फारुक नाईकवाडे

हा घटक म्हणजे उमेदवारांच्या प्रशासकीय आणि एकूणच जबाबदार नागरिक म्हणून असलेल्या अभिवृत्तीची चाचणी असते. सर्वसाधारण व्यवहारज्ञान, नैतिकदृष्टय़ा योग्य-अयोग्य मुद्दय़ांची जाण आणि भारतीय संविधानातील तरतुदींचे भान असल्यास कमीत कमी वेळेत हा विभाग जास्तीत जास्त गुण मिळवून देऊ शकतो. हा घटक पेपरच्या सुरुवातीला सोडवून आत्मविश्वास बळकट करायचा की शेवटच्या दहा मिनिटांत किंवा खूपच अवघड प्रश्नांमध्ये वेळ गेल्यावर ताण दूर करण्यासाठी अशा प्रश्नांनंतर सोडवायचा हा ज्याच्या त्याच्या कम्फर्ट झोनचा मुद्दा आहे. पण हे प्रश्न सोडविताना मन शांत ठेवून पर्यायांचा विचार करणे आणि जास्तीत जास्त समर्पक उत्तर शोधणे साध्य करायचे असेल तर सराव आणि सरावाचे विश्लेषण यांना पर्याय नाही!

या प्रश्नांमध्ये एखाद्या सुजाण नागरिकाचे हक्क आणि त्याची एखाद्या प्रसंगातील नागरिक या नात्याने किंवा हितसंबंधीय म्हणून असलेली कर्तव्ये यांच्याशी संबंधित दैनंदिन जीवनातील पेचप्रसंग आणि त्यावरील तोडगा विचारला जातो, याचबरोबर संस्थेत किंवा प्रशासनात अधिकारपदावर असताना येणारी आव्हाने व त्यावरील तोडगा किंवा नैतिकदृष्टय़ा द्विधा मन:स्थितीत अडकविणाऱ्या समस्यांवर आधारित प्रश्न यामध्ये विचारले जातात. उमेदवारांचा महिलांबाबतचा दृष्टिकोन व संवेदनशीलता तपासणारा किमान एक तरी प्रश्न विचारला जातो.

हे प्रश्न सोडवताना निवडलेल्या पर्यायाला ०/ १/ १.५ की २.५ गुण मिळतील याचा विचार आवश्यक आहे. त्यामुळे पर्यायांचे श्रेणीकरण करण्याची सवय लावून घ्यायला हवी. काही वेळेला उत्साहाच्या भरात एकदम आदर्शवादी पर्याय निवडला जातो. पण तो अमलात आणण्याचा अधिकार आपल्याकडे नसेल किंवा त्यातून एखादा ‘साईड इफेक्ट’ उद्भवण्याची शक्यता असेल तर त्याचे गुण कमीच मिळाणार. त्यामुळे सर्वात योग्य पण व्यवहार्य आणि उपलब्ध असल्यास दूरगामी परिणाम साधणारा पर्याय निवडणे हे २.५ गुण मिळण्यासाठी आवश्यक आहे. असे प्रश्न सोडविताना पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.

प्रश्न लक्षपूर्वक वाचून नेमकी समस्या समजून घ्यावी. प्रसंगातील पुढील महत्त्वाच्या ठळक बाबी लक्षात घ्याव्यात- प्रसंगातील नेमकी समस्या मांडणारे मुद्दे, संवेदनशीलपणे हाताळायचे मुद्दे, संबंधित व्यक्ती वा व्यक्तिगटांचे हितसंबंध, असल्यास वर्णन केलेल्या शक्यता, दिले असल्यास सामाजिक/ सांस्कृतिक/ आर्थिक/ राजकीयदृष्टय़ा महत्त्वाचे मुद्दे.

या प्रसंगातील तुमची नेमकी भूमिका कोणती आहे ते लक्षात घ्यावे. कोणतीही भूमिका स्पष्टपणे तुम्हाला दिलेली नसेल तर एक सुजाण नागरिक म्हणून योग्य निर्णय घेणे तुमच्याकडून अपेक्षित आहे हे समजून घ्यावे.

प्रसंगातील सर्वात कच्चा व मजबूत पक्ष कोणता ते लक्षात घ्यावे. राज्यघटनेतील तरतुदी व तत्त्वज्ञान, सर्वसाधारण नैतिकता व नैसर्गिक न्याय, निर्बल समाजघटकांविषयी तसेच पर्यावरणीय संवेदनशीलता यांच्या आधारे समतोल दृष्टिकोन व तटस्थता ठेवून याबाबतचे मूल्यमापन करावे.

दिलेले सर्व पर्याय व्यवस्थित वाचून घ्यावेत. वरील मूल्यमापनाच्या आधारे पूर्णपणे असंवेदनशील, बेजबाबदार, टोकाचे पर्याय बाद करावेत.

यानंतर योग्य वाटणाऱ्या पर्यायांच्या योग्यतेची श्रेणी ठरवावी. आपण निवडलेल्या उत्तराला तुलनात्मकरीत्या किती गुण मिळू शकतील याचा अंदाज येण्यासाठी पर्यायांचे श्रेणीकरण करण्याची सवय उपयोगी ठरते.

पर्यायांची श्रेणी ठरवताना तुमच्या भूमिकेच्या अनुषंगाने पर्यायामधील आवश्यकता, व्यवहार्यता विचारात घ्यावी. आवश्यक वाटू शकला तरी व्यवहार्य नसलेला पर्याय बाजूला ठेवावा. त्यानंतर असा पर्याय अमलात आणण्याचे अधिकार तुमच्याकडे आहेत का हे तपासावे. अशी अधिकारिता नसेल तर तो पर्याय योग्य असला तरी तुम्ही अमलात आणू शकत नसल्याने त्याची श्रेणी त्या भूमिकेपुरती कमीच गृहीत धरायला हवी. अशा श्रेणीकरणातून जास्तीत जास्त योग्य पर्यायापर्यंत पोहोचण्यास मदत होते.

उरलेल्या पर्यायातून जास्तीत जास्त सकारात्मक आणि बहुतांश हितसंबंधियांना मान्य होऊ शकेल असा पर्याय शोधावा. असे दोन पर्याय आढळले तर जास्त दूरगामी परिणाम करणारा, कायमस्वरूपी तोडगा सांगणारा पर्याय निवडावा.

व्यवस्थापकीय अभिवृत्ती तपासणारे प्रश्न हा मुलाखतीच्या टप्प्यावरील सर्वात महत्त्वाचा भाग असतो. समाधानकारक उत्तरे देणाऱ्या उमेदवाराला मुलाखत मंडळ पुढे असे प्रसंगाधारित प्रश्न विचारून उमेदवाराचा अशा  ३१्रू‘८ प्रसंगातील प्रतिसाद आणि कारवाई काय असेल हे तपासत असते. अशा वेळी उमेदवारांना आपले स्वत:चे असे उत्तर वा पर्याय मांडता येतात. पण लेखी परीक्षेमध्ये दिलेल्या पर्यायातीलच एक जास्तीत जास्त समर्पक पर्याय कोणता असेल हे शोधायचे आहे. त्यामुळे उपलब्ध पर्यायांचे विश्लेषण आणि त्यांच्या समर्पकतेचे श्रेणीकरण करण्याची सवय असायला हवी.  

सी सॅटमधील हमखास गुण मिळवून देणारा घटक म्हणजे निर्णय निर्धारण व समस्या समाधान हा घटक. एकूण १२.५ गुणांसाठी ५ प्रश्न या विभागात विचारले जातात. या प्रश्नांना नकारात्मक गुण दिले जात नाहीत. त्यामुळे चांगला स्कोअर करायचा असेल तर अधिकाधिक समर्पक उत्तरे देऊन जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. या पाच प्रश्नांसाठी एकूण १० मिनिटे वापरली तर किमान ५ गुण आणि योग्य अभिवृत्ती विकसित केली तर १० ते १२ गुण मिळवता येतात. पुढील लेखामध्ये अशा प्रश्नांसाठी आयोगाने दिलेले पर्याय व त्यांचे गुण याबाबत विश्लेषणात्मक चर्चा करण्यात येईल.