आजच्या लेखामध्ये आपण ‘भारतीय इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ’ या घटकामधील प्राचीन भारत या घटकाची पूर्व परीक्षेसाठी तयारी कशी करावी, हे पाहणार आहोत. या घटकावर २०११ ते २०१७ मध्ये एकूण १९ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ते आपल्याला खालील तक्त्यामध्ये दिसत आहेत. तक्त्यातील विश्लेषणामध्ये कला आणि संस्कृतीसंबंधित प्रश्न ग्रा धरलेले नाहीत. या घटकाची पुढील येणाऱ्या लेखामध्ये स्वतंत्रपणे चर्चा करणार आहोत. आत्तापर्यंत एकूण १९ प्रश्न विचारलेले आहेत. यातील काही प्रश्नांचा आपण सर्वप्रथम आढावा घेऊ, ज्यामुळे या घटकावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचा योग्य अंदाज आपणाला घेता येईल. प्रश्नांचे स्वरूप २०११च्या परीक्षेमध्ये सिंधू अथवा हडप्पा संस्कृतीवर दोन विधाने देऊन प्रश्न विचारण्यात आलेले होते. यातील पहिले विधान - ‘धार्मिक गोष्टींचे अस्तित्व असूनही एक धर्मनिरपेक्ष संस्कृती होती’ आणि दुसरे विधान - ‘या काळात कापूस वस्त्रनिर्मितीसाठी वापरले जात होते.’ वैदिक संस्कृतीवर २०१२ मध्ये, ‘प्रारंभीच्या वैदिक आर्याचा धर्म कोणता होता?’ अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला होता. तसेच याच परीक्षेमध्ये प्राचीन भारताच्या संदर्भानुसार, ‘जैन व बौद्ध धर्म यांना काय एकसारखे होते - दु:ख आणि आनंद या दोन्ही भावनांचा अव्हेर, वेदाबाबत अनास्था अथवा विरक्ती आणि कर्मकांडाचे महत्त्व अमान्य,’ असे तीन पर्याय दिलेले होते. २०१३ मध्ये बौद्ध धर्माशी संबंधित ‘निर्वाण’ या संकल्पनेवर प्रश्न विचारण्यात आलेला होता. ‘खालीलपैकी कोणत्या राज्याचा बुद्ध जीवनाशी संबंध होता’ आणि यासाठी ‘अवंती, गांधार, कोशल आणि मगध’ असे चार पर्याय होते व हा प्रश्न २०१४ आणि २०१५ मध्ये लागोपाठ विचारण्यात आलेला होता. २०१६ मध्ये सर्वप्रथम, ‘अशोकाच्या शिलालेखाची उकल कोणी केली’ आणि यासाठी ‘जॉर्ज बुहलर, जेम्स प्रिन्सिप, मँक्स मुल्लर आणि विल्यम जोन्स’ असे चार पर्याय दिलेले होते. याव्यतिरिक्त प्राचीन भारतातील श्रेणी व्यवस्था, परकीय प्रवाशांद्वारे प्राचीन भारताचे केलेले वर्णन यांसारख्या बाबींवरही प्रश्न विचारण्यात आलेले होते. २०१७ मध्ये सिंधू संस्कृती आणि ऋग्वेदीक आर्यन संस्कृती यामध्ये असणाऱ्या भिन्नतेवर प्रश्न विचारण्यात आलेला होता. अभ्यासाचे नियोजन तक्त्यातील गतवर्षीच्या प्रश्न विश्लेषणावरून या विषयाची तयारी कशी करावी, याची एक स्पष्ट दिशा आपणाला निर्धारित करता येते. यातील ‘बौद्धयुग’ अथवा ‘महाजनपदाचा कालखंड’ यावर सर्वाधिक प्रश्न विचारले गेलेले आहेत. यातील जवळपास सर्व प्रश्न हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे आहेत. त्यामुळे प्राचीन भारताचा अभ्यास करताना याची विविध टप्प्यांनुसार अथवा कालखंडानुसार विभागणी करून संबंधित कालखंडातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि राजकीय घडामोडींचे व्यवस्थित आकलन करणे गरजेचे आहे. तसेच याविषयाची एक व्यापक समज आपणाला तयार करावी लागते. सिंधू संस्कृतीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नासाठी सिंधू संस्कृतीकालीन धार्मिक आणि आर्थिक जीवनपद्धतीची माहिती असणे गरजेचे आहे आणि हा प्रश्न वस्तुनिष्ठ प्रकारात मोडणार आहे, त्यामुळे याची अचूक माहिती असल्याखेरीज हा प्रश्न सोडविणे शक्य होणार नाही. या विषयावर विचारण्यात येणाऱ्या जवळपास सर्व प्रश्नांसाठी अशा स्वरूपाचे आकलन करूनच अभ्यासाचे नियोजन करावे लागते. तसेच हा विषय पारंपरिक स्वरूपाचा आहे, त्यामुळे याचा सर्वागीण अभ्यास करणे गरजेचे आहे. तसेच हा विषय अधिक सुलभ होण्यासाठी संक्षिप्त स्वरूपाच्या स्वत:च्या नोट्स तयार कराव्यात. त्यामुळे हा विषय कमीत कमी वेळेमध्ये तयार करता येऊ शकतो. तसे पाहता या विषयावर सर्वसाधारणपणे कमी प्रश्न विचारले जातात, हे आपणास वरील गतवर्षीच्या विचारल्या गेलेल्या प्रश्न विश्लेषणावरून दिसून येते. त्यामुळे या विषयाची तयारी करण्यासाठी किती वेळ द्यावा हे आधीच निश्चित करणे गरजेचे आहे. तसेच याची तयारी आपण फक्त पूर्व परीक्षेसाठी करत असतो, म्हणून पहिल्याप्रथम या विषयाचा सर्वागीण अभ्यास करून स्वत: काढलेल्या नोट्सची वारंवार उजळणी करणे गरजेचे आहे. जरी या विषयावर कमी प्रश्न विचारले जात असले तरी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी जास्तीत जास्त प्रश्न अचूक सोडविणे गरजेचे आहे. त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या दृष्टीने नमूद अभ्यासक्रमामधील प्रत्येक घटकाची योग्य तयारी करणे अपरिहार्य आहे, याची जाणीव असणे गरजेचे आहे. संदर्भसाहित्य या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकाचा आधार घ्यावा लागतो आणि या घटकाचे स्वरूप हे पारंपरिक असल्यामुळे अचूक माहिती अभ्यासणे गरजेचे आहे, ज्यासाठी आपणाला एनसीईआरटीची इयत्ता ८वी ते १२वीची इतिहासाची पुस्तके वाचावी लागतात. ज्यामध्ये विशेषकरून इयत्ता १२ वीचे ‘Themes in Indian History Part- I’ हे पुस्तक वाचावे लागते. तसेच याच्या जोडीला आर. एस. शर्मा लिखित प्राचीन भारत यावरील एनसीईआरटीचे जुने पुस्तक वाचणे आवश्यक आहे. या विषयाचे अनेक संदर्भग्रंथ बाजारात उपलब्ध आहेत. पण या विषयाचा परीक्षाभिमुख सखोल पद्धतीने अभ्यास करण्यासाठी काही निवडक संदर्भग्रंथाचा अभ्यास करावा लागतो. ज्यामध्ये ‘Early India’ - रोमिला थापर आणि ‘History of Ancient and Early Medival Indial - उपेंद्र सिंग इत्यादींचा वापर करणे फायद्याचे ठरते. या पुढील लेखामध्ये आपण मध्ययुगीन भारत या घटकाचा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा सर्वागीण आढावा घेणार आहोत.