या लेखात आपण नीतीनियमविषयक चौकटी ठरवताना वापरल्या जाणाऱ्या काही दृष्टिकोनांचा विचार करणार आहोत. तसेच मागील लेखाप्रमाणे त्या-त्या दृष्टिकोनांना धरून कोणत्या विचारवंतांचा अभ्यास करणे आवश्यक आहे, हेसुद्धा पाहणार आहोत.
न्यायाधिष्ठित दृष्टिकोन
(The Justice Approach)
या विचारसरणीनुसार ज्या सर्व व्यक्तींना समान समजले जाते त्या सर्वाना समान वागणूक दिली गेली पाहिजे असे मानले जाते. सर्व व्यक्ती समाजासाठी सारख्याच महत्त्वाच्या असणे हा या विचारसरणीचा मूलभूत पाया आहे. त्यामुळेच समान लोकांसाठी समान धोरणे व असमानता आढळल्यास असमान धोरणे असे या विचारसरणीचे स्वरूप आहे. काही ठराविक प्रसंगांमध्ये असमानता न्याय्य मानली जाते, जसे की –
* जास्त तास काम करणाऱ्याला अधिक वेतन मिळते.
* आजारी व्यक्तीला कामातून सूट मिळते.
* वंचित समूह गटांना जास्त अधिकार मिळतात. इ.
मात्र अशाप्रकारची समानता किंवा असमानता ठरवणे व त्यानुसार नतिक चौकट बनविणे सोपे नाही. तसेच समानतेबरोबर समता या संकल्पनेचासुद्धा विचार केला पाहिजे. न्यायाच्या मार्गाने नतिकता प्रस्थापित करण्यासाठी केला गेलेला विचार याठिकाणी महत्त्वाचा ठरतो. यासाठी जॉन रॉल्स या अमेरिकन विचारवंतानी मांडलेल्या ‘समान न्याय वाटप’ या संकल्पनेची विस्ताराने चर्चा करणार आहोत.
सामायिक कल्याणवादी दृष्टिकोन
(The Common Good Approach)
माणसाचे जीवन हे समूहकेंद्रित असते व प्रत्येक व्यक्तीच्या योगदानावरच समूहाचे सामायिक कल्याण अवलंबून असते असे या विचारसरणीमध्ये मानले जाते. समूहा-समूहांमधील आंतरसंबंध तसेच त्यांच्यामध्ये होणारे आदानप्रदान हा त्या समूहांसाठीचा नतिक पाया मानला जातो. या विचाररणीमधून माणसाला समूह म्हणून टिकून राहण्यासाठी काय काय करणे आवश्यक आहे याकडेसुद्धा लक्ष वेधले जाते. जसे की, आरोग्य सेवा, न्याय व्यवस्था, अग्निशामक दल, शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल, शिक्षण व्यवस्था आदींची शक्य तितकी प्रगती होणे व या व्यवस्था टिकून राहाणे या मुद्दय़ांवर या विचारसरणीमध्ये भर दिला गेला आहे. तसेच अनेक प्रसंगांमध्ये व्यक्तीचे स्वतचे प्राधान्यक्रम हे समूहाच्या प्राधान्यक्रमांपेक्षा कमी महत्त्वाचे असतात हे अधोरेखित केले जाते. अधिकाधिक शाश्वत समूहव्यवस्था निर्माण करण्याकरता समाजाच्या कल्याणाचा अधिक भर देऊन विचार केला गेला पाहिजे. या सर्व व्यवस्थांनी अशा प्रकारे काम केले पाहिजे ज्यामधून सर्व लोकांना फायदे मिळतील. या विचारसरणीतील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, सर्वच व्यक्ती सामायिक कल्याणाचा फायदा घेत असतात, समूहाच्या शाश्वत व सामायिक प्रगतीकरता प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे बद्ध आहे. मात्र सामायिक कल्याणामध्ये कशाचा अंतर्भाव होतो आणि कशाचा होत नाही हे काहीवेळा सापेक्ष असू शकते. अनेकवेळा ही विचारसरणी व्यक्तीत्ववादाच्या विरोधी भूमिका घेणारी आणि म्हणूनच अनेक विरोधक असणारी ठरते. परंतु या घटकातील प्रश्नांचा विचार करत असताना, विशेषत सनदी अधिकारी या भूमिकेतून विचार करत असताना सामायिक कल्याणवादी दृष्टिकोन अनेकवेळा प्राधान्याचा ठरू शकतो.
सद्गुणाधिष्ठित दृष्टिकोन
(The Virtue Approach)
मानवसमूहाच्या आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा विचार करता आपण घेत असलेला कुठलाही निर्णय हा सदगुणांवर आधारित असावा अशी या विचारसरणीमागची भूमिका आहे. ‘अमूक एक निर्णय घेतल्यानंतर मी कशा प्रकारची व्यक्ती बनेन?’ किंवा ‘हा निर्णय मी घेऊ शकत असलेला सर्वात चांगला निर्णय आहे का?’ या प्रश्नांच्या मिळणाऱ्या उत्तरांमधून योग्य निर्णय निवडला जाण्याची प्रक्रिया या दृष्टिकोनामध्ये अपेक्षित आहे. जसे की, एखाद्या प्रसंगामध्ये आपण सचोटीने वागणे अपेक्षित आहे. तेव्हा निर्णय घेणारी व्यक्ती स्वतला असा प्रश्न विचारते की, ‘मी सचोटीने वागणारा/वागणारी व्यक्ती आहे का?’ किंवा ‘मला सचोटीने वागणारी व्यक्ती बनायचे आहे का?’ (यामध्ये सचोटी हा सदगुण आहे, असे गृहित धरले आहे.) समाजाने घालून दिलेल्या नतिकेच्या नियमांना धरून सदगुणांचा संचय वाढावा व यामाध्यमातून सदगुणी नागरिकांची संख्या वाढावी हा यामागील हेतू आहे. या दृष्टिकोनातून निर्णय घेत असताना समस्येत असलेल्या व्यक्तीबरोबरच समस्या सोडवणाऱ्या व्यक्तीची स्वतबद्दलची प्रतिमा कशी आहे यावर हा दृष्टीकोन भर देतो. यासाठी आपण अ‍ॅरिस्टॉटलने मांडलेल्या संकल्पनांचा विचार करणार आहोत. या सर्व दृष्टिकोनांचा उपयोग करून Ethics & Integrity या घटकातील प्रश्न सोडविणे अपेक्षित आहे. यातील प्रत्येक दृष्टिकोन आपणास विविध नीतिनियमविषयक विचारसरणीची चौकट आखून देतात. प्रत्येक दृष्टिकोन महत्त्वाच्या भूमिकेतून नीतिनियमविषयक मार्गदर्शन करतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून केलेला विचारही अनेकदा आपल्याला समान निष्कर्षांप्रत पोहचवतो. उत्तम नतिक प्रशासकीय निर्णय घेण्याकरिता विशिष्ट संवेदनशीलता व नीतिनियमांच्या चौकटीतून निर्णय पारखून घेण्याचा सराव असणे अत्यावश्यक आहे. योग्य निर्णय घेणे व त्याची योग्य अंमलबजावणी करणे या दोन्हींचा अंतर्भाव असणारे निर्णयच खऱ्या अर्थाने या चौकटींना न्याय देत असतात. जेव्हा अशा प्रकारे विविध नीतिनियमांच्या चौकटींचा विचार करत निर्णय घेण्याची क्षमता पूर्ण विकसित होते तेव्हा असे निर्णय घेणे ही एक सहज घडून येणारी प्रक्रिया होते. आपल्या समोरील प्रश्न/प्रसंग जितकी नवनवी रूपे घेऊन येतात तितकीचा आपली नतिक-वैचारिक घुसळणही वाढत असते. विविध पाश्र्वभूमी असणाऱ्या व्यक्तींचा सततचा संपर्क, चर्चा, वाचन, मनन यातून नवनवीन प्रश्नांना सामोरे जाण्यास आपण अधिकाधिक सज्ज होत असतो. या सर्वाना आपण वरील नीतिनियमांच्या चौकटींचे अधिष्ठान उपलब्ध करून दिल्यास आपले निर्णय हे अधिकाधिक सजग व नतिक होण्यास मदत होते.
पुढील काही लेखांमधून आपण या विविध दृष्टिकोनांचा वापर करून यूपीएससीतील विविध प्रश्न, या प्रश्नांच्या उत्तरासाठी वरील दृष्टीकोनांचा वापर करणे व त्यावर आधारित Case Study सोडवणे या सगळ्याचा सविस्तर विचार करणार आहोत.
सुश्रुत रवीश

Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
Loksatta kutuhal Application of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचे उपयोजन
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…