेच १९६२मध्ये स्थापन करण्यात आलेली राष्ट्रीय एकता परिषद व याची उदिष्टे यांसारख्या पलूंचा एकत्रित विचार करून उदारणासह उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. भाषावार राज्यनिर्मितीमुळे भारतीय एकतेच्या उदेशाला मजबुती मिळालेली आहे का याचे संतुलित पद्धतीने विश्लेषण उत्तरामध्ये असणे अपेक्षित आहे.

उपरोक्त प्रश्नामधील दोन प्रश्न हे भारतासोबत पाकिस्तानने केलेल्या दोन युद्धाच्या पाश्र्वभूमीला ग्राह्य धरून विचारण्यात आलेले आहेत आणि या दोन्ही प्रश्नांचे योग्य आकलन होण्यासाठी आपणाला भारताची फाळणी व फाळणीचे परिणाम, संस्थानाचे विलीनीकरण याची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. त्यानंतर घडलेल्या घडामोडींचीही माहिती असणे गरजेचे आहे. तत्कालीन नेमकी कोणती कारणे होती, इत्यादीची सखोल माहिती असणे गरजेचे आहे. त्याशिवाय या प्रश्नांची मुद्देसुद्ध उत्तरे लिहिता येत नाहीत. जोडीलाच ताश्कंद कराराची वैशिष्टय़े नेमकी काय होती याची संकीर्ण माहिती असणेही गरजेचे आहे. थोडक्यात हे प्रश्न विषयाची सखोल माहिती आणि संकीर्ण माहिती या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार करून विचारण्यात आलेले आहेत.

वरील प्रश्नामध्ये भूदान व ग्रामदान चळवळीवरील प्रश्न तसेच ‘जय जवान जय किसान’ नाऱ्याशी संबंधित प्रश्न विश्लेषणात्मक पद्धतीने समजून तत्कालीन सामाजिक आणि आíथक विकासामध्ये त्यांची नेमकी उपयुक्तता काय होती आणि यामुळे काय साध्य झाले अशा महत्त्वाच्या पलूंचा विचार करून चिकित्सक पद्धतीने उत्तराची मांडणी करणे अपेक्षित होते. याच बरोबर भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नियोजन पद्धतीने आíथक विकास घडवून आणण्यासाठी जे धोरण आखलेले होते त्यावर लेनिन याच्या १९२१च्या नवीन आíथक धोरणाचा प्रभाव कसा होता हे उदाहरणासह चर्चा करून, याचे मूल्यांकन उत्तरामध्ये करणे अपेक्षित होते. या सर्व प्रश्नाच्या चच्रेमुळे आपणाला या विषयावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप आणि याची उत्तरे नेमकी कशी लिहावी याची एक योग्य दिशा मिळते याचबरोबर या विषयाची तयारी कशी करावी याची एक स्पष्ट आखणी करता येते.

या घटकातील अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ावर प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत म्हणजेच येथून पुढे होणाऱ्या मुख्य परीक्षामध्ये, महत्त्वाच्या घटकावर प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणून या घटकाची सर्वप्रथम मूलभूत माहिती अभ्यासणे गरजेचे आहे. ज्यामुळे या घटकाची सर्वसाधारणे परीक्षेच्या दृष्टीने लागणारी समज आपणाला प्राप्त होते. या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकाचा आधार घ्यावा लागतो. इयत्ता १२वीचे राज्यशास्त्राचे ‘पॉलिटीक्स इन इंडिया सीन्स इंडिपेंडन्स’ हे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे. तसेच या घटकाची सखोल आणि सर्वागीण तयारी करण्यासाठी बिपिनचंद्र लिखित ‘इंडिया आफ्टर इंडीपेंडन्स’ आणि रामचंद्र गुहा यांचे ‘इंडिया आफ्टर गांधी’ हे संदर्भ ग्रंथ उपयुक्त ठरतात. याच्या जोडीला या विषयावर बाजारामध्ये अनेक गाईडस स्वरूपात लिहिलेली पुस्तके उपलब्ध आहेत. या पुढील लेखामध्ये आपण ‘आधुनिक जगाचा इतिहास’ या घटकाचा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा, सर्वागीण आढावा घेणार आहोत