समाजशास्त्र हा वैकल्पिक विषय असेल तर काय प्रश्न विचारले जाऊ शकतात ते पाहूया. समाजशास्त्र म्हणजे नक्की काय? किंवा समाजशास्त्र या विषयात कोणता अभ्यास केला जातो हे सोप्या शब्दात सांगा. या प्रश्नाच उत्तर नेमकं आणि खरोखरच सोप्या पद्धतीने देता आलं पाहिजे. यालाच जोडून, मानसशास्त्र आणि समाजशास्त्र किंवा सामाजिक मानसशास्त्र आणि समाजशात्र यात काय फरक आहे? समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र यात काय फरक आहे? उमेदवाराचं ग्रॅज्युएशन समजा इंजिनीअरिंग असेल तर प्रश्न विचारू शकतात की तुम्ही इंजिनीअर आहात मग समाजशास्त्र हा वैकल्पिक विषय का घेतला? बरेच उमेदवार घेतात म्हणून तुम्ही पण हा विषय घेतला का? समाजशास्त्र या विषयाचा तुम्ही प्रशासनात कसा उपयोग कराल? महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या समाजशास्त्रज्ञांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? तुम्हाला कुठच्या समाजशास्त्रज्ञांचे विचार सध्याच्या काळात योग्य वाटतात? समाजशास्त्रज्ञ डकहाइम, मार्गारेट मिड, एम. इन. श्रीनिवास, जी. एस. घुर्य्ये, इरावती कर्वे, डी. एन. धनागरे यांच्या कार्याविषयी तुम्हाला काय माहिती आहे? भारतीय समाजापुढे सध्या कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत? तुमच्या राज्यातील/ जिल्ह्यातले महत्त्वाचे तीन सामाजिक प्रश्न/समस्या काय आहेत? महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीत सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतीबा फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांचे कोणते योगदान आहे? पूर्वांचल मधल्या राज्यांमध्ये महिलांचे सामाजिक स्थान वेगळे आणि महत्त्वाचे का आहे? देशाच्या इतर भागांशी याची तुलना कशी करता येईल? कास्ट आणि क्लॅन यात काय फरक आहे? ट्रान्सजेंडर्स ना समाजाच्या मुख्य धारेत कसे आणता येईल? भारतीय संविधानाच्या कलम २१ अन्वये प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा हक्क हा शैक्षणिक हक्कही आहे तर मग बालकामगारांची सुटका करून त्यांना शिक्षित करण्यासाठी काय प्रयत्न कराल? दुर्गम भागात जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना तुमच्या समाजशास्त्र विषयाच्या ज्ञानाचा कसा वापर कराल?

या प्रश्नांकडे पाहता लक्षात येईल की यात थिअरीवरचे प्रश्न फारसे नाहीत. बहुतेक प्रश्न हे उपयोजित स्वरूपाचे आहेत. या प्रश्नांचा संबंध प्रशासनाशी आहे, चालू घडामोडींशी आहे, सामाजिक समस्यांशी पण आहे. त्यामुळे तयारी करताना या सर्व बाजूंचे भान ठेवून केली पाहिजे.

मानववंशशास्त्र हा आणखी एक उमेदवारांमध्ये लोकप्रिय असणारा वैकल्पिक विषय आहे. यातही मानववंशशास्त्र म्हणजे नक्की काय हा हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे. मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्र यात नेमका कोणता फरक आहे? मानववंशशास्त्राच्या महत्वाच्या शाखा कोणत्या आहेत? मानववंशशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या संशोधन पद्धती कोणत्या आहेत? त्यातली तुमच्या मते सर्वात योग्य पद्धत कुठची? तुम्ही प्रशासकीय कामात मानववंशशास्त्राच्या अभ्यासाचा कसा उपयोग कराल? कल्चरल रिलेटिव्हिझम ही संकल्पना तुम्हाला माहिती आहे का? या संकल्पनेबद्दल सोप्या शब्दात तुम्ही काय सांगू शकाल? किनशिप म्हणजे काय? वेगवेगळ्या संस्कृतीत ती वेगळी कशी असते? सध्याच्या ज्वलंत समस्यांपैकी कुठच्या समस्या मानववंशशास्त्राच्या आधारे सोडवणे शक्य आहे? हवामान बदलाशी सामना करण्यासाठी मानववंशशास्त्राचा उपयोग कसा होऊ शकतो? भारतातल्या आदिवासी समाजापुढे सध्या कुठचे प्रश्न आहेत? आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणं योग्य आहे का? त्यांना जर आपण पूर्णत: मुख्य प्रवाहात आणले तर त्यांची मूळ संस्कृती नष्ट होण्याची भीती नाही का? डार्विनच्या उत्क्रांती वादाच्या सिद्धान्ताविषयी आपल्याला काय माहिती आहे? युवल नोहा हारारी यांचे सेपियन्स हे पुस्तक वाचले आहे का? भारतातील वेगवेगळ्या राज्यात कोणत्या वंशाचे लोक आहेत? अंदमान निकोबार बेटांवर असलेल्या जरावा आणि सेंटीनेल या आदिम आदिवासी समूहावर कोणत्या मानववंश शास्त्रज्ञाने काम केले आहे? गुजरात आणि कर्नाटक राज्यात असलेल्या सिद्दी आदिवासी समूहाविषयी आपणास काय माहिती आहे? तुमच्या राज्यात कोणते आदिम आदिवासी आहेत आणि त्यांची संस्कृती, चालीरीती याची आपणास प्रत्यक्ष माहिती आहे का? आदिम आदिवासी प्रवण राज्यात काम करताना आपल्या मानववंशशास्त्र या विषयाच्या ज्ञानाचा प्रत्यक्ष त्या समूहाच्या भल्यासाठी कसा वापर कराल?

हे सगळेच प्रश्न हे नमुना म्हणून दिलेले आहेत. प्रत्यक्ष मुलाखतीत हेच प्रश्न विचारले जातील असा आमचा मुळीच दावा नाही. काही महत्वाच्या वैकल्पिक विषयांचे प्रश्न सविस्तर लिहिण्याचे एक कारण हे आहे की वरील समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र हे वैकल्पिक विषय सातत्याने त्यात चांगले गुण मिळत असल्याने बरेच विद्यार्थी घेतात आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व चाचणीच्या तयारीसाठी याचा उपयोग होऊ शकतो.

या पुढच्या लेखात आपण इतर काही वैकल्पिक विषयांवरचे प्रश्न बघू. त्यानंतर आपण वेगवेगळे छंद, आवडीनिवडी याबद्दलचे प्रश्न बघू. २०२४ च्या नागरी सेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्त्व चाचण्या आज १७ एप्रिल २०२५ रोजी संपणार आहेत. यावर्षी विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा बराचसा अंदाज आला आहे.

या आधारे या सदरात आम्ही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहोत. २०२४ च्या नागरी सेवा परीक्षेच्या अंतिम निकालासाठी उमेदवारांना मन:पूर्वक शुभेच्छा

mmbips@gmail. com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

supsdk@gmail. com