मागील लेखामध्ये आपण प्राकृतिक भूगोल व पूर्वपरीक्षेमध्ये नकाशावाचनाचे महत्त्व या बाबींचा आढावा घेतला. प्रस्तुत लेखामध्ये भूगोल विषयातील सामाजिक व आर्थिक भूगोल या अभ्यासघटकांविषयी जाणून घेऊयात. आर्थिक व सामाजिक भूगोलाचा अभ्यास भारत व जगाच्या अनुषंगाने करावा. या घटकांच्या अभ्यासाचे नियोजन करताना यामध्ये कोणकोणते उपघटक समाविष्ट आहेत याची माहिती असणे क्रमप्राप्त आहे. गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास कोणत्या घटकावर अधिक प्रश्न विचारलेले आहेत याची माहिती मिळते. आर्थिक भूगोलामध्ये प्रामुख्याने मानवी आर्थिक प्रक्रिया व नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा अभ्यास केला जातो. राष्ट्रातील आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास करताना कृषी, उद्योग, सेवाक्षेत्र यांमधील सद्य:स्थिती, त्याबाबतचे सरकारी धोरण, योजना यांचा चालू घडामोडींच्या दृष्टिकोनातून आढावा घ्यावा. उदा. भारतातील दुसरी हरितक्रांती, मेक इन इंडिया इत्यादी. आर्थिक भूगोलावर पूर्वपरीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न पाहू - (२०१६) ‘खालीलपैकी कोणत्या प्रदेशात शेल गॅस संसाधने आढळतात.’ (१) बेसीन (२) कावेरी बेसीन (३) कृष्णा-गोदावरी बेसीन. (२०१४) - ‘सस्टेनेबल शुगरकेन इनिशिएटिव्हचे महत्त्व काय आहे?’ (२०१४) - ‘इंटिग्रेटेड वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्राम’च्या अंमलबजावणीचे फायदे काय आहेत?’ (२०१३) - ‘भारतातील खालीलपैकी कोणते उद्योग पाण्याचे अधिक उपभोक्ते आहेत?’ (१) अभियांत्रिकी (२) पेपर व पल्प (३) टेक्स्टाइल्स (४) औष्णिक ऊर्जा (२०१३) - (१) कापूस (२) भुईमूग (३) भात (४) गहू यांपैकी कोणती पिके खरीप आहेत? आर्थिक भूगोलाचा अभ्यास चालू घडामोडींच्या अनुषंगाने करणे हितावह ठरेल. उदा. गेल्या काही वर्षांमध्ये शेल गॅस या संसाधनाची चर्चा सुरू होती. त्या संदर्भामध्ये शेल गॅसवर आधारित २०१६मध्ये विचारलेला प्रश्न पाहता येईल. सामाजिक भूगोलामध्ये लोकसंख्या भूगोल, वसाहत भूगोल यांचा अभ्यास करावा लागतो. लोकसंख्या भूगोलामध्ये विविध लोकसंख्या शास्त्रीय घटक उदा. लोकसंख्यावृद्धी, वितरण, जन्मदर, मृत्यूदर, लिंग गुणोत्तर, कार्यकारी वयोगटातील लोकसंख्या, लोकसंख्या लाभांश, इ. घटकांची माहिती करून घ्यावी. यासोबतच स्थलांतराची कारणे, प्रकार, परिणाम, अभ्यासावे. भारताचे लोकसंख्या धोरण, लोकसंख्याविषयक महत्त्वाच्या संकल्पना, वंश, जमात, जात, धर्म, सांस्कृतिक प्रदेश, भाषा, इ. बाबींचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरते. वसाहत भूगोलामध्ये मानवाच्या ग्रामीण व नागरी वसाहतींचा अभ्यास केला जातो. भारताचा औद्योगिक विकास झाल्यानंतर स्थलांतर मोठय़ा प्रमाणात वाढून ग्रामीण व नागरी क्षेत्रांमध्ये समस्या निर्माण झाल्या. तसेच या समस्यांवर सरकारकडून विविध धोरणे अवलंबिली जातात. उदा. ‘स्मार्ट सिटी.’ त्यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. २०१४ मध्ये ‘चांगपा (Changpa ) या जमातीविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. २०१३ मध्ये - ‘जमातींची नावे व त्यांचे राज्य यांच्या योग्य जोडय़ा लावा.’ असे काही प्रश्न सामाजिक भूगोलाच्या पाश्र्वभूमीवर अभ्यासता येतील. भूगोलामध्ये पर्यावरण भूगोल हा घटकदेखील महत्त्वाचा आहे. पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये भूपर्यावरण हा स्वतंत्र घटक आपल्याला अभ्यासावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने ‘मानवी हस्तक्षेपामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास अभ्यासणे आवश्यक आहे. सध्याची सर्वात गंभीर समस्या म्हणजे हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ होय. यासोबतच जैवविविधतेतील घट, विविध प्रकारचे प्रदूषण, आम्लवर्षां, वाळवंटीकरण, पाणथळ भूमींचा ऱ्हास, निर्वनीकरण या घटनांचा सखोलपणे अभ्यास करणे आवश्यक आहे. या समस्यांवर उपाय काढण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्नांची नोंद घ्यावी. (क्रमश)