अपर्णा दीक्षित

आजच्या लेखात आपण यूपीएससीच्या निबंधाच्या पेपरची नेमकी मागणी काय असते हे पाहणार आहोत. २०१७ मध्ये विचारल्या गेलेल्या विषयांची यादी पुढीलप्रमाणे-

Section – A

(1)    Alternative technologies for a climate change resilient India

(2)    A good life is one inspired by love and guided by knowledge

(3)    Poverty anywhere is a threat to prosperity everywhere

(4)    Management of Indian border disputes – a complex task

Section – B

(1)    Customary morality cannot be a guide to modern life

(2)    “The past’ is a permanent dimension of human consciousness and values

(3)    A people that values its privileges above its principles loses both

(4)    Reality does not conform to the ideal, but confirms it

वरील विषयांची यादी बघता असे लक्षात येते की, एकूणच विषय आव्हानात्मक आहेत. शाळा-कॉलेजमध्ये ज्याप्रमाणे निबंध विषयांची निवड केली जात असे, तशी निवड यूपीएससी करताना दिसत नाही. त्याचबरोबर सर्वच विषय भारताच्या संदर्भातच लिहायचे आहेत असे बंधन नाही. त्याबद्दल सविस्तर चर्चा करणे आवश्यक आहे.

२०१८मध्ये सर्व उमेदवारांना आश्चर्य वाटायला लावणारी बाब म्हणजे ‘विभाग ब’ हा पूर्णत: विचारांवर आधारित होता. तसेच हेच विचारसुद्धा गुंतागुंतीचे, सहज वाचनात न येणारे मात्र नागरी सेवा अधिकाऱ्याने खोलवर विचार करून मगच लिखाण करावेत असे होते. सर्वसाधारणत: सुविचारांवर आधारित, तत्त्वज्ञानाचा पाया असणारे, किंवा जे अमूर्त विषय असतात, ते विषय लिहिणे आव्हानात्मक असते. परंतु गुणांच्या बाबतीत हमखास परतावा देणारेही असतात. मात्र २०१८मध्ये हे आव्हान जास्तच कठीण झाल्याचे दिसून येते. या विषयांवर निबंध लिहीत असताना भारतातील उदाहरणे आणि संदर्भ देत असतानाच जागतिक स्तरावरील उदाहरणे आणि संदर्भही जरूर द्यावेत. ‘ब विभागा’कडे काळजीपूर्वक बघितल्यास असे लक्षात येते की, पहिला आणि दुसरा विषय सामान्य अध्ययन ४ म्हणजे नीतिशास्त्राच्या मदतीने हाताळता येईल तर तिसरा विषय समाजशास्त्रीयदृष्टय़ा म्हणजे सामान्य अध्ययन २ व ३ च्या मदतीने हाताळता येण्यासारखा आहे. अर्थात वर नमूद केल्याप्रमाणे विषयाचे आव्हान इतर वर्षांपेक्षा जास्त आहे हे निश्चित. याप्रकारच्या निबंधांमधून व्यक्ती म्हणून आपण कोण आहोत त्याची प्रगल्भता विविध उदाहरणे, दाखले, नमुने यातून देता येते. असे करत असताना साहित्य, चित्रपट, संगीत, जगाचा इतिहास या सगळ्यातले संदर्भ वापरत लिखाण समृद्ध करता येते.

याउलट सामान्य अध्ययनाशी निगडित ‘अ विभागा’तील विषय निवडत असताना एखाद्या विषयात आपण किती खोलवर जाऊ शकतो, विषयाची गुंतागुंत किती प्रगल्भ होणे उलगडून दाखवू शकतो याचा कस लागतो. हे निबंध शक्यतो भारतीय वास्तवाला धरून लिहावेत. चच्रेच्या अनुषंगाने जागतिक पातळीवरचे मुद्दे येण्यास हरकत नाही, मात्र आपल्या आजूबाजूच्या वास्तवाचे आपल्याला भान आहे हे दाखवण्यासाठीची, हा निबंध ही उत्तम संधी आहे.

भाषा व शैली

व्याकरणाच्या दृष्टीने योग्य, सुटसुटीत व प्रभावी वाक्ये कोणत्याही चांगल्या निबंधाचा महत्त्वाचे घटक असतात. सुटसुटीत भाषा म्हणजे बोलीभाषा नाही. यूपीएससीच्या परीक्षेमध्ये दिल्या जाणाऱ्या निबंध विषयांवर लेखन करताना मजकुराबरोबरच भाषेचीही प्रगल्भता दिसणे आवश्यक आहे.

एखाद्या मुद्दय़ाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कशा प्रकारे भर द्यावा, दोन वाक्यांमधील तर्कसंगती स्पष्ट करण्यासाठी कोणते शब्द वापरावेत, आपल्याजवळील माहितीचा वापर करून ठामपणे मत मांडत असताना अनावश्यक अधिकाराचा सूर कसा टाळावा या सर्व गोष्टी योग्य भाषेच्या वापरामधून साध्य होतात.

प्रगल्भ विचार व भाषा यांचा वापर म्हणजे केवळ जड व मोठय़ा शब्दांची खिरापत नाही. ज्या शब्दांच्या अर्थाबद्दल आपल्याला खात्री नाही, असे शब्द वापरणे टाळावे. तसेच मोठे, अलंकारिक शब्द वापरल्यामुळे आपले लिखाण दिखाऊ होत नाही ना याची काळजी घ्यावी. मात्र आपले लिखाण जर नैसर्गिकरीत्या गुंतागुंतीचे व अनेक पातळ्यांवर विश्लेषण करणारे असेल तर, शब्दांचा वापर आपोआपच अधिक प्रगल्भ होत जातो.

प्रत्येक वाक्य छोटे व सुटसुटीत असेल याची खबरदारी घ्यावी. वाक्य मोठे झाल्यास योग्य ठिकाणी स्वल्पविराम, अर्धस्वल्पविराम, विसर्ग चिन्हांचा योग्य वापर करावा. संपूर्ण अर्थबोध होऊ शकणार नाही इतकी मोठी वाक्य करण्याचे मुळातच टाळावे. खरेतर निबंधच नव्हे तर कोणतेही अर्थपूर्ण लेखन करण्याकरिता वरील बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.