फारूक नाईकवाडे

राज्यातील ७० हजारपेक्षा जास्त पदे रिक्त असल्याचे समोर आल्यावर महाभरतीची घोषणा झाली आणि त्यामध्ये राज्यसेवा परीक्षा २०१९ची जाहिरातही आली. एकून ३३९ राजपत्रित पदांसाठीची जाहिरात म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या प्राधान्यक्रमात सध्या राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी हा विषय असेल. जाहिरातीमध्ये उल्लेखित ३३९ ही पदसंख्या उमेदवारांसाठी निश्चितच आश्वासक असली तरीही त्याचा जास्त विचार न करता, अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. ‘पदसंख्येत व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे,’ असा उल्लेख प्रत्येक वर्षीच्या जाहिरातीत असतोच. कोणत्याही आरक्षित जागांसाठीच्या कट ऑफमध्ये २ ते ५ गुणांपेक्षा जास्त फरक पडत नाही आणि काही प्रवर्गासाठी तर उलटी स्थिती आहे म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गापेक्षा जास्त कट ऑफ!. सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्ग हा या वर्षीच्या राज्यसेवा परीक्षेतील नवीन आरक्षण प्रवर्ग. त्याबाबत न्यायालयीन निवाडे, शासनाचे विभाग आणि एमपीएससी यांची परिपत्रके, निर्णय यांमुळे काहीसे गोंधळाचे वातावरण आहे. मात्र हा गोंधळ फक्त फॉर्म भरण्यापुरता मर्यादित ठेवून योग्य पद्धतीने चर्चा करून आपापले अर्ज भरले की अभ्यासाला लागले पाहिजे. पूर्व-मुख्य-मुलाखत ही साधारणपणे वर्षभर चालणारी परीक्षा प्रक्रिया संपता-संपता पदसंख्येत वाढ होते, हा नेहमीचा अनुभव आहे. तेव्हा पदसंख्या कमी किंवा जास्त याचा विचार न करता आपण स्पर्धेत किती समर्थपणे उतरू शकतो आणि स्पर्धा जिंकू शकतो हाच आपल्या चिंतेचा आणि प्रयत्नांचा भाग असला पाहिजे.

एप्रिलमध्ये होऊ शकेल असा अंदाज असताना पूर्व परीक्षा फेब्रुवारीमध्ये होत आहे. तयारीच्या वेळेभावी काही उमेदवारांनी राज्यसेवेचा पर्याय बाजूला ठेवून महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्तपूर्व परीक्षेची पूर्णवेळ तयारीचा मानस बोलून दाखविला. मागच्या वर्षी वेळ मुबलक होता, पण पदसंख्या कमी होती म्हणून काहींनी राज्यसेवेचा पर्याय बाजूला ठेवला होता. उपलब्ध वेळ, कमी पदसंख्या, आरक्षणाची उपलब्धता ही परीक्षा टाळण्याची किंवा नाकारण्याची कारणे होऊ शकत नाहीत. आपण पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवार आहोत तर प्रत्येक परीक्षा ही संधी मानली पाहिजे. स्पर्धेत टिकण्यासाठी, चार्ज होण्यासाठी व पुढे जाण्यासाठी नियमित अभ्यास आणि परीक्षांच्या माध्यमांतून नियमित प्रयत्न आवश्यक आहेत.

सन २०११नंतर आयोगाच्या परीक्षा प्रक्रियापद्धतीत झालेला सकारात्मक आणि महत्त्वाचा बदल म्हणजे दर वर्षी नियमितपणे जाहिरात प्रसिद्ध होते आणि वेळापत्रकाप्रमाणे दरवर्षी परीक्षा होते. पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाची एक परीक्षा म्हणजे अभ्यासाची पंचवार्षिक योजना असे विनोदाने म्हटले जायचे. नियमित परीक्षांच्या आयोजनामुळे लाखो उमेदवारांना एक नवा विश्वास मिळाला आहे. त्यामुळे कसलीही कारणे किंवा सबबी न देता परीक्षांची संधी घेतली पाहिजे. त्याची तशी तयारीही केली पाहिजे.

अभ्यासाचे नियोजन करताना, इथून पुढे महिन्यांचे, आठवडय़ांचे गणित न घालता, दिवसांचे व तासांचे गणित आखले पाहिजे. उपलब्ध वेळ, घटक विषयांपैकी सोपे-अवघड किंवा कमी सोपे-कमी अवघड वा जास्त सोपे-जास्त अवघड विषयानुरूप वेळेची विभागणी आणि योग्य अभ्यास साहित्याची निवड या बाबींचा मेळ बसवावा लागेल. मागील दोन-तीन वर्षांपासून अभ्यासात असलेल्या उमेदवारांना योग्य आणि उपयुक्त अभ्यास साहित्याची निवड करायला जास्त श्रम घ्यावे लागत नाहीत. त्यांना नेमक्या आणि उपयुक्त स्टडी मटेरिअलची चांगली समज असते. तेव्हा नव्या उमेदवारांनी अशा अचूक मार्गदर्शनासाठी ‘सिनियर्स’ ची जरूर मदत घ्यावी.

दरवर्षी परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांत, जुन्या म्हणजेच रिपीटर्स अर्थात सिनियर उमेदवारांची संख्या जास्त असते. तुलनेत पहिलाच प्रयत्न असणाऱ्या नव्या उमेदवारांची संख्या त्या मानाने कमी असते. एक-दोन-तीन किंवा त्यापेक्षा कमी-जास्त प्रयत्नांचा अनुभव असणाऱ्या अशा उमेदवारांचे अभ्यासाच्या रणनीतीबद्दल स्वत:चे काही आडाखे असतात.

कोणत्या घटक विषयाला जास्त महत्त्व द्यावे, कोणत्या संदर्भ पुस्तकांना हाताळावे, कोणत्या पुस्तकातून कोणता भाग अभ्यासावा,

याविषयी नेमके धोरण असते. एक-दोन परीक्षांतील यश किंवा अपयशाच्या अनुभवातून प्राप्त झालेले हे ज्ञान फार मोलाचे असते, आणि ते उपयुक्तही ठरते. पण स्पर्धा परीक्षांचा योग्य दृष्टिकोन विकसित झाला असेल तरच या दृष्टिकोनाच्या निकषावर बेतलेले पूर्वानुभवाचे ज्ञान फायद्याचे ठरेल. नाही तर अनुभव शिकण्यासाठी परीक्षेच्या एका संधीवर पाणी सोडावे लागेल. म्हणून योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.

अभ्यास धोरण ठरवताना मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण महत्त्वाचे असते. मागील काही वर्षांच्या प्रश्नांच्या अभ्यासातून, तुम्हाला ‘कसा अभ्यास करू’ या प्रश्नाचे उत्तर मिळत जाईल, कळत जाईल. म्हणून प्रश्नपत्रिका विश्लेषण हा अभ्यासाचाच एक महत्त्वाचा भाग आहे. पुढील लेखापासून पूर्व परीक्षा प्रश्नांचे घटकवार विश्लेषण करून अभ्यास कसा करावा याची चर्चा करण्यात येईल.