scorecardresearch

Premium

यूपीएससीची तयारी  : कर्तव्यवादी नैतिक सिद्धांत

निर्णय नैतिक ठरण्यासाठी अनिवार्य असणारी अट म्हणजे प्रत्यक्ष कृती किंवा कर्तव्य. या संकल्पनेचे दोन घटक आहेत.

upsc exam preparation information
(संग्रहित छायाचित्र)

विक्रांत भोसले

मागील लेखात आपण उपयुक्ततावादाच्या मांडणीच्या तुलनेत आपण कर्तव्यवादाची ओळख करून घेतली. या लेखात आपण कान्टने मांडलेल्या कर्तव्यवादातील आणखी काही बारकावे पाहणार आहोत, तसेच कान्टच्या अत्यंत महत्त्वाच्या नितांत आवश्यकतावादाची मांडणी अभ्यासणार आहोत.

mindset behind charity
Money Mantra: दानधर्मामागची मानसिकता
e filing system started in district court
यूपीएससीची तयारी : जॉन रॉल्स – न्यायाची मूलभूत संकल्पना
INDIA Aghadi opposition parties together
..म्हणून शत्रूशी मैत्रीही समर्थनीय!
15G 15H forms
Money Mantra: फॉर्म १५जी व १५एच कोण भरू शकतात?

कर्तव्य

निर्णय नैतिक ठरण्यासाठी अनिवार्य असणारी अट म्हणजे प्रत्यक्ष कृती किंवा कर्तव्य. या संकल्पनेचे दोन घटक आहेत.

(१) कृतीची भावना/प्रेरणा

(२) त्यानुसार प्रत्यक्ष केलेली कृती

आता ‘‘नुसतेच जगाचे चांगले व्हावे’’ असे म्हणून चालत नाही. त्यानुसार आपण स्वत: काय करतो, हे महत्त्वाचे असते. नुसते संकल्प चालणार नाही तर थेट कृतीही केली पाहिजे; तरच तिला कर्तव्य म्हणता येईल. अशारितीने कृतीची प्रेरणा हे तिचे पहिले वैशिष्टय़ असते. आणि कर्तव्याचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे प्रत्यक्ष कृती. या दोन्ही गोष्टी जुळल्या तरच तो निर्णय कर्तव्यवादी निर्णय म्हणून ओळखला जातो.

नीतिमत्तापूर्ण सामाजिक जीवनासाठी कान्टच्या मते कर्तव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कर्तव्य हे केवळ कर्तव्याच्या जाणिवेतून केले पाहिजे आणि त्याचा संबंध त्या कृतीतून होणाऱ्या परिणामांशी जोडला जाऊ नये, अशी मांडणी कान्ट करतो.

एकदा जर कर्तव्यासाठी कर्तव्य करावयाचे ठरविले की, मग ‘मी कर्तव्य का करू? माझ्या ठिकाणी कर्तव्यबुद्धी नाही, मी काय करू?’ असे कोणालाच म्हणता येत नाही. म्हणून कर्तव्य करणे, हेच माझे कर्तव्य बनते. ‘कर्तव्यासाठी कर्तव्य’ या एकाच भावनेतून जो संकल्प प्रेरित होतो तोच सत्संकल्प होय. विद्यार्थी, शिक्षक, राजकारणी, समाजकारणी, भाऊ, बहीण, मित्र इ. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वेळी कोणत्या तरी कर्तव्याला बांधील असतातच. यासंबंधी कान्टने नितांत आवश्यकतावादाची मांडणी केली. त्यात कान्ट असा आग्रह करतो की, प्रत्येक

नैतिक कृतीचे मूल्यमापन खालील तीन सिद्धांतांच्या आधारे करता येणे शक्य आहे.

नितांत आवश्यकतावाद (Categorical Imperative)  

(१) आचरणाचा नियम

‘‘केव्हाही काहीही झाले तरी अशी कृती कर की त्या कृतीमागील तत्त्व हे सार्वत्रिक नियम व्हावे, अशी इच्छा तू करू शकशील.’’ (‘‘ Act only on that principle which can be a Universal Law.’’)

कान्टच्या मते, कृती करतांना, कर्तव्य बजावतांना त्यामागील तत्त्व हे केवळ स्वत:लाच लागू असता कामा नये. ते सर्वाना लागू होईल, असे व्यापक व आदर्श असले पाहिजे. उदा. ‘दिलेले वचन पाळावे’ हे तत्त्व ‘मला इतरांनी दिलेले वचन त्यांनी पाळावे’ असे असू नये; तर ‘प्रत्येकाने दिलेले वचन पाळावे’ असे सार्वत्रिक स्वरुपाचे असावे.

(२) साध्य मूल्यत्व

‘कोणत्याही माणसाला, मग ती स्वत: असो किंवा इतर कुणीही, केवळ साधन म्हणून न वागविता तो माणूस एक साध्य आहे असे वागविले पाहिजे’ (‘‘Do not use any person including yourself as only means’’).

प्रत्येक माणूस हा आपले साध्य असला पाहिजे, तो साधन असता कामा नये. त्यास साधन समजू नये. जर ‘मी इतरांना साधन समजलो तर इतर लोकही मला तसेच साधन समजून वागवतील. त्यामुळे त्यांनी मला साध्य समजावे, असे मला वाटत असेल तर मीही त्यांना साध्यच मानले पाहिजे, साधन नाही.’ कान्टच्या मते, माझी स्वत:ची कृती व इतरांची कृती याकडे आपण भिन्न नजरेने न पाहता व्यापक दृष्टीने पाहिले पाहिजे. मी जितका महत्त्वाचा आहे असे मला वाटते, तितकेच महत्त्वाचे इतर जनही मला वाटले पाहिजेत; तरच मी ही इतर जनांना महत्त्वाचा वाटेन, अन्यथा नाही. कारण हा नियम सार्वत्रिक स्वरुपाचा असतो.

(३) साध्य मूल्यांचे सुव्यवस्थित जग

‘‘साध्य मूल्यांच्या एका सुव्यवस्थित जगाचा एक घटक समजून प्रत्येक व्यक्तीने आचरण करावे.’’ (‘‘Always act as a member of Kingdom of Ends’’) (Autonomy of Morality).

कान्टच्या मते, वरील तीन आदेश पाळले तर जे जग निर्माण होईल ते साध्य मूल्यांचे जग होय. ‘मी साध्य असेन इतर जनही साध्य असतील,’ असे सांगणारे हे स्वतंत्र नीतितत्त्वच आहे. परिपूर्ण नैतिक जगात संघर्ष नसतो. याचे कारण मी कुणालाही साधन मानीत नाही आणि मलाही कोणी साधन मानीत नाही. त्यामुळे माझ्यावर कोणी बंधन घालित नाही अन् मीही प्रतिकार म्हणून त्या व्यक्तीवर बंधने लादत नाही. अशा जगाची रचना ही साहजिकच सुव्यवस्थित असते. ते साध्य मूल्यांचे राज्य असते. साधारणत: असे घडते की, कोणतेही सुख कोणत्यातरी अटी पाळल्या तरच मिळते. त्यामुळे सत्संकल्पाशी सुसंगत असेल तर सुख चांगले असते. दुर्जनाला सुख मिळाले तर ते चांगले नसते. ती भयानक गोष्ट होईल. जगात वेगवेगळय़ा कालखंडात, वेगवेगळय़ा समाजामध्ये नीतिनियमविषयक कल्पना वेगवेगळय़ा असतात. मग वैश्विक पातळीवर समर्थनीय ठरणारे नियम बनवताच येणार नाहीत, असेही वाटू शकते. मात्र कान्टच्या नितांत आवश्यकतावादातून नैतिक नियमही सापेक्षतेच्या पलीकडे जाऊन बनवता येऊ शकतात, हा महत्त्वाचा विचार रुजवला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article for upsc exam preparation information zws

First published on: 21-09-2023 at 04:55 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×