आजच्या लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर तीनमधील आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन या घटकाचा सर्वागीण आढावा घेणार आहोत. भारत हा भौगोलिकदृष्टय़ा खूप मोठा देश आहे आणि प्रत्येक वर्षी भारताला विविध प्रकारच्या आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. वादळे, महापूर, भूकंप, त्सुनामी, दुष्काळ, भूस्खलन, हिमस्खलन, ढगफुटी, यामध्ये जागतिक हवामान बदलामुळे उतरोत्तर अधिकच वाढ होत आहे. याच्या जोडीला मानवनिर्मित आपत्तीचाही धोका आहे. आण्विक ऊर्जा केंद्रे, रासायनिक उद्योग यांमध्ये होणारे अपघात आणि यामुळे निर्माण होणारी आपत्तीसदृश परिस्थिती आणि याचा पर्यावरण आणि मानवी जीवनावर होणारा परिणाम गंभीर स्वरूपाचा असतो. सध्या जगातील जवळपास सर्व देशामध्ये आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन हा महत्त्वाचा धोरणात्मक भाग बनविण्यात आलेला आहे. भारत सरकारनेही आपत्ती हाताळण्यासाठी राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि स्थानिक पातळीवर विविध प्रकारच्या सरकारी यंत्रणा कार्यरत केलेल्या आहेत. तसेच याच्या जोडीला कायदेही करण्यात आलेले आहेत ज्यामुळे देशातील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षमपणे राबविता येऊ शकते. आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापनाविषयी जनजागृती करण्यासाठी सरकारकडून विशेष कार्यक्रम राबविले जातात.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे जगभरातील जवळपास सर्व देशांमध्ये विकासात्मक प्रक्रिया अधिक वेगवान बनलेली आहे. पण यामुळे विविध प्रकरच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. उदाहरणार्थ, अमर्याद जंगलतोड आणि त्यामुळे होणारा जमिनीचा ऱ्हास, औद्योगिक क्षेत्रामधून उत्सर्जति केले जाणारे हरीतगृह वायू ज्यामुळे झालेली जागतिक तापमानवाढ आणि याचे जागतिक पर्यावरण आणि हवामानावर झालेले दुष्परिणाम, वाढती लोकसंख्या, औद्योगिक क्षेत्राची वाढ, शहरीकरण इत्यादीमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा वेगाने ऱ्हास होत आहे आणि याच्या परिणामस्वरूप जगभर विविध प्रकरच्या आपत्तींमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. साधारणत: नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे आपत्तींचे वर्गीकरण केले जाते. सद्य:स्थितीमध्ये जगभर आपत्तीमध्ये वाढ झालेली आहे आणि याला मानवनिर्मित घटक सर्वाधिक जबाबदार आहेत, असा एक मतप्रवाह आहे. जर आपत्तीची वारंवारता कमी करायची असेल तर शाश्वत विकासाच्या प्रक्रियेला अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. जागतिक स्तरावर आणि भारतातही यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत.

All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण
Prohibition of new investment flow in ETFs that have investments abroad
परदेशात गुंतवणूक असणाऱ्या ‘ईटीएफ’मध्ये नवीन गुंतवणूक ओघाला प्रतिबंध; ‘सेबी’च्या फर्मानाची १ एप्रिलपासून अंमलबजावणी

२०१३ ते २०१७मध्ये झालेल्या पाच मुख्य परीक्षांमध्ये या घटकावर प्रत्येक वर्षी एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि हे प्रश्न खालीलप्रमाणे होते –

आपत्तीपूर्व व्यवस्थापनेसाठी असुरक्षितता आणि आपत्तीपूर्व व्यवस्थापन जोखीम मूल्यमापन किती महत्त्वाचे आहे? प्रशासक या नात्याने तुम्ही आपत्ती व्यवस्थापन पद्धतीमधील कोणत्या मुख्य क्षेत्रावर लक्ष द्याल?         (२०१३)

दुष्काळाला त्याचा स्थानिक विस्तार (Spaital Expanse), ऐहिक कालावधी (Temporal Duration), संथ सुरुवात आणि पीडित वर्गावरील स्थायी स्वरूपातील प्रभाव या दृष्टीने आपत्ती म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (NDMA) च्या सप्टेंबर २०१०च्या मार्गदर्शक सूचना ध्यानात घेऊन, भारतामध्ये एल निनो (El Nino) आणि ला निनो (La Nino)च्या संभाव्य दुष्परिणामांना सामोरे जाण्यासाठीच्या यंत्रणा सज्जतेची चर्चा करा. (२०१४)

भारतीय उपखंडामध्ये भूकंपाच्या वारंवारतामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. असे असूनही, त्याचा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने भारतातील तयारीमध्ये लक्षणीय उणिवा दिसून येतात. विविध पलूंची चर्चा करा.  (२०१५)

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (NDMA) मार्गदर्शक तत्त्वाच्या संदर्भात, अलीकडेच उत्तराखंडमध्ये ढगफुटीच्या अनेक घटना घडल्या याचा प्रभाव कमी करण्यासाठी अवलंबल्या जाणाऱ्या उपायांची चर्चा करा. (२०१६)

२००४मध्ये आलेल्या त्सुनामीने भारतासह चौदा देशामध्ये हाहाकार माजवला होता. त्सुनामी घडून येण्यासाठी जबाबदार असणारी कारणे आणि यामुळे जनजीवन व अर्थव्यवस्थेवर पडणाऱ्या परिणामांची चर्चा करा.  ठऊटअ च्या २०१०च्या मार्गदर्शक तत्त्वाच्या संदर्भात अशा प्रकारच्या घटना दरम्यान जोखीम कमी करण्यासाठी तयार असणार्या यंत्रणेचे वर्णन करा. (२०१७)

उपरोक्त स्वरूपाचे प्रश्न या घटकावर विचारण्यात आलेले आहेत. या प्रश्नांची आपण थोडक्यात उकल करून घेऊ या. या घटकावर प्रश्न विचारताना संकल्पनात्मक पलूंचा अधिक विचार केलेला दिसून येतो आणि प्रश्नाचे स्वरूप सामान्यत:  विश्लेषणात्मक पद्धतीचे आहे. या प्रश्नाची योग्य उकल करण्यासाठी सर्वप्रथम या घटकाची मूलभूत माहिती असणे महत्त्वाचे आहे. आपत्ती, आपत्ती व्यवस्थापन, आपत्तीपूर्व व्यवस्थापन, आपत्तीप्रभाव कमी करण्याच्या उपयायोजना, भूकंप, दुष्काळ व एल निनो आणि ला निनो या हवामानविषयक संकल्पनाची योग्य माहिती असल्याशिवाय प्रश्नाचा नेमका कल ओळखता येऊ शकत नाही. हा घटक व्यवस्थित समजून घेण्यासाठी पर्यावरण आणि हवामान याविषयाशी संबंधित संकल्पनाची माहिती असणे गरजेचे आहे, हे वरील प्रश्नावरून दिसून येते. तसेच २०१५मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच या योजनामध्ये असणाऱ्या उणिवा यासारखा धोरणात्मक पद्धतीवर भाष्य करणार आहे. याचबरोबर २०१६ आणि २०१७ मधील प्रश्न राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा संदर्भ ढगफुटी आणि त्सुनामी यांसारख्या घटनांशी जोडून विचारण्यात आलेले आहेत. या प्रश्नाचे योग्य आकलन करण्यासाठी सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, आपत्ती निवारणासाठीचे प्रयत्न, आपत्तीची योग्य हाताळणी करण्यासाठीची तयारी इत्यादी बाबींचा सर्वकष पद्धतीने विचार केल्याशिवाय समर्पक उत्तर लिहिता येत नाही, म्हणून हा घटक मूलभूत ज्ञानासह चालू घडमोडीचा आधार घेऊन अभ्यासावा लागणार आहे हे उपरोक्त प्रश्नावरून समजते.

या घटकासाठी नेमके कोणते संदर्भ वापरावेत याची आपण थोडक्यात माहिती घेऊ. या घटकासाठी एन.सी.ई.आर.टी अथवा सी.बी.एस.ई. बोर्डाची शालेय पुस्तके सर्वप्रथम वाचावीत, ज्याधून या घटकाची मूलभूत माहिती आपणाला मिळते. बाजारात या घटकासाठी अनेक गाइड्स स्वरूपात पुस्तके उपलब्ध आहेत, यातील जे पुस्तक सोप्या पद्धतीने या घटकाची माहिती देईल ते वाचावे. उदाहरणार्थ आर. गोपालन लिखित Environmental Studies हे पुस्तक, यामध्ये आपत्ती व्यवस्थापन संबंधित प्रकरण आहे. हा घटक पर्यावरण आणि हवामान याच्याशी अधिक संबंधित आहे आणि यातील महत्त्वाच्या संकल्पना समजून घेण्यासाठी पी. डी. शर्मा लिखित Ecology and Environment पुस्तक अभ्यासावे. या घटकासंबंधी चालू घडामोडीचा अभ्यास करण्यासाठी द हिंदू आणि इंडियन एक्स्प्रेस ही इंग्रजी दैनिके, योजना, कुरुक्षेत्र ,डाऊन टू अर्थ आणि वर्ल्ड फोकस ही मासिके, तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या संकेतस्थळांचा वापर करावा. या पुढील लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर तीनमधील सुरक्षा या घटकाची चर्चा करणार आहोत.