मराठवाडय़ातील शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखली जाणारी संस्था म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. २३ ऑगस्ट, १९५८ रोजी स्थापन झालेले मराठवाडा विद्यापीठ नामांतरच्या चळवळीनंतर, १९९४ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या नावाने ओळखले जाते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या इतिहासामध्ये दिलेले सामाजिक आणि शैक्षणिक योगदान विचारात घेत झालेले हे नामांतर विद्यापीठासाठीही तितकेच महत्त्वाचे ठरले. सध्या औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्य़ांमधील महाविद्यालयांसाठीचे कामकाज या विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली चालते. सामाजिक शास्त्रांच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अनेक ख्यातनाम मंडळींनी या विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या विभागांमधून विद्यार्थ्यांसाठीचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहिले आहे. सध्याही पाहत आहेत. तसेच, विज्ञानाच्या मूलभूत विषयांमधील अभ्यास आणि संशोधनासाठी स्थापन झालेल्या विद्यापीठाच्या विविध विभागांचे त्या- त्या क्षेत्रातील योगदानानेही सातत्याने आपल्या प्रगतीचा आलेख उंचावला आहे. गेल्या काही काळामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यापीठाची कामगिरी पाहून ‘नॅक’ने या विद्यपीठाला ‘ए- ग्रेड’चे मानांकन दिले आहे. संकुले आणि सुविधा स्वातंत्र्योत्तर काळात मराठवाडय़ातील शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी म्हणून या विद्यापीठाची स्थापना झाली. औरंगाबाद शहराचे ऐतिहासिक महत्त्व विचारात घेत विद्यापीठाचे मुख्य केंद्र या शहरामध्ये स्थापन करण्यात आले. औरंगाबाद शहराच्या वायव्येकडील टेकडय़ांच्या पायथ्याशी असणाऱ्या निसर्गरम्य परिसरामध्ये जवळपास ७०० एकरांमध्ये या विद्यापीठाचे मुख्य शैक्षणिक संकुल वसले आहे. या संकुलामध्ये विद्यापीठाचे ४२ शैक्षणिक विभाग कार्यरत आहेत. या संकुलामध्ये विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी वसतीगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यापीठाचे मुख्य ग्रंथालय १९५९ पासून आपल्या विविध सेवा विद्यार्थी आणि संशोधकांपर्यंत पोहोचवित आहे. १९६६ पासून विद्यापीठाच्या आवारातील इमारतीमध्ये सुरू असलेल्या विद्यापीठाच्या मुख्य ग्रंथालयामध्ये सध्या साडेतीन लाखांवर पुस्तके, जवळपास दीड लाखांवर ई- बुक्स आणि पंधरा हजारांवर ई- जर्नल्स उपलब्ध आहेत. तसेच, १६ ऑगस्ट, २००४ रोजी उस्मानाबाद येथे स्थापन झालेल्या विद्यापीठाच्या उपकेंद्रामधून सध्या इंग्रजी, शिक्षणशास्त्र, केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नोलॉजी, वॉटर अँड लँड मॅनेजमेंट, मॅनेजमेंट सायन्स या विभागांमधील अभ्यासक्रमांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अभ्यासक्रम फ. मुं. शिंदेंनी विद्यापीठाचे विद्यापीठ गीत लिहीले आहे. त्यातील शब्दांप्रमाणेच 'इतिहासाचे गीत गाणारे' विद्यार्थी विराट- विशाल संस्कृतीचे आणि जीवनाचेही गीत गाऊ शकतील, यासाठीचे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या ४२ विभागांमधून पदव्युत्तर पताळी, पदवी आणि पदविका अभ्यासक्रमही चालविले जातात. विद्यापीठाने आपल्या वेगवेगळ्या अध्यासनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एखाद्या संबंधित विचारधारेला वा तत्त्वज्ञानाला वाहिलेल्या संशोधन कार्यासाठीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. औरंगाबाद शहर हे महाराष्ट्रामधील एक सांस्कृतिक आणि औद्य्ोगिक केंद्र म्हणूनही ओळखले जाते. शहराची ही ओळख विद्यापीठाच्या नानाविध अभ्यासक्रमांमधूनही प्रतिबिंबित होताना आपल्याला अनुभवायला मिळते. विद्यापीठामध्ये पारंपरिक विषयांसोबतच करिअरसाठीचे नवे पर्याय ठरू शकणाऱ्या विषयांचे अध्ययन करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामध्ये परकीय भाषा विभाग, नाटय़शास्त्र विभाग, पत्रकारिता आणि जनसंवाद विभाग, भूशास्त्र विभाग, संस्कृत विभाग, पर्यटन व्यवस्थापन विभाग, उर्दू विभाग, ललित कला विभाग, संगीत विभाग, मुद्रण तंत्रज्ञान विभाग, नृत्य विभाग आदी विभागांची कामगिरी उल्लेखनीय अशीच राहिली आहे. १९७३ मध्ये स्थापन झालेल्या नाटय़शास्त्र विभागामध्ये नाटय़शास्त्रामधील पदवी आणि पदव्युत्तर पदवीसोबतच ‘डिप्लोमा इन टीव्ही प्रोडक्शन अँड बेसिक्स इन फिल्म मेकिंग’चा अभ्यासक्रमही चालविला जातो. ललित कला विभागामध्ये ‘एमएफए पेंटिंग अँड अप्लाइड आर्ट्स’चा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. संगीत विभागामध्येही संगीतामधील पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे अभ्यासक्रम चालतात. नृत्यशास्त्रामधील पदवी अभ्यासक्रम हे या विद्यापीठाचे एक वैशिष्टय़च ठरते. ‘स्कूल ऑफ प्रोफेशनल स्टडिज’च्या अंतर्गत चालणाऱ्या पत्रकारिता विभागामध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालतात. केमिकल टेक्नोलॉजी विभागांतर्गत बी. टेक आणि एम. टेकचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. शहर आणि परिसरामध्ये पर्यटकांचा वावर विचारात घेत विद्यापीठामध्ये सुरू झालेला मास्टर ऑफ टुरिझम अडमिनिस्ट्रेशनचा अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा पर्याय ठरतो. विद्यापीठामध्ये प्रिटिंग टेक्नोलॉजीशी निगडित अभ्यासक्रम हे विद्यार्थ्यांना थेट औद्य्ोगिक क्षेत्रामधील संधींकडे नेण्यासाठीचा रस्ता ठरतात. विद्यापीठाचा रसायनशास्त्र विभाग हा गेल्या काही काळामध्ये मूलभूत संशोधनासाठी महत्त्वाचा आहेच. पण सध्या नेट-सेटसारख्या परीक्षांच्या तयारीसाठी म्हणून विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा ठरत आहे. विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागाची प्रयोगशाळा, वनस्पतीशास्त्र विभागाचे उद्यान हे केवळ राज्यातीलच नव्हे, तर परराज्यातील आणि परदेशी अभ्यासकांसाठीही महत्त्वाच्या सुविधा पुरवित आहे. थोर भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या नावे चालणाऱ्या अध्यासनाद्वारे रिमोट सेन्सिंग, जिओस्पॅटिअल टेक्नोलॉजीसारख्या नव्या विषयांच्या अभ्यासासाठी कार्यशाळांचे सातत्याने आयोजन केले जात आहे. उस्मानाबाद उपकेंद्रामध्ये उपलब्ध असणारा मास्टर ऑफ मॅनेजमेंट सायन्स (वॉटर अँड लँड) हा अभ्यासक्रमही या विद्यापीठाच्या वेगळ्या उपक्रमांपैकी एक महत्त्वाचा आणि उल्लेखनीय उपक्रम ठरला आहे. borateys@gmail.com