जाहिरात विश्वातल्या करिअरच्या संधी उलगडून दाखवल्या एका प्रसिद्ध जाहिरात कंपनीतील उच्चपदस्थ अभिजित करंदीकर यांनी..

दररोज आपण जाहिराती पाहत असतो. पेपर, रेडिओ, टीव्ही, इंटरनेट, बसेस, भिंती जिकडेतिकडे जाहिराती दिसत असतात. अनेक मोठमोठे ब्रँड्स जाहिरातींवर बराच खर्चही करतात. मग या जाहिराती तयार कशा होतात असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतोच. त्यासाठी जाहिरात संस्थेची माहिती करून घ्यायला हवी.

कोणत्याही जाहिरात संस्थेमध्ये तीन भाग असतात. अकाऊंट्स, प्लॅनिंग आणि क्रिएटिव्हज अशा तीन भागांमध्ये जाहिरात संस्थेमध्ये काम चालते. क्रिएटिव्ह विभाग हा जाहिरात संस्थेचा गाभा असतो. त्यातही आर्ट डिरेक्टर आणि कॉपीरायटर असे दोन भाग असतात. उत्तम कल्पनाशक्ती आणि कल्पनेची अंमलबजावणी हे खूप महत्त्वाचे असते. या क्रिएटिव्ह टीममध्ये कलादिग्दर्शनामध्ये ज्यांना करिअर करायचे आहे, अशा विद्यार्थ्यांना चित्रकलेसाठी घेतल्या जाणाऱ्या एलिमेंटरी आणि इंटरमिजेटसारख्या परीक्षा द्याव्या लागतात. यानंतर या विषयात पदवीचे शिक्षण घेण्यासाठी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स आणि रचनासारख्या महाविद्यालयांचा पर्याय विद्यार्थ्यांकडे असतो. यासाठी विद्यार्थ्यांना बारावीचे शिक्षण पूर्ण करून या महाविद्यालयाची प्रवेश परीक्षा द्यावी लागते. लेखी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाते. यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. सोफिया किंवा रहेजा महाविद्यालयातदेखील या क्षेत्रातील पदवीचे शिक्षण उपलब्ध आहे.

क्रिएटिव्हजमधील जाहिरातीची भाषा हासुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो. कॉपीरायटिंगमध्ये जाहिरातीच्या याच शब्दांवर काम चालते. जाहिरातीमध्ये कोणत्या शब्दांचा कशा प्रकारे वापर करायला हवा. नेमके आणि अचूक शब्द, कमीतकमी शब्दांत मोठा आशय मांडणारी वाक्यं हे कॉपी रायटिंगचे महत्त्वाचे फंडे आहेत. जाहिरात क्षेत्रासाठी तुमच्याकडे केवळ कला असणे उपयोगाचे नसते, तर कल्पकता आणि कला यांचा मेळ असावा लागतो.

जाहिरात क्षेत्रात यायचे तर विद्यार्थ्यांमध्ये कल्पनाशक्ती आणि निरीक्षणशक्ती असणे, सर्वात महत्त्वाचे असते. याशिवाय आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ग्राहक तुम्ही सांगत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर आंधळा विश्वास ठेवत नाही, त्यामुळे जाहिरात बनवताना त्यातील अतिशयोक्ती टाळावी लागते. ती लोकांना रुचेल यासोबतच पटेल अशीही बनवावी लागते. शिवाय या क्षेत्रात यायचे तर प्रत्येक वेळी विशिष्ट शिक्षण किंवा या क्षेत्रातीलच पदवीच हवी, असे नव्हे. पण ती नसल्यास अधिक मेहनत आणि संघर्ष करावा लागेल, याची मात्र तयारी ठेवणे, आवश्यक असते.