आजच्या लेखामध्ये आपण ‘मानवी भूगोल’ या विषयातील लोकसंख्या भूगोल, वसाहत भूगोल आणि आर्थिक भूगोल या घटकांची परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त तयारी कशी करावी याची महत्त्वाची माहिती घेणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने या विषयाच्या अभ्यासाचे नियोजन करताना सर्वप्रथम या विषयामधील घटकाची माहिती असणे महत्त्वाचे असते. गतवर्षीच्या प्रश्नांच्या विश्लेषणावरून आपणाला सर्वाधिक प्रश्न कोणत्या घटकावर विचारण्यात आलेले आहेत याची माहिती मिळते. पहिल्या लेखामध्ये आपण मानवी भूगोलामधील समाविष्ट असणाऱ्या घटकांचा तसेच या घटकामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश असतो याची माहिती घेतलेली आहे. आजच्या लेखामध्ये या घटकाचे परीक्षाभिमुख अभ्यासाच्या दृष्टीने नियोजन कशा प्रकारे करावे, याचबरोबर या घटकावर गेल्या चार मुख्य परीक्षांमध्ये (२०१३-२०१६) कशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आलेले होते इत्यादी बाबींचा एकत्रित विचार करून सखोल चर्चा करणार आहोत.

मानवी भूगोल या घटकावर २०१३मध्ये तीन, २०१४ मध्ये पाच, २०१५ मध्ये सहा आणि २०१६ मध्ये पाच प्रश्न विचारण्यात आलेले होते. यातील बहुतांश प्रश्न हे आर्थिक भूगोल या घटकाशी संबंधित होते.

२०१३ मध्ये ‘भारतातील सुती उद्योग अत्यंत विकेंद्रित आहे, यासाठीच्या घटकांचे विश्लेषण करा.’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाची योग्य उकल होण्यासाठी काही गोष्टींची माहिती करून घेणे गरजेचे आहे.  भारताची प्राकृतिक रचना आणि भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांतील पोषक वातावरण, कच्च्या मालाची उपलब्धता इत्यादीविषयी मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे. या घटकामुळे भारतातील सुती उद्योग कशा पद्धतीने विकेंद्रित झालेला आहे . याचे सोदाहरण विश्लेषण उत्तरामध्ये देणे अपेक्षित होते.

२०१४ मध्ये ‘नैसर्गिक संसाधनाने समृद्ध म्हणून नावारूपाला येणाऱ्या आफ्रिकेमधील आर्थिक क्षेत्रामध्ये भारत स्वतचे स्थान कशा प्रकारे पाहतो?’ हा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचा कल हा भारताच्या आफ्रिकेविषयी एकत्रित आखल्या गेलेल्या धोरणाचा भाग आहे.  येथे भारताने आफ्रिका खंडामधील विविध देशांसोबत भारताने स्थापन केलेले संबंध, त्यातून होणारा भारताचा फायदा या मुद्दय़ांसोबतच आफ्रिका खंड हा नैसर्गिक संसाधनाने समृद्ध असलेला खंड आहे इत्यादी महत्त्वाच्या पलूंचा एकत्रित विचार करून आफ्रिकेमधील आर्थिक क्षेत्रामध्ये भारत स्वतचे स्थान कशा प्रकारे पाहतो याची चर्चा करणे महत्त्वाचे होते.

२०१५मध्ये ‘भारतातील स्मार्ट शहरे, स्मार्ट खेडय़ाशिवाय शाश्वत होऊ शकत नाहीत. या विधानाची ग्रामीण व नागरी एकत्रीकरणाच्या पाश्र्वभूमीवर चर्चा करा.’ हा प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न भारत सरकारने आखलेल्या स्मार्ट शहरे धोरणाशी संबंधित आहे. हा प्रश्न भारतातील नागरीकरण आणि ग्रामीण विकास या प्रक्रियेला आधारभूत मानून विचारण्यात आलेला होता. या प्रश्नांची योग्य उकल होण्यासाठी स्मार्ट शहरे ही संकल्पना नेमकी काय आहे आणि स्मार्ट शहरे ही नेमकी कशी असणार आहेत, याचा संबंध ग्रामीण भारतातील खेडय़ासोबत कशा प्रकारे येणार आहे हे जाणून घेतलं पाहिजे. जर स्मार्ट शहरे ही शाश्वत करावयाची आहेत तर यासाठी स्मार्ट खेडय़ाची आवश्यकता का गरजेची आहे?  तसेच भारतातील खेडी स्मार्ट बनविण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत? आणि यामुळे ग्रामीण व नागरी एकत्रीकरणाची प्रक्रिया कशी सुरू झालेली आहे हा या प्रश्नाचा मुख्य रोख होता. त्याआधारेच लिहिलेले उत्तर अपेक्षित होते.

२०१६ मध्ये ‘सिंधू नदी पाणी करार (Indus Water Treaty) याची माहिती द्या आणि बदलत्या द्विपक्षीय संबंधांच्या पाश्र्वभूमीवर याचे पर्यावरणीय, आर्थिक आणि राजकीय परिणामाचे परीक्षण करा.’ हा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे सरळ दोन भाग पडतात – यातील पहिला भाग सिंधू नदी पाणी करार व यातील तरतुदी याची माहिती आणि दुसरा भाग सद्यस्थितीमधील भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध. हा प्रश्न चालू घडामोडींशी संबंधित आहे. येथे प्रामुख्याने सिंधू नदीशी संबंधित प्राकृतिक माहिती आणि या दोन देशांमधील संबंध या दोन्हीची सांगड घालून जर हा करार मोडीत निघाला अथवा यामध्ये काही एकतर्फी बदल केले गेले तर याचे नेमके परिणाम काय होऊ शकतात, तसेच हा प्रश्न भूगोल या घटकाशी संबंधित असल्यामुळे येथे पर्यावरणीय परिणामाची चर्चा अधिक करणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाचे आकलन करून उत्तर लिहिणे क्रमप्राप्त होते.

याव्यतिरिक्त भारतातील साखर उद्योग, आण्विक ऊर्जा निर्माण करण्यासाठी भारतामध्ये आणि जगामध्ये लागणाऱ्या कच्च्या मालाची उपलब्धता, पूर्व भारतातील हरितक्रांती, जगामधील लोखंड आणि पोलाद उद्योगामधील स्थानिक प्रारूपातील बदल, भारतामधील अंतर्गत जल वाहतूक, भारतातील पाणलोट विकास इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते. या घटकाशी संबंधित बहुतांश प्रश्न हे भारताच्या आर्थिक भूगोलशी संबंधित आहेत, तसेच काही प्रश्न ‘भारत व जगाचा मानवी भूगोल’ यांचा एकत्रित विचार करून विचारण्यात आलेले आहेत. एकूणच विद्यार्थ्यांला या विषयाचे पारंपरिक ज्ञान, यातील महत्त्वाच्या संकल्पना, यासंबंधीच्या चालू घडामोडी इत्यादीची योग्य माहिती असायला हवी. या विषयाच्या सर्व घटकाची मूलभूत माहिती सर्वप्रथम अभ्यासावी. त्यासाठी आपणाला एनसीईआरटीच्या Fundamentals of Human Geography (XII), Indian People and Economy. (XII), या क्रमिक पुस्तकाचा आधार घेता येतो, ज्यामुळे या विषयाचे सरळ व सोप्या भाषेत आकलन करता येऊ शकते आणि या विषयाची सर्वकष तयारी करण्यासाठी  Certificate physical and Human Geography (by Goe Cheng Leong), India-Comprehensive Geography ( by D.R. Khullar), World Geograhy (by Majid Husain) यासारख्या संदर्भग्रंथाचा आधार घेता येऊ शकतो. तसेच या विषयाशी संबंधित चालू घडामोडीचा अभ्यास करण्यासाठी आघाडीचे इंग्रजी वर्तमानपत्र उदा. द हिंदू आणि योजना व कुरुक्षेत्र यांसारख्या मासिकांमधील लेखांचा अभ्यास करावा लागतो. या पुढील लेखामध्ये भूगोल विषयाचा इतर पेपरमधील अभ्यासक्रमासोबत येणाऱ्या संबंधाविषयी चर्चा करणार आहोत.