बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी

संस्थेची ओळख

गंगेच्या तीरावर वसलेले वाराणसी शहर हे केवळ आध्यात्मिकदृष्टय़ाच नव्हे, तर शैक्षणिक क्षेत्राच्या दृष्टीनेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्याला कारण ठरते, ते तेथील बनारस हिंदू विद्यापीठ हे केंद्रीय विद्यापीठ. यंदाच्या नॅशनल इन्स्टिटय़ूशनल रँकिंग फ्रेमवर्क क्रमवारीमध्ये हे विद्यापीठ देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्वातंत्र्यसेनानी पंडित मदनमोहन मालवीय यांच्या स्वप्नांचे मूर्तरूप म्हणूनही या विद्यापीठाचा विचार केला जातो. मालवीय यांनी १९०४ मध्ये पहिल्यांदा या विद्यापीठाविषयीची आपली योजना समाजासमोर मांडली होती. त्या आधारे १९०५ मध्ये या विद्यापीठाच्या स्थापनेसाठीचा लिखित प्रस्ताव तयार झाला. विद्यापीठाच्या उभारणीसाठी म्हणून त्या काळात एक कोटी रुपये निधी गोळा करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवत मालवीय यांनी आपल्या कामाला सुरुवात केली होती. देशभरातील संस्थानिकांसोबतच सामान्य जनतेकडूनही त्यांनी या विद्यापीठाच्या निर्मितीसाठी निधी गोळा केला. डॉ. अ‍ॅनी बेझंट यांनी सेंट्रल हिंदू कॉलेजची सूत्रे मालवीय यांच्याकडे सुपूर्द करत त्यांच्या या कामाला मौलिक मदत केली होती. या विद्यापीठाच्या स्थापनेसाठी आवश्यक कायद्याचा मसुदा १९१५ मध्ये तत्कालीन राज्यकर्त्यांसमोर मांडण्यात आला. त्याला मान्यता मिळाल्यावर १९१६ पासून हे विद्यापीठ खऱ्या अर्थाने कार्यरत झाले. सुरुवातीपासूनच हे विद्यापीठ निवासी विद्यापीठ म्हणून पुढे आले. या विद्यापीठामध्ये केवळ शिक्षणावर भर न देता विविध विषयांचा एकत्रितपणे विचार आणि त्याला अध्यात्माची जोड देण्यासाठीच्या सुविधा विकसित होत गेल्या. वर्ष २०१५-१६ मध्ये शताब्दी वर्ष पूर्ण केलेल्या या विद्यापीठामध्ये भारतीय इतिहास, संस्कृतीच्या बरोबरीनेच विज्ञान- तंत्रज्ञान- आरोग्य विज्ञानाच्या अद्ययावत ज्ञानाचा विद्यार्थी आणि संशोधकांकडून होत असलेला पाठपुरावा आता एक नित्याचीच बाब ठरली आहे.

संकुल आणि सुविधा

‘मधुर मनोहर अतीव सुंदर, ये सर्व विद्या की राजधानी’ या विद्यापीठ गीतामध्ये या विद्यापीठाच्या परिसराचेही वर्णन केले आहे. गंगेच्या किनारी वसलेल्या वाराणसीमध्ये जवळपास तेराशे साठ एकरांवर या विद्यापीठाचे मुख्य संकुल साकारले आहे. तसेच, मिर्झापूर जिल्ह्यामध्ये बरकछ्छा येथे असणारे विद्यापीठाचे २७०० एकरांचे शैक्षणिक संकुल राजीव गांधी दक्षिण परिसर म्हणून ओळखले जाते. निवासी विद्यापीठ अशी सुरुवातीपासूनच ख्याती असणाऱ्या या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसाठी म्हणून मोठय़ा संख्येने वसतीगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याआधारे हजारो विद्यार्थी या विद्यापीठामध्ये राहून शिकत आहेत. विद्यापीठाच्या आवारात असलेले आणि एक लाखांहून अधिक वस्तूंनी संपन्न असे भारत कला भवनह्ण हे संग्रहालय अनेक संशोधक आणि अभ्यासकांसाठी महत्त्वाचे ठरते. विद्यापीठाचे सयाजीराव गायकवाड ग्रंथालयह्ण देशभरातील विद्यपीठांमधील सर्वात मोठे ग्रंथालय म्हणूनही ओळखले जाते. विद्यापीठाचे हे ग्रंथालय दृष्टिहिनांसाठीही विशेष सुविधा पुरविते. विद्यापीठाच्या सायबर लायब्ररीमध्ये चारशेहून अधिक विद्यार्थ्यांना एकाच वेळी अभ्यास करण्यासाठीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

शैक्षणिक विस्तार

पाच स्वतंत्र इन्स्टिटय़ूट्स, एक आयआयटी, १६ विद्याशाखा, जवळपास १४० विभाग, ४ आंतरविद्याशाखीय केंद्र या माध्यमातून बनारस हिंदू विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्याचा सातत्यपूर्ण विस्तार होत आहे. तसेच, एक महिला महाविद्यालय, जवळपास एक हजार रुग्णांची एकाच वेळी सोय होऊ  शकेल इतक्या सोयीसुविधा पुरविणारे विद्यापीठाचे स्वतंत्र हॉस्पिटलही या विद्यापीठाचा भाग आहेत. वाराणसीमधील चार कॉलेज आणि तीन शाळा या विद्यापीठाशी संलग्न आहेत. कला विद्याशाखेपासून या विद्यापीठाची सुरुवात झाली. सध्या ही विद्याशाखा २१ विभाग आणि पाच आंतरविद्याशाखीय केंद्राद्वारे आपले शिक्षण प्रसाराचे कार्य पूर्ण करत आहे. त्याशिवाय, समाजविज्ञान, वाणिज्य, संस्कृत विद्या- धर्म विज्ञान, दृष्यकला, संगीत- मंचकला, विधी, शिक्षण या विषयांना वाहिलेल्या स्वतंत्र विद्याशाखाही या विद्यापीठामध्ये आहेत. या विद्याशाखांमध्ये आंतरविद्याशाखीय अभ्यास केंद्रांचा समावेश हे या विद्यापीठाचे एक वैशिष्टय़ मानले जाते. विद्यापीठाच्या इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये तीन विद्याशाखांचे काम चालते. त्यामध्ये आधुनिक चिकित्सेशी संबंधित ३६ विभाग, आयुर्वेद चिकित्सेशी संबंधित १५ विभाग, दंतचिकित्सा विद्याशाखेंतर्गत येणाऱ्या विभागांचा समावेश होतो. कृषी विज्ञान केंद्राच्या १२ विभागांमधून कृषी क्षेत्राशी अध्यापन आणि संबंधित संशोधने चालतात. विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेंतर्गत एकूण बारा विभाग, चार केंद्रे आणि दोन आंतरविद्याशाखीय केंद्रांचा समावेश होतो. विद्यापीठांतर्गत येणारे बनारस इंजिनीअरिंग कॉलेज, कॉलेज ऑफ मायनिंग अ‍ॅण्ड मेटलर्जी, कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी या तीन महत्त्वाच्या कॉलेजच्या एकत्रीकरणातून औद्योगिक केंद्राची सुरुवात झाली. २०१२ मध्ये या संस्थेला स्वतंत्र अशा आयआयटी, वाराणसी- बनारस हिंदू विद्यापीठ म्हणून मान्यता मिळाली. सध्या स्वतंत्र संस्था काम करत असलेली ही संस्था या विद्यापीठाचाच एक महत्त्वाचा भाग मानला जाते. गंगा नदी विकास आणि जलस्रोत व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील कामांसाठी मालवीय संशोधन केंद्र, मालवीय सेंटर ऑफ एक्सेलन्स फॉर क्लायमेट चेंज ही नव्याने उभारण्यात आलेली अद्ययावत संशोधन केंद्रेही या विद्यापीठातील उल्लेखनीय बाबी मानल्या जातात. अशा सर्व विद्याशाखा, विभाग आणि केंद्रांमधून या विद्यापीठाचे नियमित पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविले जातात. त्याशिवाय हे विद्यापीठ जवळपास ६० पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमही चालविते. त्यापैकी काही अभ्यासक्रमांना विद्यार्थी बारावीनंतरही प्रवेश घेऊ  शकतात. या अभ्यासक्रमांचे पूर्णवेळ तसेच अर्धवेळ स्वरूप हे अशा सर्वच अभ्यासक्रमांकडे विद्यार्थी आकृष्ट होण्यासाठीचे एक कारण ठरत आहे.

borateys@gmail.com