पूर्व परीक्षेमधील महत्त्वपूर्ण बदल यूपीएससीने २०११पासून पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केलेला आहे. पूर्व परीक्षेसाठी एकूण दोन पेपर आहेत आणि प्रत्येक पेपर हा २०० गुणांचा असून, यातील पहिल्या पेपरमध्ये १०० प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला २ गुण असतात. तसेच चुकीचा पर्याय निवडल्यास पेनल्टी मार्क्स असतात. उदाहरणार्थ एका प्रश्नासाठी .३३ अशा पद्धतीने एकूण मिळविलेल्या मार्क्समधून पेनल्टी मार्क्स (दंडात्मक गुण)कापले जातात. याचबरोबर २०१५ पासून यूपीएससीने पूर्व परीक्षेमध्ये परीक्षा उतीर्ण होण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बदल केलेला आहे, पेपर दोन हा क्वालिफाियग केलेला आहे (एकूण ८० प्रश्न आणि प्रत्येक प्रश्न २.५ गुणांसाठी असतो.) ज्यामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी कमीतकमी एकूण गुणांपकी ३३% मार्क्स प्राप्त करणे अनिवार्य आहे. या पेपरमध्येही चुकीचा पर्याय निवडल्यास एका प्रश्नासाठी .३३ अशा पद्धतीने एकूण मिळविलेल्या गुणांमधून पेनल्टी मार्क्स कापले जातात. तसेच या पेपरचे गुण मेरीट ठरविण्यासाठी ग्राह्य़ धरले जात नाहीत. पहिल्या पेपरमध्ये प्राप्त केलेल्या गुणांवरून अंतिम गुणवत्ता यादी ठरविली जाते. भारतीय इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ आजच्या लेखामध्ये आपण पूर्व परीक्षा पेपर पहिलामधील भारतीय इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ या घटकांची तयारी कशी करावी, याची चर्चा करणार आहोत. २०११ पासून ते २०१७ पर्यंत या घटकावर एकूण ११४ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत (वर्षनिहाय विचारण्यात आलेले प्रश्न - २०११ मध्ये १३ प्रश्न, २०१२ मध्ये १८ प्रश्न, २०१३ मध्ये १५ प्रश्न, २०१४ मध्ये २० प्रश्न, २०१५ मध्ये १८ प्रश्न, २०१६ मध्ये १६ प्रश्न, आणि २०१७ मध्ये १४ प्रश्न). या घटकामध्ये प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत व भारतीय राष्ट्रीय चळवळ तसेच भारतीय कला आणि संस्कृती इत्यादी विषयांचा समावेश आहे. प्रश्नांच्या संख्येवरून आपणाला या घटकाचा अभ्यास परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येते. आता आपण या घटकाची थोडक्यात उकल करून घेऊ या. हा घटक अभ्यासाच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे विभागता येऊ शकतो. ज्यामुळे आपणाला या विषयाचा परीक्षाभिमुख आवाका लक्षात घेऊन अभ्यासाच्या दृष्टीने योग्य नियोजन करता येऊ शकते. प्राचीन भारत प्राचीन भारताच्या इतिहासाचे महत्त्व आणि अभ्यासाची साधने, प्रागतिहासिक भारत, ताम्रपाषाण कृषी संस्कृती, सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, बौद्धयुग अथवा महाजनपदाचा कालखंड, मौय कालखंड, मौर्योतर कालखंड, गुप्त कालखंड आणि गुप्तोत्तर कालखंड इत्यादी. मध्ययुगीन भारत प्रारंभिक मध्ययुगीन कालखंड (इ.स. ७५०-१२००), दिल्ली सल्तनत, उत्तर भारतातील प्रादेशिक देशी सत्ता, विजयनगर साम्राज्य, बहामनी राजघराणे, मुघल साम्राज्य, मराठा कालखंड आणि मध्ययुगीन भारतातील धार्मिक चळवळी इत्यादी. आधुनिक भारत व भारतीय राष्ट्रीय चळवळ युरोपियनांचे आगमन आणि ब्रिटिशसत्तेची भारतात स्थापना, ब्रिटिशसत्तेचा भारतावरील परिणाम, ब्रिटिशसत्तेच्या विरोधातील उठाव, १९व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी, शिक्षण आणि वृतपत्रे यांची वाढ आणि विकास, भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ, क्रांतिकारी चळवळी, कामगार चळवळ, भारतातील सांप्रदायिकतेची वाढ, गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय, भारतातील घटनात्मक विकास, महत्त्वपूर्ण व्यक्ती इत्यादी. भारतीय कला आणि संस्कृती भारतीय स्थापत्यकला आणि शिल्पकला, भारतीय चित्रकला, भारतीय संगीत, नृत्य आणि नाटय़, भारतीय साहित्य, भारतीय हस्तकला इत्यादींशी संबंधित अभ्यास करावा लागतो. तसेच या घटकाशी संबंधित चालू घडामोडींची माहिती असणे गरजेचे आहे. उदा - विविध पुरस्कार, सांस्कृतिक वारसा जतन करणाऱ्या संस्था, याच्याशी संबंधित सरकारी ध्येयधोरणे व योजना इत्यादी. सर्वसाधारणपणे आपणाला उपरोक्त पद्धतीने या घटकाची विभागणी करून अभ्यासाचे नियोजन करता येऊ शकते. यातील नेमका कोणता भाग परीक्षेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे, याचे आकलन आपणाला गतवर्षीय परीक्षांमध्ये या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून लक्षात येते. या घटकाची व्याप्ती खूप मोठी आहे. तसेच याचे स्वरूप पारंपरिक पद्धतीचे आहे. त्यामुळे हा घटक सर्वप्रथम सखोल पद्धतीने अभ्यासणे गरजेचे आहे आणि त्यानंतर या घटकावर स्वतच्या उजळणी स्वरूपातील नोटस तयार कराव्यात, जेणेकरून हा घटक कमीतकमी वेळेमध्ये परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासता येऊ शकतो. सर्वसाधारणपणे या घटकामध्ये प्राचीन भारत, आधुनिक भारत, भारतीय कला आणि संस्कृती यावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. तसेच गतवर्षीय परीक्षामधील प्रश्नांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, भारतीय कला आणि संस्कृती यांवर अधिक प्रश्न विचारण्यात येऊ लागलेले आहेत. त्यामुळे हा भाग व्यवस्थित अभ्यासणे गरजेचे आहे. या घटकावर ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाची स्थळे, सामाजिक आणि आíथक संबंधित घडामोडी आणि संकल्पना, राजकीय घडामोडी, व्यक्ती संबंधित माहिती, साहित्य, विविध कला इत्यादींशी संबंधित वस्तुनिष्ठ पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि अशा प्रकारच्या प्रश्नांची संख्या अधिक असते. तसेच विश्लेषणात्मक प्रश्न विचारले जातात, पण यांची संख्या तुलनेने कमी असते. त्यामुळे हा घटक अभ्यासताना वस्तुनिष्ठ माहितीचा अचूक अभ्यास करणे गरजेचे आहे. चुकीच्या पर्यायांसाठी पेनल्टी मार्क्स असल्यामुळे अचूक पद्धतीने अभ्यास करणे अपरिहार्य बनलेले आहे. या घटकासाठी एन.सी.ई.आर.टी. बोर्डाची शालेय पुस्तके सर्वप्रथम वाचावीत. ज्यामधून या घटकाची मूलभूत माहिती आपणाला मिळते. बाजारात या घटकासाठी अनेक गाइडस स्वरूपात पुस्तके उपलब्ध आहेत. यातील नेमकी कोणती पुस्तके या घटकाची परीक्षाभिमुख तयारी करण्यासाठी महत्त्वाची आहेत, याची माहिती असणे गरजेचे आहे. उपरोक्त नमूद प्रत्येक भागाची आपण पुढील लेखामध्ये चर्चा करणार आहोत. यामध्ये गतवर्षीय परीक्षांमधील प्रश्नांचा आढावा व संबंधित विषयाचा मूलभूत अभ्यास करण्यासाठी एन.सी.ई.आर.टी.ची कोणत्या वर्गाची पुस्तके वाचावीत. तसेच संबंधित विषय अधिक सखोल आणि सर्वागीण पद्धतीने अभ्यासण्यासाठी कोणती संदर्भग्रंथ अभ्यासावीत याची सविस्तर माहिती घेणार आहोत. तसेच यातील आधुनिक भारत आणि भारतीय कला आणि संस्कृती हा भाग मुख्य परीक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. त्यामुळे याचा अधिक सखोल आणि सर्वागीण अभ्यास करणे गरजेचे आहे. या पुढील लेखामध्ये आपण प्राचीन भारत या घटकाचा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा सर्वागीण आढावा घेणार आहोत.